Wednesday, February 12, 2025

पुस्तकं वाचनालये आणि आपण...

तरुण पिढी, गावाकडची मुलं, काही प्रमाणात शहरातली मुलं, ही पुस्तकं वाचत नाही, वचन संस्कृती लयाला चालली आहे. अशी एक सर्वसामान्य ओरड नेहमी बघायला मिळते; पण ज्या ठिकाणी पुस्तक वाचत नाही अशी ओरड होते, त्या भागातील वाचनालये आपण एकदा जाऊन बघितली पाहिजेत. जुन्या कथा, कादंबऱ्या, अनेक समकालीन रेफरन्स नसलेली पुस्तके आणि नवीन पिढीला अगदी गंधही नसलेली अशी अनेक विषय आणि त्यावरील पुस्तके आपल्याला या लायब्ररीमध्ये आढळतात. मागील पिढीला कदाचित या पुस्तकांनी प्रेरित केलेही असेल. त्याचे संदर्भ तेव्हा त्यांच्यासाठी नवीन असतीलही, परंतु कुठलेही पुस्तक नव्या पिढीला तेव्हाच आकर्षित करू शकतात जेव्हा ते त्यांची मानसिक, शैक्षणिक आणि समकालीन ज्ञान मिळवण्याच्या गरजा पूर्ण करतील. आजच्या पिढीला कुठलं ज्ञान आकर्षित करत आहे हे जर पाहिलं तर विज्ञान-तंत्रज्ञान आयटी, उद्योग, मॅनेजमेंट एवढाच नाही तर अध्यात्माचं एक नवीन स्वरूपात झालेल्या प्रगटीकरण, जगाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान देणारी शास्त्रे हे सर्व आजच्या पिढीला आकर्षित करत आहे, नव्हे त्याबद्दल ते वाचण्याचा प्रयत्नही करत आहे. असे नसते तर मोठ्या प्रमाणावर करोडोचा टर्नओव्हर करणाऱ्या ऑनलाईन पुस्तक विक्री कंपन्या या एवढ्या भरभराटीला आल्या नसत्या. या पिढीला जे हवं आहे ते देणारी पुस्तक आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री करताना दिसतात, ज्यामध्ये मॅनेजमेंट वर येणारी, विज्ञानाच्या परिभाषा नव्या पद्धतीने सांगणारी, मानसिक विकासावर आधारलेली, शैक्षणिक विकासाच्या वेगवेगळ्या थेअरी मांडणारी, उद्योग जगताच्या ज्ञानाविषयी भरभरून सांगणारी, नवीन राजकीय नेत्यांची आत्मकथन इत्यादी अनेक प्रकारची पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. नवीन पिढी जी वाचन करते ती या प्रकारचं वाचताना दिसते. 
परंतु पुस्तक वाचत नाही असं म्हणणाऱ्या, अशी ओरड असणाऱ्या भागातल्या लायब्ररींना जेव्हा जाऊन आपण भेटतो, तेव्हा त्या भागातल्या पुस्तकालयात काय आढळते, तर यापैकी काहीच नाही. मग ही पुस्तक नेमकं येऊन वाचणार तरी कोण. जर तुमची पुस्तकं येणाऱ्या जगातील भाषा बोलणाऱ्या मुलांच्या मानसिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक गरजा पूर्ण करणार नसतील तर ती काय कामाची असाही प्रश्न आहेच.. 

वाचनाचा छंद असणं आणि ज्ञानवृद्धीसाठी वाचन करणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. छंद असणाऱ्या लोकांना फक्त वाचायचं असतं त्यातून काय मिळणार याकडे त्यांचे लक्ष नसते. ही लोक रस्त्यावर पडलेला कागदाचा तुकडाही उचलून वाचतील. अशा लोकांना ही जुनाट वाचनालय पचतीलही, परंतु स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी वाचणाऱ्या येणाऱ्या पिढ्यांना, पुस्तकाचे वाचन हे त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी एक साधन असते, अशांसाठी ही वाचनालय कुचकामी ठरतात.

वाचनालय व्यवस्थित चालावे असे वाटते तर तर ती पुस्तकांच्या दुकानांसारखी प्रवाही असावीत. नवीन येणाऱ्या पुस्तकांचे प्रदर्शने लायब्ररींमध्ये भरावीत. सगळ्या प्रवाहातील पुस्तकांचे प्रतिनिधी असणारी पुस्तके लायब्ररीमध्ये प्रथमदर्शनी मांडली जावीत, त्यावर पैसे खर्च करावे. दर महिन्याला नवीन पुस्तके आली पाहिजेत. नवीन प्रकाशकांची पुस्तके यावीत, नवीन लेखकांची पुस्तके यावीत आणि पुढच्या महिन्यात कुणाची येणार आहे याचे बोर्ड झळकावेत.राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सर्वच. परंतु यासाठी सातत्याने खर्च येतो आणि तो करायची तयारी नसते. समष्टीच्या ज्ञानासाठी पैसे खर्च करणार तरी कसे. त्यामुळे निर्माण झालेले अनेक वाचनालय ही स्टॅगनंट असतात. त्यात पडणाऱ्या नाविन्यपूर्ण पुस्तकांची भर ही अगदी नसल्यातच जमा...! 

आणि पुस्तक वाचनाचच जर म्हटलं तर नवी पिढीच काय जुनी पिढी ही पुस्तकं वाचत होती असे ठोस पुरावे नाहीत. दुसरे असे की जुन्या पिढीकडे एवढा पैसा नसल्याने त्यांना पुस्तकं जी काही मिळायची ती लायब्ररीच्या आधारेच, म्हणून तेव्हा थोडे फार वाचन दिसायचे. आज पैसाही आहे आणि तो न खर्च करता ऑनलाइन पुस्तक मिळण्याची सुविधाही आहे त्यामुळे ही पिढी जे वाचते आहे ते वेगळ्या स्वरूपातील आहे. त्यामुळे या स्टॅगनंट झालेल्या वाचनालयांच्या स्वरूपाला बदलायला हवे तरच जनरेशन झेड आणि पुढील पिढ्या याकडे फिरकतील.

...........


सचिन दाभाडे
8390130362

Friday, January 31, 2025

मोटिवेशनल लेखक आणि समग्रतेची वाणवा


 शिव खेरा यांची दोन पुस्तकं... पहिलं पुस्तक कदाचित 1998 99 च्या काळामध्ये प्रकाशित झाला असेल 'जीत आपकी', कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात वाचलेली.. यू कॅन विन.. आणि त्यानंतर 25 ते 26 वर्षानंतर दुसरे पुस्तक आले ते म्हणाजे 'लिव्ह व्हाईल यू आर आलाईव्ह' . पहिल्या पुस्तकाची भाषा बघा त्याद्वारे दिल्या जाणारा संदेश बघा आणि दुसऱ्या पुस्तकाची भाषा आणि त्या दिल्या जाणारा संदेश दोन्हीही एकमेकांपासून अगदी भिन्न.. पहिल्या पुस्तकांमध्ये तुम्ही जिंकू शकता तुम्ही जिंकायलाच हवं आणि त्यासाठी तुम्ही काय काय केले पाहिजे याबद्दल जोर देऊन केलेली सगळी मांडणी. यश मिळवण्यासाठी एकच नाही तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या पाहिजेत आणि म्हणून जो जिंकतो तोच लीडर असतो हे सांगणार पहिले पुस्तक.


आणि; जर, योग्य वेळी थांबला नाहीत तर तुमचा अंत निश्चित आहे अशी आशयाची मांडणी करणारे दुसरे पुस्तक. टेक ब्रेक बिफोर यू ब्रेकडाऊन असे ठळकपणे सांगते. रिलॅक्स रहा. स्वतःला वेळ द्या, स्वतःला समजून घ्या, फक्त यशापाठीमागे न धावता कामाशी स्वतःलां बॅलन्स करा, अशीच एकंदरीत मांडणी. म्हणजे पळू नका, ब्रेक घ्या, ब्रेक डाऊनची भीती आणी त्याला अधोरेखित करणारे लिखाण.

आयुष्यात यश मिळवतांनी येणाऱ्या स्ट्रेसला बॅलन्स करताना त्याकडे लक्ष द्यावे असे सांगताना नुसते परफॉर्मन्सच्या मागे धावून जमणार नाही तर वर आयुष्य बॅलेन्स असले पाहिजे यावर यात फोकस केला गेलेला आहे.. 


लेखकाचा काळ कसा त्याच्यावर, त्याच्या अनुभवावर स्वार असतो तो कितीही तटस्थपणे लिहीत असला तरी त्याचं वय आणि त्याच्या अनुभवाची, जे खूप वैयक्तिक असतं, त्याची भाषा करत असते. आणि हेच त्याने काय लिहावं हे सांगतो. हे शिव खेरांच मानसिक आणि एकंदरीत अनुभवाचे स्थित्यंतर दाखवणार लिखाण अतिशय गमतीशीर आहे. यासोबतच हे बघताना हेही समजून घेण्यासारखे आहे की यश आणि यशाच्या संकल्पनेला सातत्याने, ती तुमच्या बाहेर आहे असे सांगणारे नरेटीव एका विशिष्ट वयानंतर यशाची समज आणि कल्पना ही आतून उदय पावते आणि ती बहिर्गत नाही तर अंतर्गत आहे असे सांगण्याकडे वळते. प्रश्न हा आहे की लेखक स्वतःच संपूर्ण आयुष्याची एकत्रित समज करून घेऊन हे स्थित्यंतर समजून घेऊन, यशाची एकात्मिक जाणीव का करून देत नसतील. किंवा तेवढं थांबून तसा अनुभवून मग लिहिण्यास त्यांच्याकडे वेळ नसावा.

थोड्या फार अनुभव अनुभवानंतर लगेच यश अपयशाच्या व्याख्या म्हणून त्याचे तत्वज्ञान उभा करून मोकळे होऊन जायचं याची एवढी गडबड का ?.

यात विशिष्ट वयाच्या टप्प्यावर जेवढं समजलं तेवढं परसेप्शन घेऊन त्याला यशाच्या व्याख्येत बसून बाजारात आणण्याचे प्रयत्न फक्त फुटकळ संकल्पना मांडण्या पुरतेच राहतात, पुढे चालून त्याचा रेलेवंस संपला की मग यशाची खरी व्याख्या सांगताना पुन्हा दुसरच काहीतरी लिहावं लागतं. अशी वेळ अनेक लेखकांवर आलेली मी पाहिलेली आहे. 


एखाद्या लेखकाने मांडलेली एक संकल्पना बदलायला किंवा त्यामध्ये बदल समाविष्ट करायला भविष्यातील विचारवंतांना फार काही करायची गरज पडत नाही, कारण मूळ लेखकच स्वतः वीस पंचवीस वर्षानंतर आपण मांडलेल्या संकल्पनेला पुन्हा बदलून मांडतो. 


मुद्दा आहे कुणाचे वाचावे. ज्या लेखकाला आयुष्याकडे समग्र बघण्याची दृष्टी प्राप्त झालेली आहे. आयुष्याच्या विविध अनुभवातून चिंतनातून आणि समग्र जाणीवेतून ज्याचं लिखाण काळाच्या कसोट्यांवर मान्यता पावलं आहे असं लिखाण वाचलं पाहिजे किंवा तस लिहिता यावं अशी अपेक्षा लेखककडून असायला हवी. नाहीतर आयुष्याने पुरवले आणि आयुष्य सुचवू इच्छिणारे हे असले शिफ्ट लेखकालाच बॅलेन्स करता येत नसतील आणि त्याची समग्र व्याख्या करून आपल्या लिखाणाला युनिक आणि समग्रपणे मांडता येत नसेल तर असलं काही लिहून तरुण कर्तुत्ववान आणि जगात सक्षमपणे काहीतरी करू इच्छिणाऱ्या आणि आयुष्याला समग्रपणे पाहू इच्छिणाऱ्या तरुणांचे नुकसान होते. ते तुमचं लिखाण वाचत बसतात आणि जे पटेन्शियली वाचायचं सोडून खूप काहीतरी वाचलं आहे अशा अविर्भावात जगत राहतात. त्यानंतर भविष्यात निर्माण होणाऱ्या  कॉन्ट्रोवर्सीजला  या लिखाणाचा आणि वाचनाचा काही उपयोग होत नाही मग त्या कॉन्ट्रोवर्सीज सोडवण्यासाठी हेच लेखक पुन्हा काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात. 


एकूणच काय तर आपल्या बुद्धीला एकत्वाची समग्रपणाची जाणीव देणारे लिखाण शोधावे आणि तेच वाचावे. असे लिखाण जे कालांतराने आपल्या अनुभवाच्या कसोटीवर खरे उतरत राहील आणि आयुष्यातल्या वेगवेगळ्या आंतरविरोधावर ते एक सम्यक उपाय म्हणून सातत्यपूर्ण मार्गदर्शन करत राहील. असे झाले तर मोजक्या पुस्तकातही आयुष्याला बॅलन्स करण्याचा आणि त्यानुसार सुंदर आयुष्य जगण्याचा समतोल उपाय सापडेल.


सचिन दाभाडे 

Friday, July 15, 2022

काही नोंदी..



निसर्ग समजणे एवढे सोपे नाही. रस्त्यावरून तुफान वेगाने धावणाऱ्या आपल्या गाडीच वेग थोडा कमी करावा लागतो आणि गाडी बाजूला घ्यावी लागते. खाली उतरावं लागत. इथून तो सुरू होतो, त्याचे नियम सुरू होतात. एसी मधून उतरल्या उतरल्या सुरवातीला लगेच ते नियम समजायला अशक्यप्राय, पण हळू हळू केंव्हातरी ते उमजायला सुरवात होते. दूर डोंगराच्या माथ्यावर उभं असणाऱ एखाद झाडं दृष्टीस पडत. डोंगरावर झाडांच्या गर्दीत दाट धुक्याची लादी फसलेली असते, पण हे बघून आपल्याला काहीच क्लू मिळत नाही.  

झाडांच्या पानांवर पडणारा थेंब पानावरून खाली घरंगळत जातांना थेंबाचा आकार बदलत बदलत जात असेल की; पानं त्यांना आकार बदलवूच देत नसतील. एवढं सूक्ष्म आकलन एखादा कवी किंवा साहित्यिकच करू जाणे. आपण मात्र मंद असतो बऱ्याच अंशी आणि बऱ्याच वेळेला. कदाचित आशा वेळेला हेन्री थोरो सारखी उमदी माणसं आपल्या संवेदनशील शब्दांनी आपल्यात अनंत पसरलेल्या उल्ल्हासित आणि उस्फुल्लीत निसर्गाला जागृत करतात. त्याच्यासारखे साहित्यिक कदाचित मानव व निसर्गामधील हा दुवा सतत जोडता ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न यासाठीच करत असावेत. थोरो निसर्गात एव्हढा एकात्म झाला होता की त्याने वॉल्डन तळ्याकाठीच आपले छोटेसे झोपडे बनवले व राहिला. आणि तेथेच त्याला त्याचे महान पुस्तक वॉल्डन सुचले, थेरोला समकालीन असलेला महान इमर्सन याला ही थोरो अंगावर आल्यासारखा वाटायचं एव्हढा तो नैसर्गिक होता.

दगडाच्या बाजूला असलेले एक झाड न्याहाळल ज्याची पाने गळाली होती. जोराचा पाऊस, वादळवारं त्याची फांदी आणि बुंध्याला धडका देत असतील. सततच्या पावसानं आणि वादळाच्या भडीमाराने फांद्या सतत ओलसर राहून पोकळ होत जाऊन बहुदा कुजत जातात. ज्या झाडाच्या फांद्या भोवती असलेली पाने गळून गेलेली आहे ती पोकळ होत जाऊन आणि कुजून जातात... थोड पुढे एक छोटा झरा शांत निवांत वाहत होता. त्याच्या बाजूनेच खूप गर्द झाडांची रांग सुरू झालेली दिसली, ती अगदी डोंगर माथ्यापर्यंत गेलेली. या झाडांच्या भोवती पानांची दाटीवाटी होती, यांच्या फांद्या व बुंधे ही मजबूत तजेलदार. पावसात काही काळ त्याच्या जवळ उभा राहिलो, पण त्या झाडाची फांदी आणि बुंधा काही ओला झाला नाही, मी मात्र पावसाच्या सरीत ओला झालो. ज्या झाडांभोवती हिरव्या पानांची लगबग असते ती झाडे कुजत नाही. सगळा पाऊस आणि वाऱ्याशी धडका घेत ते फांद्यांना सुरक्षित ठेवत असावेत. किती हा समतोल. म्हणजे कदाचित समतोल साधण्याचा प्रक्रियेला निसर्ग म्हणावे इतका.

निसर्ग व्यक्त होण्यासाठी मार्ग मोकळे करतो पण व्यक्त होण्याची आगतिकता संपवतो.  फारशी बांधाबांध करावी लागत नाही. हळू हळू तुमच्या डोक्यातील जंगल बाहेरील जंगलाशी एकरूप व्हायला लागले की निसर्ग सगळी गुपित सांगायला सुरुवात करतो.
ही गुपितच मानवाला आनंदमय कोषाकडे घेवून जात असावी.

सागाच्या झाडाच्या पानावर एक चिकटपणा असतो. कितीही पाऊस त्यावर पडला तरी पान झटकले की जसेच्या तसे होवून जाते. जणू काही झालंच नाही. पाण्याला डायरेक्ट पानांत शिरताच येत नाही. 

पानात पोहचायचय तर मुळातूनच जावे लागेल हा स्पष्ट संदेश असतो पाण्याला. 
नो शॉर्टकटस....

.....
सचिन दाभाडे

Friday, December 17, 2021

'भुरा' एक तत्वज्ञान्याची बखर.





भुरा हे शरद बाविस्कर यांच्या जीवनातील नाट्यमय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तत्त्वज्ञानाच्या गहन आणि अर्थपूर्ण पद्धतीचा मिलाफ करत लिहलेले अर्थपूर्ण आत्मचरित्र. पुस्तक वाचतांना अनेक महत्त्वाच्या ठिकाणी डोळ्याच्या कडा पाणावतात. आत्मचरित्र हे फक्त घटनांचे विवरणच असावे का? तर नक्कीच नाही. आत्मचरित्र कसे असावे याचे सध्या मी पाहिलेले उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भुरा. आत्मचरित्रातून ते लिहणार्याच्या आयुष्यातील घटनाच फक्त कळण्याऐवजी त्याची वैचारिक मनोभूमिका जीच्यामुळे व्यक्तीच्या आयुष्याला आकार मिळालेला असतो ते कळत असते. छोट्याछोट्या दुःखाना ज्याप्रमाणे लेखक जगाच्या मोठ्या प्रेरणेशी जोडतो त्यामुळे आपले आत्मचरित्र हे फक्त रावेरच्या 'भुरा' चे न राहता वैश्विक आशा 'शरद' चे झालेय. सर्व सामाजिक शास्त्रांना खोली आणि अर्थ देणारी मूळ शाखा म्हणजे तत्वज्ञान आणि अशा विषयावर आपण केलेले चिंतन मोठ्या परिपक्वतेने एका उच्च दर्जाच्या साहित्यकृतीतुन यावे तसे आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनांतून येत राहते आणि घटनांसोबत विचारांच्या विश्वात वाचक न्हाऊन निघत राहतो, एक प्रेरणादायी माणसाचे चरित्र वाचता वाचता एका तत्वज्ञाण्याचे मनोगत वाचकाचे भान घडवत राहते आणि नकळत त्याचे अनुभवविश्व संपन्न करत राहते.  

एकीकडे जेंव्हा वाचताना लेखकाच्या आयुष्यातील संघर्ष अस्वस्थ करत होता त्याचवेळेला लेखक त्या संघर्षाकडे ज्या वैश्विकतेतुन पाहत होते हे वाचताना व अनुभूती घेत असतांना एक उच्च कोटींची प्रगल्भता मला व्यक्तिशः देऊन गेला. वाचकाच्या आयुष्याला आत्मपरिक्षणाची संधी हे 'संवादी' आत्मचरित्र ठायी ठायी उपलब्ध करून देत राहणार.

आजूबाजूला आणि समाजात ज्या पद्धतीने संयम हरवून भावनेच्या लाटांवर स्वार होऊन तरुण लोकांचे लोंढे बरबाद होतांना बघतो, अगदी अश्या वेळेला स्वभान जागृत करून, भयंकर अंतरविरोधी परिस्थितीत, ध्येय निश्चित करून, त्यासाठी जीवाचे रान करणे काय असते, हे या पुस्तकात लेखकाला बघून लक्षात येते. तसेच जो कुणीही वाचेल त्यालाही हे समजेल आणि हे समजणे हीच व्यक्ती विकासाची पूर्वअट आहे हे मला नमूद करावे वाटते. आणि या सगळ्यामुळेच की काय भुरा व तो निर्माण करत असलेला अवकाश मला या काळाची ऐतिहासिक गरज वाटतेय. अर्धवट लोकांसाठी आपले लिखाण हे झणझणीत अंजन आहे. 

आजूबाजूला शिक्षणाचे वातावरण नसतांना ज्याप्रमाणे भग्नातेतून लेखकाची भरारी ही लक्ष वेधणारी आहे, त्याहीपेक्षा ज्या संयमाने तुम्ही नियतीच्या एका एका वर्तुळाकार चक्रातून महत्प्रयासाने बाहेर पडत गेलात, हे पाहणे संपन्न करणारे व दृष्टी चे कोण रुंदवणारे आहे. स्वतःबद्दल निर्माण होण्यारया संकुचित व्याख्या भुरा प्रचंड निर्दयतेने तोडत जातो. मान्यता प्राप्त यश मिळालेले असतांनाही भुरा थांबत नाही. तो आणखी पुढे जातो. पुढे जाणं आणि थांबणं काय असतं याची जणू व्याख्या भुरा निर्माण करू पाहतोय. मान्यता आणि अमान्यता निर्माण करणाऱ्या जगात ट्रान्सकॅनडेंटल अनुभव हे कादाचित त्याच ध्येय असावं.

भुरात वाचकाने काय पाहावे, तर एका तत्वज्ञान्याचा मनोवैचारीक प्रवास हा कसा घडत असतो हे बारकाईने पाहावे.अनिश्चित शारीरिक परिस्थिती व मानसिक परिस्थिती लेखकाचा शिक्षणसंबंधीच्या प्रवासातील अंतर्विरोध अधिकाधिक वाढवत असताना ते ज्या वेगाने आयुष्याला शोधण्यासाठी धडपड किंवा जगण्याच्या अंतरंगातील राहस्ये शोधण्याचे काम हातात घेऊन तत्त्वज्ञानाच्या प्रांतात स्वतःला सिद्ध करता, हे भुराच्या रूपाने बघायला मिळणे ही एक वाचक म्हणून माझ्यासाठी पर्वणीच होती.
विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक ध्येय कसे हस्तगत करावे याचे जिवंत मॅन्युअल (उदाहरणासाहित) आहे.
प्रॉफेशनल व्यक्तीसाठी कुठल्याही ध्येयाच्या पाठीमागे जाण्याअगोदर ते ध्येय स्वतःमध्ये योग्य पद्धतीने सापडणे किती महत्वाचे आहे याचे दिशादर्शक आहे

भुरा नीतशेचा सुपर ह्यूमन नाही, किंवा त्याची गरज पण त्याला नाही, पण हो; तो म्हणजे मिळालेले आयुष्य उच्च ध्येयाने जगण्यासाठी काय काय करावे व परिपूर्ण मानव होऊन जगावे याचे उदाहरण मात्र नक्की आहे. कुठल्याही ठाम भविष्याची गॅरंटी नाही अश्या परिस्थितीत आतमध्ये निर्माण झालेल्या पूरक तत्त्वज्ञानाने लेखकाला जो रस्ता दाखवला तो भुरातून त्यांनी सर्वांसमोर आणला ज्याचा फायदा येणाऱ्या पिढ्या घेतील.

..........
सचिन दाभाडे
औरंगाबाद

Friday, May 7, 2021

बंदी, संधी आणि औद्योगिक क्रांती..!




फ्रांस आणि इंग्लंडच्या युद्धात अमेरिका तटस्थ राहिला म्हणून इंग्लंड ने अमेरिकेला फिनिश्ड गुडस चा पुरवठा बंद केला आणि अमेरिकेत इंडस्ट्रीलायझेशनची सुरवात झाली. काळ होता 19 व्या शतकाच्या सुरुवातीचा. इंग्लंडकडून आलेल्या या अचानक व्यापारबंदीच्या झटक्यानंतर अमेरिका अंतर्मुख झाली व इंग्लंडच्या भरवश्यावर उभे व्यापार धोरण फार काही काळ तग धरणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. यामुळेच अमेरिकेने स्वतःकडे, त्यावेळपासून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या व उद्योगासाठी लागणाऱ्या नैसर्गिक साधनाकडे लक्ष देणे सुरू केले. 

ऑइल, लोखंड, इमारतीचे लाकूड, कॉपर आणि कोळसा या मूलभूत साधनाचे भरपूर साठे असूनही इंग्लंडवर आपण अवलंबून का आहोत? याची अमेरिकेला जाणीव झाली. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर जी कामे हाताने केली जायची ती यंत्राद्वारे करण्याची मोहीम हाती घेतली गेली. कॉर्पोरेट करार केले गेले. काही वर्षांपूर्वीच 90% इकॉनॉमी शेतीआधारित असतांना येणाऱ्या काही वर्षातच ती उद्योगाधारीत झाली. जेफर्सन आणि मॅडीसन हे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेतील औद्योगिक क्रांतीचे प्रवर्तक बनले. ब्रिटनने घातलेली बंदी पुढे चालून त्यांच्याच अंगावर आली, पण या बंदीच्या काळात अमेरिका मात्र खाडकन डोळे उघडून स्वतःच्या क्षमतेकडे पाहू लागला. अमेरिकेचे हे अंतर्मुख होणे इंग्लंडला काही वर्षांनी महागात पडणार होते. करण यानंतरच पोलादाचे भयंकर मोठे उद्योग अमेरिकेत उभे राहायला सुरू झाले. आणि हाच पोलाद व इतर उद्योग सगळ्या युरोपातील उद्योगधंद्यांना भविष्यात मुख्य पुरवठादार झाले.
बंदी, अडचणी ह्या आत्मनिर्भर होण्याच्या मार्गातील सर्वात मोठ्या संधी असतात, मग तो व्यक्ती असो किंवा देश ..!

.....................
सचिन दाभाडे

2000 च्या आसपास चा काळ आठवून पहा..! कपडे घ्यायला गेलो तर तुमच्या तालुक्यातील एक किंवा दोनच अशी मोठी कापड दुकाने असायची आणि त्यातील एखाद्याच दुकानात दुसरा मजलाही भरलेला दिसायचा, बाकी सगळीकडे एकाच फ्लोरला सगळं मिळायचे. अगदी जिल्ह्याच्या ठिकाणीही दोन फ्लोरची मोठी कापड दुकाने थोडी जास्त पण अगदी मोजकीच, थोड्या फार फरकाने एखादं दोन ठिकाणी अपवाद असेल. दुकानाचे आकारमान मर्यादित, कपड्याचे सर्व प्रकार साधारणपणे एकाच ठिकाणी, आणि त्यामुळे दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 3 ते 5 च्या घरात; एखाददोन मागेपुढे. काळ झपाट्याने बदलला. मागच्या 15 ते 20 वर्षात त्या साधारणतः सर्वच दुकानाचे दोन ते तीन फ्लोर झाले, लेडीज, जेन्ट्स आणि चाईल्डच नाही तर फक्त जेन्ट्स या एकाच प्रकारामध्येही वेगवेगळे सेगमेंट झाले. अगदी छोट्यातल्या छोट्या कापड दुकानाला ही दुसरा फ्लोर सहज आलाय आणि मोठ्या दुकानांनी अगदी मॉलला ही भारी भरेल एवढा पसारा उभा केला. या सगळ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या एका दुकानात 25 ते 50 पासून 150 च्या घरात जाऊन पोहचली. 

जास्त मॅनपॉवर ही जशी प्रगतीचे लक्षण आहे, तसे ती आपल्यासोबत काही आव्हाने पण घेऊन येते. आता हे कपड्याचे दुकान फक्त कपड्याचे दुकान राहिले नाही, कारण तिथे आता 40 ते 50 लोकांचा स्टाफ काम करतो. या पूर्वी जिथे एका कापड विकणाऱ्या दुकानदाराला फक्त कस्टमर कडे लक्ष द्यावे लागत, तिथे त्याला आता ग्राहक असो नसो हे 50 आणि त्यापुढेही जाऊन पोहचलेल्या पर्मनंट कर्मचाऱ्यांच्या रोजच्या नियोजनाचे आव्हान आहे. या सर्वांचे योग्य नियोजन आणि त्यांच्या उर्जेला आवश्यक असणारी दिशा हाही आता या उद्योगात पूर्वीपासून काम करणाऱ्या व्यापारी व उद्योगीसाठी मुख्य विषय आहे.

या मोठ्या स्टाफ चे काय करायचे ? जुने होते तसे चालू द्यायचे की नवीन पद्धतीने या कर्मचाऱ्यांचे नियोजन करायचे.  बाहेरील कस्टमर जेवढा महत्वाचा होता तेवढाच आता हा आतला कस्टमर उद्योजकासाठी महत्वाचा आहे. बऱ्याच व्यापाऱ्यांना हे आव्हान म्हणून लक्षात जरी आलंय, तरी काहीजण वेळ काढताय, काही दुर्लक्ष करताय, काहींची चालढकल सुरुय, काही फक्त नाव मार्केट मध्ये असावे म्हणूनच अस्तित्वात आहे , टिकायचे असेल तर या आतल्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कास्टमरला तयार करावे लागेल..

हा बदल फक्त मान्य असणे पुरेसे नाही तर त्यासाठी तयारी करण्यास सगळ्यात पाहिले जे पुढे येतील ते त्या भागात मार्केटचे भविष्यातील फायदे घेतील..!

..........…..........


सचिन दाभाडे

Monday, April 26, 2021

हट्ट आणि संकल्प

हट्ट आणि संकल्प यामध्ये मूलभूत फरक म्हणजे; हट्टीपणामध्ये स्वतःला काही मिळवण्यासाठी दुसऱ्याने आपल्यासाठी प्रयत्न करावे, हे अपेक्षित असते, तर संकल्पाचा भाव हा कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःला त्या कामासाठी तयार करत असतो. वरवरून हट्टी व्यक्ती आणि संकल्पि व्यक्तीं दोघांनाही इच्छिलेले हवेच असते, पण काही कारणाने ते मिळणे बंद झाले तर संकल्पि व्यक्ती प्रयत्न करत राहतो, तर हट्टी प्रतिक्रियात्मक होऊन दोष देणे सुरू करतो व नकारात्मक ऊर्जेने भरत जातो. आपण हट्टी आहोत की संकल्पि हे वेळोवेळी तपासत राहिले पाहिजे.

इकोपॉइंट..!

आपलं शरीर बाहेरून येणाऱ्या इच्छा, ध्वनी, यांनी कार्यान्वित होते, की ते आतूनच निर्माण होणाऱ्या स्वतंत्र इच्छा, भाव यांचे निर्मिती केंद्र आहे. पर्वताच्या कड्यावर उभे राहून मोठ्याने ओरडला तर तोच ध्वनी पुन्हा परत आपल्या कानावर आदळतो. हा काही नवीन निर्माण झालेला ध्वनी नसतो. आपलं शरीर ही असेच इको पॉईंट बनलेला आहे का ?. इको पॉंइंट सारखेच आपण नेहमी कुणाच्यातरी इच्छा ध्येय आणि भावना यांना रिस्पॉन्स करत असतो. आपले शरीर हे याबाबतीत स्वतंत्र क्रिया करण्याऐवजी बाहेरून येणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करत असते व त्यालाच स्वतंत्र क्रिया समजत असते. हा गैरसमज लवकर दूर व्हायला हवा. 

रशियन मानसशास्त्रज्ञ पावलाव्ह, या प्रतिक्रिया देण्याच्या माणसाच्या सवयीवर स्टीम्युलस (स्वतंत्र क्रिया) आणि रिस्पॉन्स (प्रतिक्रिया) ही पद्धत विकसित करतांना म्हणतो मनुष्याचे आयुष्य हे आपल्या शरीराबाहेर तयार झालेले घटनेला (स्टीम्युलस) ला प्रतिक्रिया (रिस्पॉन्स) देण्यामध्ये खर्च होत असते. हे स्टीम्युलस म्हणजेच बाहेरील वातावरणात घडणाऱ्या मुख्य घटना असतात, ज्यात नैसर्गिक, मानवीय दोन्ही प्रकारचा समावेश होतो. प्रत्येक व्यक्ती याला आपल्या कृवतीप्रमाणे रिस्पॉन्स देत असतो. मानवाच्या या कुवतीवर त्याने भाष्य केले, यावरून मानवी वागणुकीची रीत एका नवीन अर्थाने जगासमोर आली.

पण त्याही पुढे जाऊन व्हिक्टर फ्रांकेल याने या बाहेरील प्रभावाला न जुमानता व्यक्ती आपल्या आतमध्ये निर्माण होणारा स्वतंत्र असा रिस्पॉन्स- (स्वतंत्र भाव) निर्माण करू शकतो जो या बाहेरील प्रभावातून मुक्त आहे. या स्वतंत्र भाव निर्माण करण्याच्या मनुष्याच्या शक्तीला फ्रांकेल त्याच्या Man's search for meaning मध्ये 'इंडिपेंडंट विल' असे म्हणतो. बाहेरील घटना किंवा क्रियांना रिस्पॉन्स देत असतांना घटनेच्या प्रभावात न येता स्वतःची एक स्वतंत्र विल प्रत्येक व्यक्तीला निर्माण करता येऊ शकते, जी कुठलाही प्रभावातून मुक्त असते. या विल (will) नुसार केलेली कृती मनुष्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात नाविन्यपूर्ण आणि सकारात्मक रिझल्ट देऊ शकते.

तुमचा आजचा विचार किंवा भाव हा पेपर मधील बातम्यांचा प्रभाव, टीव्हीवरील घटना, बातम्या व विभत्स्य व्हिडीओ, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप युट्युबद्वारे बघितलेल्या स्टिम्युलेट करणाऱ्या घटना व मेसेजेस यातून निर्माण झालाय की तो या पेक्षा स्वतंत्र आहे, वेगळा आहे, तुमचा आहे, की तो विचार तुम्ही या सगळ्या बाहेरील स्टीम्युलसला प्रतिक्रिया देण्यातुन निर्माण झालाय हे बघता आले पाहिजे. 
एक प्रयोग करून बघा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले किती विचार, घटना व भाव हे बाहेरून आलेले आहेत किंवा त्याला प्रतिक्रिया म्हणून आलेले आहेत व किती स्वतः मध्ये तयार झालेले आहेत. एका रकान्यात बाहेरून आलेले आणि दुसऱ्या रकान्यात आतून निर्माण झालेले (इंडिपेंडंट), असे दोन भागात वर्गीकरण करून लिहा. कुठले जास्त भरताय याचे रोज अवलोकन करून बघा. ही कृती प्रामाणिकपणे केली तर बरीच दृष्टी मिळेल.

हीच इंडिपेंडंट विल म्हणजे 'स्वतंत्र इच्छाशक्ती'  सर्जनशीलतेची खरी आधारशीला आहे. ही तीच सर्जनशीलता जी जद्दु कृष्णमूर्तींनां अभिप्रेत आहे, जीला ते आपल्या शिक्षणविषयक सगळ्या विचारात प्रामुख्याने मांडतात. शासनाने मुलांना लहानपणापासूनच सर्जनशील आणि कृतीयुक्त बनवण्यासाठी त्यांच्या या पद्धतीचा प्राथमिक शिक्षणात समावेश केला परंतु तेवढ्याश्या प्रमाणात ती आपल्या शिक्षण पद्धतीत आणखी रूढ होने बाकी आहे.


...............

सचीन दाभाडे

पुस्तकं, हेतू आणि स्मरणशक्ती

पुस्तक एकदा वाचल्यावर ते पूर्ण लक्षात राहते हे बऱ्याच व्यक्तीबद्दल किंवा अभ्यासकांबद्दल आपण ऐकतो किंवा ऐकलेले असते. हे दुसरं तिसरं काही नसून पुस्तक लिहित असतांना लेखकाने कुठला विचार आधारासाठी योजला आहे ते लक्षात येणे होय. कुठलेही पुस्तक तुम्ही हातात घ्या त्यामध्ये लेखकाचा काही हेतू असतो. थोडं वैज्ञानिक पद्धतीत सांगायचं झालंच तर 'गृहीतक' असते. हे गृहीतक किंवा विचार व्यक्त करण्यासाठी पुस्तकांमध्ये वेगवेगळी उदाहरणें, दृष्टांत, सिद्धांत सांगितलेली असतात. पुस्तकातील कथानक त्यातील पात्रे, मांडलेले विचार हे सगळे लेखकाच्या हेतू भोवती फिरत असतात. तो हेतू वाचन करत असतांना वाचकाला जसा जसा समजायला लागतो, तशी तशी पुस्तकातील मांडणी आपल्या स्मरणात अधिक पक्की होते. कधी कधी तर सुरवातीचे काही पाने वाचल्यावरच पुढे काय लिहले असेल याचा अंदाज येऊन जातो.

एकदा मुख्य विचार समजला की पुस्तकातील बाकी शब्दरचना त्या विचारासाठीच योजलेल्या आहेत हे ओघाने समजायला लागते, त्यामुळे पुस्तक वाचनाचा वेग आणि स्मरणक्षमता दोन्ही वाढतात. बऱ्याच वाचकांना शेवटपर्यंत पुस्तकातील मूळ विचार किंवा हेतू हे शेवटपर्यंत समजत नाही, त्यामुळे त्याला पुस्तकातील सगळे संदर्भ वेगवेगळ्या पातळीवर लक्षात ठेवावे लागतात जे समजायला व लक्षात ठेवायला अडचणीचे असते.

वेगवेगळ्या क्षेत्रातील चौफेर वाचनातून हेतू समजण्याची आपली क्षमता ही विस्तारत जात असते, अर्थात ही हळू हळू होणारी आणि सूक्ष्म प्रक्रिया आहे. तिला वाचनातून सतत बळ देत राहिलं पाहिजे, म्हणजे पुस्तकं वाचल्यावर लक्षात राहायला लागतात व त्यांचा आयुष्यात योग्य ठिकाणी उपयोग व्हायला लागतो.



........
सचिन दाभाडे



Friday, April 9, 2021

उरूस आणि सिनेमा..!




माझं दहावी पर्यंत शिक्षण होईपर्यंत आम्ही बहिरगाव येथे राहत होतो. कन्नड पासून 5 ते 7 किमी अंतरावर असलेले हे एक समृद्ध आणि सुजलाम सुफलाम गाव. आईच्या बहिरगाव येथील सर्विसमुळे आमचे प्राथमिक शिक्षण बहिरगावला झाले. दरवर्षी कन्नडला उरूस भरायचा. वर्षभर टीव्हीवर गाणे पाहत पाहत मनात असलेल्या हिरोची सिनेमे उरसात केंव्हा येतील आणि येईल की नाही ही धाकधूक असायची. आवडत्या हिरोच्या चारपाच सिनेमांपैकी एक दोन तरी उरसात आले पाहिजे म्हणजे तेंव्हा ते बघता येतील म्हणून वर्षभर पाण्यात देव ठेवून बसलेलो असायचो आम्ही मनातल्या मनात. एका ऊरसात गोविंदाच्या कुलि नंबर वन साठी असेच देव पाण्यात ठेवून बसलो होतो मी. उरूस सुरू झाला आणि रोज मिठात बुडावलेले सडके बोर खायला बहिरगाववरून कन्नडला जाणाऱ्या माझ्या एका मित्राने खबर दिली की उरसात कुलि नंबर वन लागलाय रे म्हणून. आणि मग काय सांगावे, केवढा आनंद तो..! केवळ अवर्णनीय.. ! ..म्हणजे आता येणाऱ्या कुठल्याही दिवशी मी गोविंदाला पाहणार होतो. आता फक्त कुठल्या संध्याकाळी कूच करायचे ठेवढेच ठरायचे बाकी होते.

कितवीला होतो ते आठवत नाही, पण मोठी सायकल चालवता यायची. दोन मित्रांच्या सायकलींवर आम्ही दोन आणखी पाठीमागे बसून बहिरगावरून कन्नडला एका छोट्याश्या पांदीने निघालो. जातांना 'जब दिल ना लगे दिलदार हमारी गली आजाना' या गाण्यात काळा गॉगल घालून त्याच्या पाठीमागे लाल कपड्यात डान्स करणाऱ्या शंभर एक लेडीज डान्सर समोरून एक खांदा खाली करून डान्स करत जाणारा गोविंदा थोड्यावेळासाठीसुद्धा मनातून बाजूला हटलेला नव्हता. ध्यानीं मनी काष्टी पाषाणी फक्त गोविंदा होता. एवढा जर देव मनात असता तर तोही प्रसन्न झाला असता. उरसात पोहचल्या पोहचक्या डोळे भिरभिरत पोस्टरवर लाल कपड्यात गोविंदाला शोधायला लागले. आम्ही संध्याकाळी सातच्या सुमारास उरसात पोहचलो आणि तडक कुलि नंबर वनच्या पोस्टर खाली जाऊन उभे राहिलो. तिकीट खिडकीवर गेल्यावर लक्षात आले की पिक्चर सुरू होऊन अर्धा तास झालेला. पण थोडा ही उशीर न करता आम्ही लगेच तिकिटांच्या लाईन मधून बाजूला झालो कारण एक मिनिटही जाणे आम्हाला कुणालाच गवारा नव्हते. दुसरा कुठला बघायची मानसिकता नव्हती म्हणून पुढचे दोन तास उरूस पालथा घातला. आणि शेवटी ती वेळ आली पिवळ्या रंगाचे पातळ कागदाचे 4 तिकीट हातात आले. साडे तीन रुपयाचे एक असे 4 तिकिटे काढली होती . वर्षभर फक्त गाणं पाहून पाहून खच्चून समाधानी झालेलो मी कंबर खोसून पूर्ण सिनेमात गोविंदाचा गोंधळ बघायला तयार झालो होतो. अगदी रोम रोमच तयार झाला होता म्हणा ना..!

उरसाचा हा सगळा रोमांच अनुभवण्यासाठी बहिरगाववरून तरुण मुलांच्या टोळ्या रात्री जेवणं करून आपापल्या परीने नियोजन करून निघायच्या. रात्री सायकल वर मित्रांसोबत अडीअडचणीच्या रस्त्याने येऊन रात्रीचे शो पहायचे आणि सकाळी सकाळी किंवा मध्यरात्री परत गावी पोहचायचे याला सुरवातीला बरीच वर्ष घरच्यांकडून मला परवानगी नव्हती. पण जसे जसे मोठे होत गेलो तसे फक्त एकच सिनेमा पाहून रात्री बारा वाजेपर्यंत परतू, असा वादा केल्यावर परवानगी मिळणे सुरू झाले. यानंतर उरसासाठी जिवलग मित्रांसोबत बऱ्याच साहसी सफरी केल्या. यामध्ये साहस हा शब्द फक्त मला लागू व्हायचा बाकी मित्र एका तासात बोर झालं म्हणूनही कन्नडला जाऊन यायची डेअरिंग स्वतःजवळ बाळगून असायचे.

सुरवातीच्या काळात उरसासाठी वडील मला आणि लहान भावाला बहिरगाववरून दुपारी सायकल वर घेऊन यायचे व 3 ते 6 चा शो साईबाबा मध्ये बघितला की 6 ते 8 उरसात आणि मग रात्री परत गावी असा तो प्रोग्राम असायचा. वडिलांसोबतच्या उरसातील सफरीत उरसातील टॉकीजवर सिनेमे बघण्याची मौज अनुभवता येत नव्हती म्हणून थोडे आणखी मोठे होण्याची मनापासून वाट बघत होतो. जसे थोडे मोठे झालो, आम्हाला एकटेच डायरेक्ट उरसातील टॉकीजवर सिनेमे बघायची परवानगी मिळायला लागली आणि तिथून पुढे ही धूम सुरू झाली. जिवलग मित्र पक्या दापके, बाळ्या जाधव, संदिप्या जाधव, आणि परत्या भकड्या यांच्यासोबत पिंजऱ्यातून सुटल्यासारखा मी कन्नडच्या उरसाच्या दिशेने भन्नाट वेगाने निघायचो. वेगात वीर दौडले आम्ही 4 ते 5.

मजा होती, तुफान असा आनंद होता, साधने कमी होती पण आनंदाला पारावार नव्हता ...! 

हे सगळं आठवण्याचा कारण हे की 5 वर्षाची माझ्या मुलीने वरूण धवनचा कुलि नंबर वन मागच्या आठवड्यात (चुकून) पहिला आणि तेंव्हापासून ती दिवसातून दोन तीन वेळा पाहतेय, बर तिला त्यातील प्रत्येक सीन, डायलॉग यांचं भयंकर आकर्षण निर्माण झालेलं आम्ही सगळेच बघतोय. अतिशय कुतूहल आणि कौतुकाने जेंव्हा ती त्यातील सर्व सीन पुन्हा पुन्हा बघतेय तेंव्हा माझ्या आई आणि बायको दोघींना याचे मोठे कौतुक आणि कोडे पडलेय की अचानक कार्टून पाहणारी मुलगी एकदम कुलि नंबर वन हा सिनेमा इतका कसा एन्जॉय करतेय ते..

आता त्यांना काय सांगू वळणाच्या पाण्याबद्दल..!


.............….................
सचिन दाभाडे


Thursday, October 8, 2020

बॉईलिंग फ्रॉग ते स्वयंनेतृत्व..!



आपल्या संस्थेला, कंपनीला, कुटुंबाला, सहकाऱ्याला, आपल्या टीमला आणि स्वतःला एखाद्या अनप्रोडक्टिव्ह(अनुत्पादक) प्रोजेक्टमधून किंवा शक्य नसलेल्या मार्गावरून योग्य वेळी बाहेर काढायला तुम्हाला न जमणे किंवा ही योग्य वेळ ओळखता न येणे, हे स्वतःचा आणि तुमच्यातील नेतृत्व करण्याच्या क्षमतेच्या ऱ्हासाचे द्योतक आहे. आपण चुकीच्या फॉरमॅट मध्ये काम करतोय आणि नकळत त्यात आपण ट्रॅप होत जातोय हे समजायला बऱ्याचदा वेळ निघून जातो आणि जेंव्हा कळते की जे काही आपण केले ते अनुपयुक्त होते तेंव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड सुरू होते. आपण आपल्या स्वतःला, टीमला, संस्थेला, कंपनीला वाचवण्याची धडपड सुरू करतो  पण असंख्य वेळेला ही धडपड व्यर्थ ठरते कारण त्यातून बाहेर पडण्यासाठी जे धैर्य, हिंमत, प्रेरणा लागणार असते ती सर्व धडपड सध्या तुम्ही असलेल्या सिस्टीममध्ये आणि त्यामध्ये सुरक्षित राहण्यासाठी झिजवलेली असते. अशा वेळेला असह्यपणे जे होईल ते स्वतःसोबत होऊ देण्याची वेळ स्वतःवर येऊ देणे हेच बऱ्याच जणांना आयुष्याची आणि आपल्यात असलेल्या गुणांची फलश्रुती वाटायला लागते. 

हे असे खरेच आपल्या सोबत होते का ? यावर बिहेवीरिष्ठांनी (माणसाच्या वागणुकीवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ) अनेक संशोधने केली, अनेक प्रयोग केले, त्यापैकी Heinzmann या शास्त्रज्ञाने बेडकावर केलेल्या प्रयोग भन्नाट आहे. बेडूक हा थंड पाण्यात राहणारा प्राणी आहे, त्याला जर एकदम उष्ण पाण्यात टाकले तर तो त्यातून उडी मरेल किंवा त्यापासून दूर पळेल. पण पाणी हळू हळू उष्ण केल्यास तो तसे करेल का? तर उत्तर असे, एका जिवंत बेडकाला छोट्या पात्रात टाकले. त्यात पात्र पूर्ण भरून पाणी टाकले. त्या पात्रात तो बेडूक छान पैकी तरंगू लागला, पात्र मोठे नसल्याने त्याला हवं तेंव्हा तो त्यातून बाहेर उडी मारू शकेल असे. थोड्या वेळाने ते पात्र गॅस वर ठेवले जाते. सुरुवातीला पाणी कोमट होते. या बदलासोबत बेडूक समायोजन करून घेतो आणि पत्रात तसेच फिरत राहतो. दुसऱ्या फेजमधे काही वेळाने पाणी गरम व्हायला सुरुवात होते या छोट्या बदलात जरी बेडूक गोंधळून जातो, तरीही तो स्वतःच्या शरीराचे तापमान नियोजित करून परिस्थितीशी जुळवून घेतो. आता तिसऱ्या फेज मध्ये पाणी अतिशय कडक होते, ज्यामध्ये बेडकाला राहणे अतिशय कठीण होऊन बसणे सुरू होते. यावेळी बेडूक स्वतःची संपूर्ण ऊर्जा त्या कडक पाण्यापासून स्वतःला कसे जिवंत ठेवता येईल यात घालणे सुरू ठेवतो. शेवटच्या स्टेज मध्ये पाणी उकळणे सुरू होते व त्यात त्याला हालचाल करणेही अशक्य होऊन बसते, परिणामी यात बेडूक मारून पाण्यावर तरंगायला लागतो.

या प्रयोगाच्या शेवटी या अभ्यासकांना असा प्रश्न पडला की तिसऱ्या स्टेजला जेंव्हा पाण्याचे भयंकर चटके बसत असतांना पात्राचा आकार खूप लहान असूनही बेडूक पात्राच्या बाहेर का पडला नाही? जे त्याच्यासाठी अतिशय सोपे होते. याचे उत्तर काही विश्लेषणाअंती त्यांच्या हातात आले ते असे होते; बेडूक तिसऱ्या स्टेजमध्ये येईपर्यंत त्याची सर्व ऊर्जा व इच्छाशक्ती त्या उष्णतेशी समायोजन करण्यात संपलेली असते. बेडकाला पात्रामधून  सुरवातीला बाहेर पडणे हे जरी सोपे वाटत असले तरी त्याला त्याची काही गरज वाटत नाही, हळू हळू तिसऱ्या स्टेज पर्यंत निर्माण होणाऱ्या अड्व्हर्स परिस्थितीशी जुळवून घेणे हेच बेडकांचे प्रमुख ध्येय बनले. जेंव्हा शेवटच्या स्टेज मध्ये पाणी उकळायला लागले तेंव्हा बाहेर पडण्यासाठी उडी मारण्याचे धैर्य, प्रेरणा, आणि ऊर्जा संपलेली असते.

यातून बाहेर आलेले निष्कर्ष आपल्यातील प्रत्येकासाठी महत्वपूर्ण असे आहेत. प्रत्येकामधील इच्छाशक्ती, ऊर्जा, प्रेरणा ही आपल्या क्षमतेशी संबंधित क्षेत्रात योग्य वेळी वापरल्या नाहीत तर त्याचा ऱ्हास होणे वेगाने सुरू राहते. आपल्यामध्ये निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, ऊर्जा आणि धैर्य असेपर्यंत तो निर्णय स्वतःशी संबंधित उद्दिष्टासाठी घेता आला पाहिजे. म्हणून स्वतःतील ऊर्जेचा ऱ्हास होण्याअगोदरच तुम्हाला निर्णय घ्यायचाय, कारण एकदा का पाणी उकळायला लागले, की मग ते तेवढे सोपे नाही..!

टीप- या प्रयोगावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेय आणि त्यातील निष्कर्षाची विविधता ही कालांतराने सिद्धही झालीय. आपण यातून आपल्याला हवी असणारी शिकवण नक्कीच घेऊ शकतो, नाही का ?

सचिन दाभाडे
8390130362
www.sachindabhade.com


Wednesday, October 7, 2020





स्वतःच्या घरापासून दूर कुठे फिरायला गेल्यावर आपल्याला तेथील दृश्य पाहून एकदम अचंबित व्हायला होत आणि थोड्या वेळाने एकदम फ्रेश झाल्यासारखे वाटते, म्हणून लोक फ्रेश होण्यासाठी बऱ्याच दूर दूर जाऊन येतात आणि गेलेही पाहिजे. पण हा अनुभव बऱ्याच जणांना त्यांच्या जवळपास  असलेल्या वातावरणातून येत नाही. याचे कारण काय असेल ?.  

बाहेर गेल्यावर जेंव्हा आपण आपल्या जागेपासून तुटतो आणि नवीन ठिकाणी नवीन गोष्ट पाहतो तेंव्हा पाहण्याची प्रक्रिया ही जास्त फोकस असलेली असते, आपण काहीतरी नवीन पाहतोय अशा भूमिका यामागील कारण असते किंवा तसे गृहीतक घेऊनच आपण घराबाहेर पडलेलो असतो असे म्हणूयात, त्यामुळे जसे तुमचे बाहेरील निसर्गावर लक्ष केंद्रित होते, तेथील झाडं, नद्या, ओढे, बाजरी ज्वारीची शेतं, टेकड्या, डोंगरे, पायवाटा यांना तुम्ही नवीन म्हणून "पाहायला" लागतात आणि ते पाहण्याची प्रक्रिया सुरू होताच, तुमचे तुमच्या आयुषयातील मनस्ताप, वैताग, गोंधळापासून आपसूकच डिस्कनेक्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे जितका जास्त वेळ ते आपण पाहतो, तितका जास्त वेळ आपण या सगळ्यांपासून डिस्कनेक्ट असतो. ज्याक्षणी तुम्ही डिस्कनेक्ट झाला तुमच्या मेंदूमध्ये कार्यरत असणाऱ्या या मोठ्या ओझ्यावरून तुमचें लक्ष हटते आणि ते ओझे त्या वेळेसाठी किंवा क्षणासाठी नामशेष होते आणि तुम्हाला हलक हलक वाटायला लागते आणि आपण ताजेपणाची, जिवंतपणाची अनुभूती करायला लागतो.

ही अनुभूती खूप दूर जाऊन वरील सगळं पाहण्यानेच येईल असे काही नाही. आपल्या आजूबाजूच्या झाडांकडे, घराच्या बाजूला असलेल्या शेताकडे आणि त्यापलीकडे उभ्या असणाऱ्या झाडाकडे त्याखाली असलेल्या झोपडीकडे शांत चित्ताने पहा, घराच्या गच्चीवर जाऊन सूर्योदय आणि सूर्यास्त शांततेने पहा, त्यातील रंग छटा कधीच रोज असतात तशा नसणार, काहीतरी बदललेले असेल, ते डोळ्याने टिपता आले तर नक्की ठरवून टिपा. निसर्ग सगळीकडे सारखाच आनंद देणारा, उल्हासीत करणारा आहे. अगदी वाळवंट सुद्धा निसर्ग आहे आणि तोही बघायला लोक जातात, त्यामुळे तो बघितल्याने आनंद होतो हे जेवढे सत्य, तेवढेच सत्य हे की; आपण वेगळं काही बघतो आहे हा भावच आपल्याला त्यावर फोकस करतो आणि आपण डोक्यात असणाऱ्या नेहमीच्या ओझ्यापासून डिस्कनेक्ट होतो, त्यामुळे त्रास देणाऱ्या, नकारात्मकता निर्माण करणाऱ्या, अस्वस्थ आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या भावनेपासून आपसूक होणारे हे डिस्कनेक्शन मन हलक करणारे, आनंद देणारे आहे. त्यासाठी फार वेगळा इफर्ट घ्यावा लागत नाही.

सचिन दाभाडे
8390130362
www.sachindabhade.com

Tuesday, June 16, 2020

"दुसरी स्क्रिप्ट"



अक्षय कुमार सुनील शेट्टी हे माझे लहानपणीचे सगळ्यात आवडते हिरो कारण ते अफलातून फाईट करायचे. ते फाईट करायला लागल्यावर कितीही गुंड आले तरी मला त्यांच्या सुरक्षिततेबद्दल कधीच चिंता वाटायची नाही. ते निपटून घेतील असाच फील असायचा त्यांना पडद्यावर पाहतांना. जसा जसा मोठा होत गेलो तसे तसे अक्षय कुमारचे मारधाडीचे चित्रपट तेव्हढेसे अवडेना झाले. त्याच्या पेक्षा अजय देवगणला पाहणं बरं वाटायला लागलं. एक काळ असा आला की त्याचे सिनेमे साधारणतः फ्लॉपच्या कॅटेगिरीत जाणे सुरू झाले होते. मला माहीत होते की हे का होत असेल. त्याला आता सतत फाईट करत पाहणेही प्रेक्षकांना नकोसे झाले असेल. काय वेळ असेल ती जेंव्हा त्याला एक हिरो म्हणून हे अनुभव येत असतील. काही वर्षाने एक मित्रा मला भेटला, तो नुकताच एक सिनेमा पाहून येत होता. मी विचारले काय झाले हसायला. तो हसता हसता म्हणाला, अरे भयंकर भन्नाट सिनेमा पाहून आलोय. माझं प्रश्नचिन्ह तसेच, तो म्हणाला; मी सारख तीन तास पोट धरून हसतोय. एक नवीन सिनेमा आहे "हेरा फेरी" म्हणून, तो बघून येतोय,इतकी तुफान कॉमेडी आहे की बस. मी विचारले कोण आहे हिरो. तो म्हणाला अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी. मला एकदम धक्का बसला..! सुरवातीला विश्वास बसेना अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी, हे कसं शक्य आहे. या दोघांचा आणि कॉमेडीचा काय संबंध. बर केली जरी असेल तरी पोट धरून हसायला लावेल अशी कशी शक्य आहे ?. तो म्हणाला विश्वास नसेल तर आजच बघून घे. अर्थात मी लगेच विश्वास ठेवणार नव्हतोच. 15 दिवस बऱ्याच जणांकडून जेंव्हा हीच प्रतिक्रिया ऐकली तेंव्हा औरंगाबादच्या आंबा अप्सरामध्ये मी शेवटी हेरा फेरी पाहायला गेलोच.

बाहेर आलो तेंव्हा हिंदी चित्रपट सृष्टीतील एक वेगळ्या धाटणीच्या विनोदी सिनेमांचा सुत्रपात करणारा अश्या नव्या प्रकारचा कलाकृतीचा अविभाज्य भाग होऊनच बाहेर आलो. एक भन्नाट कॉमेडी, अफलातून ऍक्टिगं, कुठेही विनोदाचे प्याचप नाही, तर अक्खा सिनेमाचं असा काहीं बांधला होता की विसंगती आणि कॅरेक्टर्सची बेमालूम जुगलबंदी यांनी तुम्ही सतत हसत राहता. जेंव्हा हसत नसला तेंव्हा पुन्हा लगेच हसावे लागणार म्हणून तुमचे तोंड उघडेच राहील अशी संवादाची पेरणी. एकूण काय तर विनोद सिनेमाचा माईल स्टोन.. मैलाचा दगड आणि त्यात आश्चर्य म्हणजे हिरो कोण तर मारधाडीचे माझ्या मनातील आयकॉन अक्षय आणि सुनील. पण आता ते तसे राहिले नव्हते, त्यांना पाहिलं की आता माझ्या मनात हास्याची लकेर उमठायची. वातावरण बदललं होत.

मला लोक ऍक्शन स्टार समजतात म्हणून मी कॉमेडी कारण कसं शक्य आहे असे अक्षय म्हणाला असता तर आता तो आपल्याला पडद्यावर कदाचित दिसला नसता. माझ्या चाहत्यांच्या मनातील माझ्या इमेजला धक्का लागू नये म्हणून तो सतत ऍक्शन मुव्ही करत राहिला असता कदाचित अक्षय काळाच्या गर्तेत केंव्हाच गायब झाला असता. पण त्याने एवढ्या वर्षेपासून निर्माण केलेल्या स्वतःच्या ऍक्शन हिरोच्या प्रतिमेला स्वतःच असा काही सुरुंग लावला की हा ऍक्शन हिरो की कॉमेडी हिरो हा प्रश्नच लोकांना पडू नये. प्रेक्षकांना तो दोन्ही ही रुपात आवडू लागला.

खऱ्या हिरोला माहीत असते, तो एक सामान्य माणूसच आहे. त्याने केलेलं सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नाविन्यपूर्ण कृतीच त्याला प्रेक्षकांच्या मनाचे सम्राटपद बहाल करीत असते. तो मोठ्या सामर्थ्याने त्या प्रतिमा घडवतोही आणि भविष्याचा अंदाज घेऊन त्या प्रतिमेला स्वतः सुरुंग लावायलाही घाबरत नाही. कारण त्याला एक गोष्ट माहीत असते, हे जर त्याने बनवलय, तर ते मोडून दुसरेही तोच बनवू शकतो. आणि हाच भाव त्याला हिरो बनावत असतो, सुपरहीरो बनवत असतो...!

तुमच्या आयुष्याचा एखादा सिनेमा आपटला की गलितगात्र होण्याची गरज नाही. तुमची हिरो प्रतिमा नष्ट होईल याची भीती पण बाळगण्याचे कारण नाही. दुसरी स्क्रिप्ट लिहायला हातात घ्या.

हो दुसरी स्क्रिप्ट...!

...............

सचिन दाभाडे

Sunday, April 19, 2020


प्राचीन काळात राज्याच्या सैन्यासाठी काम करणाऱ्या लोहाराकडे दोन प्रकारचे साहित्य बनवण्याचे काम असायचे. पाहिले म्हणजे तलवारी आणि भाले बनवणे आणि दुसरे म्हणजे हातकड्या आणि साखळदंड बनवणे. पहिल्या प्रकारचे, म्हणजे तलवारी व भले बनवण्याचे काम, तेंव्हाच जास्त जोरात असायचे जेंव्हा, राज्य हे युध्दाच्या व विस्तारीकरण्याच्या धोरणात असायचे. राज्याच्या विस्तारासाठी होणारे युध्ये ही अश्या हत्यारे निर्मितीसाठी मुख्य प्रेरणा असायची.

आणि हातकड्या व साखळदंड या सारख्या दुसऱ्या प्रकारच्या साहित्य निर्मितीचे काम लोहार तेंव्हाच करायचा जेंव्हा राज्य आपल्या विस्तारीकरणाच्या क्षमतेच्या अत्युच्य टोकावर आहे व राज्याला आता फक्त जे मिळवलं आहे किंवा ताब्यात आहे, ते व्यवस्थित टिकवायचे आहे. अशा अवस्थेत त्यावेळेला शासन करण्यासाठी राज्याला तलवारीची नाही तर हातकड्या आणि साखळदंडाची जास्त गरज भासे. रोमन साम्राज्यातील बऱ्याच घटना उदाहरणादाखल घेता येतील. जेव्हा रोमन साम्राज्य आपल्या यश आणि वाढीच्या सर्वोच्च स्थानावर होते, त्यावेळी लोखंडापासून हत्यारे बनवणाऱ्या कारागिरवर अधिकाऱ्यांची प्रचंड करडी नजर असे आणि त्यांना अतिशय स्पष्टपणे लढण्यासाठी लागणारी हत्यारे बनवायला बंदी होती. कुणीही लोहार आपल्या मनाप्रमाणे तलवारी भाले शासनाच्या अधिकृत मागणीशिवाय बनवू शकत नसे.

लोहाराच्या वर्कशॉपमधील या दोन प्रकारच्या साहित्याच्या उत्पादनावरून त्या त्या साम्राज्याच्या परिस्थितीतीची जाणीव येऊ शकते. पहिल्या प्रकारचे उत्पादन हे हिंमत, ऊर्जा, प्रेरणा या गोष्टींना दर्शवतेय, तर दुसऱ्याप्रकारचे उत्पादन हे अडवणूक, दबाव, नियम, बंधन या गोष्टीला दर्शवतेय.

एखाद्या संस्था, समाज किंवा व्यक्तीमध्ये कुठल्या प्रकारच्या प्रेरणा काम करताय. पहिल्या प्रकारच्या की दुसऱ्या प्रकारच्या ?
यापैकी ज्यामध्ये अडवणूक, दबाव, नियम व बंधन या संबंधीच्या भावना वेगाने काम करताय असे आढळले, तर त्या संस्थेचे, समाजाचे किंवा व्यक्तीचे विविध अर्थाने विस्तारण्याचे प्रयोजन संपले आहे असे समजायला काही हरकत नाही. याउलट हिंमत, ऊर्जा, प्रेरणा या भावना कुठल्याही संस्थेत, समाजात, किंवा व्यक्तीमध्ये वेगाने काम करताय असे लक्षात आले, तर वाढ होण्यासाठीची सर्वात सुपीक जागा ती आहे असे मानून चला.

तुम्ही जिथे आहात तिथे यापैकी काय होते..?

............................
सचिन दाभाडे

Wednesday, April 15, 2020

युव्हल नोआ हरारीचे सेपियन्स - मानवी उत्क्रांतीची उत्कंठापूर्वक पुनर्रचना


स्वतःला काय हवंय  हे स्वतःलाच ठाऊक नसलेल्या असमाधानी देवापेक्षा अधिक धोकादायक काय असू शकते ? या प्रश्नाने युव्हाल नोआ हरारीचे सेपियन्स हे साधारणतः ४०० पानांचे पुस्तक वाचकाच्या डोक्यात व्यक्ती म्हणून आत्मपरीक्षणाचे सत्र सुरु करूनच थांबते. आपल्या इच्छा आकांशांची दिशा कोणती असावी अशी आपली इच्छा आहे ? या प्रश्नाने जर तुम्हाला धास्ती भरली नसेल तर तुम्ही २१व्या शतकात येणाऱ्या मूळ प्रश्नाला आणखी हात घातलाच नाही असेच म्हणावे लागेल. युव्हाल नोआ हरारी चे सेपियन्स म्हणजे, माणूस कोण आहे आणि कुठून आलाय याचा मानववंशशास्त्रीय अभ्यासाच्या आधाराने सुरु झालेला नाविन्यपूर्ण प्रवास, जो भौतिकशाश्त्र, रसायनशाश्त्रच्या मार्गे इतिहासाच्या विश्लेषण पद्धतीपर्यंत येऊन थांबताना दिसतो. हे पुस्तक हातात घेताना रुक्ष अश्या प्राचीन अष्मयुगीन कालखंडातील न समाजणाऱ्या संकल्पनातून जावे लागेल असे वाटत असतांनाच हरारी आपल्या रंजक शैलीने आपला गैरसमज दूर करतात. अर्थात वाचकाला पुस्तक हातात घेण्याअगोदर एक महत्वाची सूचना करेल, की सुरवात झाल्यावर अतिशय समजदारीने क्लिष्ट वाटणाऱ्या काही संकल्पना तुम्हाला आपल्याशा कराव्या लागतील. पहिल्या एकदोन प्रकरणात त्यांच्याशी एकदा गट्टी जमली की मग पुढचा प्रवास सोपा होतो आणि हरारी यांचे समग्र आकलन समजायला लागल्यावर चकित होण्याची मालिकाच सुरु होते. हरारी यांच्या नजरेतील उत्क्रांतीची ही गंमत समजून घेण्यासारखी आहे ज्यातून आपल्या म्हणजेच आपले पूर्वज सेपियन्स मानव यांचा भूतकाळापासून उत्क्रांत होत आलेल्या वर्तनाचा आणि त्याद्वारे आजचा मानव निर्माण करीत असलेल्या भविष्याचा धक्कादायक खुलासा आपल्यासमोर रंजक पद्धतीने समोर येईल.  

हरारी ३ स्टेप मध्ये मानवाची उत्क्रांती झाल्याचे दाखवतात १ बोधात्मक क्रांती, २ कृषी क्रांती,३ वैज्ञानिक क्रांती.  भूतकाळात मानव उत्क्रांत होत असताना फक्त सेपियन्स हीच मानवाची जात विकसित झाली आणि तिच्या द्वारेच आजचा माणूस निर्माण झाला पण हे होत असतांना  होमो इरेक्टस, होमो नियांडरथल,या इतर मानवी आणि वैषिठ्यपुर्ण जमाती नामशेष झाल्या. हरारी मानववंशशाश्त्राचे दाखले देत मानवी उत्क्रांतीची मुख्य नस दाबतात पण तीही कौशल्य आणि ज्ञान यांच्या बेमालूम मिश्रणातून. १२ हजार वर्षांपूर्वी कृषी क्रांती झाली यापूर्वी मानव कसा होता त्याच्या श्रद्धा, नातेसंबंधाची चौकट या आणि आणखी अनेक गोष्टीबद्दल कुठलाही परिपूर्ण असा पुरावा नसल्याने मानववंशशास्त्राकडून हा भाग मोठ्या प्रमाणावर गृहीतावरच  उभा आहे. बऱ्याच मांडण्याबद्दल शाश्त्रज्ञांमध्ये वाद आहे.. हररी म्हणतात २५ लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानवाची जात अस्तित्वात आल्यापासून ते ७० हजार वर्षेपर्यंत होमो कुळातील सर्व मानवी जाती एकमेकांशी व निसर्गाशी जगण्याचा संघर्ष करत अस्तित्व  टिकवून  होत्या पण ७० हजार वर्षांपूर्वी सेपियन्स यांनी स्वतःमध्ये असे काही विकसित केले ज्यामुळे त्यांनी यासृष्टीवर आपला ताबा मिळवण्यात  इरेक्टस आणि  नियांडरथल या आपल्या प्रतिस्पर्ध्याला मागे सोडले व ती होती सेपियन्स मानवाला मिळालेली सर्वोच्च देणगी,  कल्पना करू शकण्याची त्याची अद्भुत शक्ती. या कल्पनेतूनच सेपियन्सनि पुराणकथा निर्मिल्या या कल्पित कथांमुळे ७० हजार वर्षांपासून सेपियन्स यांनी अनेक अवास्तव सत्ये, मिथ्स उभी केली ज्याच्या आधारावर त्याने कुटुंबाला, समाजाला, देशाला 'विश्वास'  ठेवायला भाग पाडले. हा कथा निर्मितीचा उद्योग आजपर्यंत सुरूय आणि तीच आपली खरी ओळख आहे असे ते म्हणतात यासाठीच सेपियन्स ने भाषेचा शोध कसा लावला हे हरारी  सांगतात.

समाजशास्त्राच्या नियमानुसार एक मानव साधारणतः १५० च्या आसपास व्यक्तीसोबत आपले नातेसंबंध निर्माण करू शकतो व ते टिकावू शकतो, पण त्या पुढे जायचे म्हणजे शक्य नाही. ही अडचण मानवी समाजनिर्मितीच्या कामातील मोठा अडथळा होती. पण यावर एक उपाय सेपियन्स यांना  सापडला तो म्हणजे समान पुराणकथा निर्मिती. यासाठी त्यांनी भाषेचा शोध लावला. सेपियन्स त्या कथा आधारे एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांसोबत सहकार्य करू लागले. आणि या सहकार्याच्या जोरावर त्याने बाकी प्रजातीचा संहार केला. आजही ज्या जगात आपण जगतो त्यामध्ये आपला धर्म, सांस्कृतिक कल्पना, कॉर्पोरेट कंपन्या, कायदे, समानतेची कल्पना, राष्ट्रवाद अगदी आपण कंपन्यांना करून देत असलेली वेगळी ओळख. या एकप्रकारच्या पुराणकथाच आहेत, ज्या आपल्याला आपले पूर्वज सेपियनस यांच्या कडून  मिळालेल्या आहेत. त्या कल्पना शक्तीच्या देणगीचा आपण प्रचंड विकास केला आहे.

हरारी असंख्य उदाहरणे देत जातात. आदिवासि लोक आणी त्यांच्या कल्पित कथां यापासून ते ख्रिश्चन धर्मातील विचार या सर्व काल्पनिक गृहीतकांच्या आधारे मोठा समूह एक येतो. एकसारखा विचार व कृती ही करतो.   यावरच हजारो वर्षपूर्वीचा आदिवासी आणि आताचा ख्रिश्चन व्यक्ती यांचा समूह एकत्र बांधलेला असतो. तेच वेगळ्या प्रकारे आजच्या आधुनिक सेपियन्सच्या  कोर्पोरेट  कंपन्या आणि वकील करताना दिसतात. तेही कायद्याचे ज्ञान उभे करून राज्याच्या कल्पनेआधारे कंपनी नावाची कथा उभी करून त्यावर सामान्य लोकांनाच विश्वास निर्माण करतात व या विश्वासातून हजारो लोक एका ध्येयसाठीच त्वेषाने काम करायला लागतात. ७० हजार वर्षांपूर्वीचा आपला पूर्वज ही अशाच प्रकारे वास्तवावर (म्हणजे झाडे दगड प्राणी यावर) न बोलता कल्पनेवर बोलायला लागला. ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्याची कलपना करायला लागला.त्या द्वारे कल्पित कथा उभ्या करायला लागला.ज्यातून सेपियन्स एकत्र आला. कथेतून त्याने चिन्ह व्यवस्था निर्माण केली आणि त्याच्याशी बाकीच्या सेपियन्सची भावना जोडली. आजही समाज बांधणीच्या ध्येयासाठी अशाच कथा उभ्या केल्या जातात. धर्म बांधणीच्या ध्येयासाठी अश्याच पुराणकथा उभ्या केल्या जातात, राष्ट्र ही तर २००  वर्षा पूर्वी निर्माण  झालेली अगदी अलीकडची कथा. काळाच्या ओघात कथांचे सादरीकरण विलक्षण क्लिष्ट झाले. त्याच्या अनेक उपपत्ती ही त्यामुळे निर्माण झाल्याय. या सर्व प्रक्रियेला हरारी  मानवी उत्क्रांतीतील बोधात्मक क्रांती असे म्हणतात व हीच मांडणी सेपियन्स या पुस्तकाचा आत्मा आहे. 

हरारीचे विशलेषण पुढे पुढे म्हणजेच, इसवी सनानंतरच्या  काळातील दाखले देतांना  आणखी सर्वव्यापी होत जाते आणि वाचक म्हणून आपले डोके गरगरते. ते म्हणतात क्रांती झाल्यापासूम सेपियन्स अश्या दुहेरी वास्तवात जगत आहे. एका बाजूला झाड, सिंह यासारखे वास्तव, तर दुसऱ्या बाजूला देव, राष्ट्र, यांच्यासरखं कल्पित वास्तव जसा जसा काळ लोटला तसे हे कल्पित वास्तव मूळ वास्तवापेक्षा जास्त  बलवान झालंय, अशी मांडणी ते विविध अभ्यास आणि संकल्पनांच्या आधारे करतात. मानवी विकासात साधारणतः  वर्तन बदल तेंव्हाच घडले जेंव्हा जुनकीय बदल घडले, पण बोधात्मक क्रांती हा असा प्रकार होता जी  झाल्यानंतर  वर्तन बदल फार झपाट्याने घडले, पण हे घडत असतांना  सेपियन्समध्ये मात्र जुनकीय बदल घडले नाहीत. याचा अर्थ हा होता कि सुरुवातीचे सेपियन्स आणि आजचे, आपण यामध्ये जुनकीय असा फार फरक नाही. आपण जेंव्हा एकटे असतो तेंव्हा आपली असणारी भावनिक आणि मानसिक वागणूक ही आपले मूळ  सेपियन्स किंवा मोठ्या प्रमाणावर चिंपांझीशी मिळती जुळती आहे हे सिद्ध होते. फक्त आजचे सेपियन्स म्हणजेच आपण जेंव्हा समूहात एकत्र येतो तेंव्हा आपल्या वर्तनात बदल होतो आणि आपण आपल्याशी संबंधित समाजात सांगितलेल्या विविध पुराणकथेप्रमाणे वर्तन करायला लागतो. हेच वर्तन आपल्याला बाकी सगळ्या प्राण्यापासून वेगळे करते आणि अन्नसाखळीच्या सर्वोच्य पदावर मानवाला नेवून बसवते.अनेक कुटुंबांना आणी गटांना एकत्र  बांधून ठेवणारा पुराकथांची कला  हीच  चिंपांझी आणि आपण यामधला फरक आहे.  याच कथांनी आपल्याला नवनिर्मितीचा स्वामी बनवलं आहे.

अनेक नोंदीमधून सेपियन्स हे परिस्थितिकीला क्रमाक्रमाने ठार करणाऱ्या मारेकऱ्यासारखे दिसतात आपले पूर्वज निसर्गाशी सुखसंवाद करुन राहत होते. या  पर्यावरणप्रेमींच्या   म्हणण्यावर   विश्वास  ठेवू नका असे ते एके ठिकाणी म्हणतात, कारण औद्योगिक  क्रांतीच्या कितीतरी पूर्वी सेपियन्सनी बहुसंख्य वनस्पती आणि प्राणी यांच्या प्रजाती नष्ट केल्या आहेत. जीवविज्ञानच्या इतिवृत्तात सर्वात संहारक प्राणी म्हणून आपली नोंद झाली आहे. हे गृहीतक ते ऑस्ट्रेलिया आणि इतर बेटावरील सेपियन्स चे आगमन होऊन  प्राणी जाती सेपियन्सने नष्ट करून तेथील अन्न  साखळी ४५ हजार वर्षांपूर्वी नष्ट केली व त्या खंडातील अन्नसाखळीतील तो सर्वोच्च पदावर गेला असे मांडताना  करतात. सेपियन्सचा  हा प्रवास अजूनही थांबलेला नाही. माणसे एका छत्राखाली एका विचाराखाली एका व्यवस्थेखाली आणण्याचा त्याचा प्रयत्न आणखी सुरु आहे. या सर्व प्रक्रिया अस्थित्वात याव्या म्हणून या उत्क्रांतीच्या प्रकियेत सेपियन्सनी  पैशाची संकल्पना कशा प्रक्रियेतून निर्माण केली ज्यामुळे महाकाय साम्रज्य उभारणीसाठी पार्श्वभूमी उभी केली गेली, याची मांडणी वाचायला खूप उद्बोधक आहे . यासंदर्भाने मागील ३ हजार वर्षांमध्ये साम्राज्ये बळकट होण्यासाठी धर्माचा आधार आणि त्याअनुषंगाने येणाऱ्या कथेचा पाया कसा उभा राहिला या सर्वांचं विश्लेषण मोठया अभ्यासपूर्ण आणि मनोरंजक शैलीने हरारी करतात व तीच या लेखनाची जमेची बाजू आहे.

मानवाने उत्क्रांत होत असतांना  सगळ्यांना एकत्र मात्र केलेय, पण वैयत्तिक सुख समाधानाची उद्दिष्ठे किती प्राप्त केलीय याबद्दल गंभीर प्रश्न वाचकांसमोर ठेवून हरारी आपली लेखणी थांबवतात. सामाजिक शाश्त्राच्या अभ्यासकांना हा हायपोथेसिस तसा अगदीच नवा नाही पण हरारी ज्या सूक्ष्मपणे आणि वैज्ञानिकपणे आपले म्हणणे मानवाच्या उत्क्रांतीच्या सुरवातीच्या टप्यापासून जोडत जोडत आणतात आणि त्याचा शेवट औद्योगिक क्रांतीच्या अत्युच्य म्हणता येईल अशा इंटेलिजंट डिझाईन म्हणजे बौद्धिक संकल्पन या टप्प्यापर्यंत घेवून येतात जिथे सेपियन्स हे जीवविज्ञानच्या घालून दिलेल्या मर्यादा मोडायला ही सिद्ध झालाय असे दिसते हे त्यांचे म्हणणे एक वेगळा विचार देते. माणसाचे (सेपियन्सचे) हे देवत्व त्याला तारेल कि मारेल हे आता बघायचे आहे. 

 

…………………………………..

सचिन दाभाडे

Friday, April 10, 2020

'फ्राईड'


'माझ्यावर पुस्तक कृपया लिहू नकोस तर माझ्यामुळे पुस्तक लिही'. नेटफ्लिक्स वरील 'फ्राईड' या सिग्मड फ्राईड च्या जीवनावर आधारित सुरवातीच्या कालखंडातील प्लॉट असलेली या सिरीजमधील हे फ्राईडच्या पेशंटच्या तोंडून आलेले वाक्य पूर्ण सिरीज कशी समजून घ्यायचीय याचा दृष्टिकोनच देऊन जाते. पूर्ण सिरीजमध्ये ही केस सोडवताना शेवटी त्यामध्ये भावनिकरित्या गुंतलेला फ्राईड त्याच्या पेशंटला म्हणतो, तुझा फोटो सरकारने पेपरमध्ये छापून तुला अटक करण्याचे सांगितलंय, तर आता तू काय करशील, तेंव्हा पेशंट म्हणते, की आता मला लोक ओळखतील त्यामुळे मी आता खरी फ्री झालीय, आता कुठलाही नकारात्मक विचार मला ड्राईव्ह करू शकणार नाही कारण तो विचार आता माझी शक्ती झालाय, कारण तो विचार नकारात्मक आहे हे मी ओळखलंय आणि हे झालय तुझ्यामुळेच. मी एक केस म्हणून तुझ्या आयुष्यासाठी आता संपली पाहिजे त्यामुळे तू दुसऱ्या केससाठी तयार रहा.



सगळ्या भागांपैकी शेवट मला खूपच आवडला आणि अनेक अर्थाने प्रेरणा देणारा वाटला. घरी येत असतांना फ्राईडच्या डोक्यात असलेला विचार स्पष्ट होत जातात. जे काँशिअस आणि सबकाँशिअस विचारांचे सुंदर असे स्पष्टीकरण आहे. माणसाच्या सबकाँशिअस मेंदूमध्ये त्यांच्या न बोलल्या गेल्याला अव्यक्त अश्या अनेक इच्छा, आकांशा, विचार असतात आणि त्या तुम्हाला तुमच्या नकळत आकार देत असतात. अंधाऱ्या खोलीत तुम्हाला काही दिसत नाही म्हणजे तिथे काहीच नाही असे होत नाही फक्त त्या तुम्हाला अंधारात दिसत नाही एवढेच. तसेच तुमच्या उघड्या डोळ्यांनी प्रकाशात दिसत असलेला भाग हा तुमचा काँशिअस भाग आहे. तर अंधारात न दिसणारा हा अनकाँशिअस भाग. हाच न दिसणारा भाग मोठया प्रमाणावर तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असतो. तुमच्या अनेक कृतीवर प्रभाव पाडत असतो. जर या अंधाऱ्या भागाला आपल्याला बघता आले किंवा ओळखता आले, तर आपल्याला आपल्यातील कमकुवत बाबींचे स्पष्टीकरणे मिळतील.

मानसशास्त्राचा इतिहास हा तसा फार जुना असा नाही साधारणतः 200 वर्षाची शास्त्रीय पार्श्वभूमी असलेली ही विद्याशाखा फ्राईड ने 360 डिग्री मध्ये बदलवली आहे. भानामती, जादूटोणा, भुताचा प्रभाव यासारख्या सागळ्या अज्ञानी कल्पनांच्या चौकटीत मानसिक रोग्यांचे निदान व उपचार अडकलेले असतांना एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी मध्य युरोपात त्यांच्यावर होणारे उपचारही अतिशय क्रूर अशा स्वरूपाचेच होते आणि अश्याच कालखंडाचे बरचसं चित्रण या सिरीजमध्ये आपल्याला दिसते.

सिगमंड फ्राईड ने सुरवातीला हिप्नॉसिसच्या वापराकडून (फ्राईड करिअरच्या सुरवातीला हिप्नॉसिसच्या प्रभावात आला होता पण नंतर त्याला या अभ्यासात शास्त्रीयता वाटली नाही) सबकाँशिअस माईंडच्या विश्लेषणाकडे वळवलेला मोर्चा हा मानसशास्त्रीय अभ्यासाच्या इतिहासात क्रांतिकारक ठरणार होता आणि त्यातून अभ्यासकांची एक मोठी परंपरा उभी राहिली. फ्राईडच्या हिप्नॉसिसच्या अभ्यासाच्या मध्यावर कुठेतरी एका घटनेवर आधारलेली ही कथा संपते. ज्यात फ्राईडच्या वैयक्तिक आयुष्याचे काही तथ्ये ही दाखवण्यात आलीय. या क्रांतिकारक मानसशास्त्रज्ञाच्या सुरुवातीच्या आयुष्यातील भागावर आधारित असलेली ही वेब सिरीज बघावी अशीच आहे.


.....................
सचिन दाभाडे

Wednesday, April 1, 2020

'यु टर्न'


हल्ले अटॅक लोकांचे मृत्यू हा माहितीचा भाग म्हणून घ्यावा की संवेदनेचा भाग म्हणून घ्यावा यावर वेगवेगळी मते असू शकतात. पण याही उपर गेल्या महिन्याभरापासून आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या च घरात एकदुसऱ्याला बाहेर न पडण्याचा आणि त्याचे भयानक दुष्परिणाम आपापल्या पद्धतीने सांगताय एकमेकांना सांगण्याचे प्रमाण वाढलंय हे लक्षात येण्यासारखं आहे. माणस एकमेकांच्या संपर्कात आली तर जिवाला धोका आहे, बाहेर जाण्यास बंदी आहे, सगळी ऑफिसेस संस्था बंद आहे, देश थांबलाय...!

हे सगळं स्वप्नं नसून खरचं घडतंय. दुपारी समजा झोपलेलो असलो आणि जाग जेंव्हा येते तेंव्हा असे वाटतंय की हा स्वप्नाचाच भाग होता पण खरं म्हणजे झोपेमुळेच तर या वास्तवातून ब्रेक मिळाला होता हे थोड्या वेळात समजते. पृथ्वीच्या पाठीवर एवढी भयंकर युद्धे झालीय अगदी मागच्याच शतकात दोन भयंकर जीवघेणी महायुद्ध झालीय. या महायुध्दात हजारो माणसे मेलीत, पण त्याबद्दल वाचतांना किंवा माहिती घेतांना याचा वास्तवाशी संबंध असल्याचा फील आला नाही.कुठेतरी दुसऱ्या जगाशी संबंधित किंवा एखादा हॉलीवूडचा मुव्ही बघतांना जे नावीन्य किंवा थ्रिल याव असच काहीतरी या घटना घडतांना रिस्पॉन्स गेला असेल.

काही प्रश्नांची उत्तरे लिहायचीय किंवा, यावर्षात काय झालं, याचं ज्ञान मला आहे यापलीकडे या घटनांत काही असेल अस वाटलंच नाही किंवा वाटण्याचे कारणही नसेल कदाचित. तेलावरून अनेक युद्धे, इराण इराक युद्ध, गल्फ वॉर, कुवेत वॉर, नायगर डेल्ट मध्ये सध्या चालू असलेले झगडे या आणि अशांच्या बातम्या लहानपनापासून पेपर मध्ये वाचायला मिळायच्या. या युद्धात माणसं मरायच्या खबरा यायच्या. रशिया अमेरिकेच्या शीत युद्धाच्या परिणामामुळे तिसऱ्या जगातील राष्ट्रे कशी बळी पडताय, वेगवेगळ्या दबाव तंत्रामुळे युद्धाची भयंकर साधने निर्माण केली जाताय याच्या बातम्या नेहमी कुठल्यानं कुठल्या माध्यमातून येताच राहिल्याय.

चीन पाकिस्थानशी युध्दाच्या बाता तर चहाच्या घोटासोबत कित्येक वेळा मित्रांसोबत मारल्याचे आठवतेय त्यात किती माणसांची कुर्बानी देऊन आपण परिणामाचा अंदाजही मनातल्या मनात तयार केलाय नियोजन. पण एवढं सगळं भयंकर घडत असतांना किंवा त्यावर विचार करत असताना मला भीती अशी कधी वाटलीच नाही किंवा वाटायचं कारण नव्हते कारण ती माहिती होती. एक विचार असा ही होता, एवढी लोकसंख्या वाढलीय, तर संसाधन अपुरे पडायला लागल्यावर माणसे काय करतील. एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या कशा प्रकारच्या असतील याचाही वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून झालेला होता.

जग हे तिसऱ्या महायुद्धापर्यंत येऊन थांबलय. ते पाण्यासाठी होईल आणि या युद्धात अणुबॉम्बचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊन सर्व पृथ्वी नष्ट होईल हे मी माझ्या मित्रांना चटणीसोबत पापड लावून खातांना अगदी कन्फर्म सांगितलंय आणि ते सांगताना मला भीती किंवा अस्वस्थतेचे भाव होते असे काही आठवत नाही.

माणसे मरतात, त्यांना कोण मारतो, कशासाठी मारतो हा भीतीचा विषय नसून ज्ञान मिळविण्याचा भाग आहे. तोच पुढेपुढे विकसित होत गेला. आर्थिक जग, विकास, जागतिकीकरण, खाजगीकरण, बेकारी, बँका, विविध राज्ये व त्याचे मुद्दे याबाबद्दलचे ज्ञान वाढत होते. मध्येच फटीकनेस आला की पर्यावरण आणि त्याची गरज यावरही थोडा वेळात वेळ काढून विचार केलाय.

जर भविष्यात जग लढलेच तर कुठल्या साधनांच्या आधारे लढेल, यावर अधिक अपडेट होण्याचा माझा प्रयत्न मला व्यापारातून देश एकमेकांनाची गोची करून वेगवेगळ्या मार्गे गळचेपी करतील इथपासून, बायोवॉरही भविष्यात कधीतरी होणारी घटना आहेच, ते होऊ शकते आणि हे सांगताना जर्मनी, अमेरिका, चीन, रशिया, स्पेन सारखे राष्ट्रे कशी बायोकेमिकल वेपन्स करण्यात गुंतली आहे, याबद्द्ल सांगून मी अपडेट आहे याची जाणीव होऊन प्रेरित झाल्याचं मला नक्की आठवतंय.

म्हणजे भीती अशी कधी वाटलीच नाही. अधिक माहिती, अधिक डेटा, सगळ्यांच माहितीच वेळोवेळी स्मरण, योग्य वेळी त्याचं परफेक्ट सादरीकरण. सगळं कसं अगदी सराईतपणे.

मागचे 20 दिवसही तसे काही वेगळे नाहीत.पूर्ण घरात आहे. फक्त काही महत्वाचे बदल आहेत.  नकारात्मक बातम्यापासून दूर राहता यावे म्हणून मी माहिती मिळवणे बंद केलेय. आणि हो भीती वाटायला लागलीय.

.........................
सचिन दाभाडे

Tuesday, March 31, 2020

हे युद्ध आहे विरुद्ध..!



आपल्याला  घरात थांबण्याचे एवढे टेंशन का येतेय माहितीय का ?, म्हणजे नेमके काय आहे जे तुम्हाला सतत बाहेर जाण्यास बाध्य करतंय.  शासनाने  एवढे कडक आदेश देऊनही आपल्यापैकी बरीच जनता घरात थांबायला अगदी झुगारूनच देतेय. याच कारण शोधतांना एक महत्वपूर्ण बाबीचा आधार घेऊया, म्हणजे हा घोळ लक्षात यायला मदत होईल.स्टॅंडफोर्ड युनिव्हर्सिटीमधील विद्वान मानसशास्त्रज्ञ वॉल्टर मिशेल ने १९७२ च्या सुमारास एक महत्वपूर्ण संशोधन केले. त्याच्या संशोधनाचा आधार होता की माणसे गोंधळाच्या क्षणात एवढी अगतिक का होतात. कुठली लोक आहेत जी गोंधळात ही  स्वतःला थांबवून असतात पूर्वीपासून दिलेल्या धोरणानुसारच काम करत असतात. वॉल्टर मिशेलने या गोष्टीचे उत्तर शोधण्यासाठी व्यतीच्या विकास प्रकियेच्या खूप मागपर्यंत जाण्याचे ठरवले.मागपर्यंत म्हणजे कुठपर्यंत. अगदी जेंव्हा ते लहान बालक असतात ना, तिथपर्यंत. त्याने काही लहान मुलांवर संशोधन केले. एका खोलीमध्ये काही लहान मुलांना बसायला लावले या मुलांना त्याने एक छोटा मार्शमेलो (ही एक प्रकारची मिठाई आहे) दिला आणि सांगितले, तुम्ही हा मार्शमेलो खाऊ शकता पण, हो; आणखी एक महत्वाची बाब तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आणखी १५ min थांबला आणि हा मार्शमेलो खाल्ला नाही तर मी तुम्हाला दोन मोठे मार्शमेलो देईल. आणि तो त्या खोलीबाहेर निघून गेला. या खोलीमध्ये कॅमेरे लावलेली असल्यामुळे आतमध्ये चालणाऱ्या मुलांच्या हरकती बारकाईने नोद केल्या जात होत्या.

१५ मिनिटानंतर जेंव्हा तो रूम मध्ये परत आला तेंव्हा त्याला असे आढळून आले की बऱ्याच मुलांनी त्या मार्शमेलोला अर्धे खाल्ले होते, काहींनी त्याला पूर्ण खाऊन टाकले होते, तर काही मुलांनी त्याला चाटून चाटून पार ओले करून टाकले होते पण खाल्ले नव्हते (म्हणजे या मुलांना वाटत होते कि जीभ लावणे म्हणजे खाणे नाही). फक्त काही अशी मोजकीच मुले होती जी १५ मिनिट त्याकडे सतत बघत होती, पण त्यांनी त्याला खाल्ले नाही आणि हात ही लावला नाही. नियमाप्रमाणे ज्यांनी त्याला खालले नाही अशा सर्वाना दोन मोठे मार्शमेलो दिल्या गेले. हे तीनही मार्शमेलो त्यांनी एका शांत ठिकाणी बसून खाल्ले. वॉल्टर मिशेलने या मार्शमेलो प्रयोगावरून वरून काही महत्वाचे निष्कर्ष काढले जे आपल्या  प्रत्येकासाठी आयुष्यातील निर्णायकी  घटनांतील महत्वाच्या क्षणांचे विश्लेषण करायला उपयुक्त ठरेल . जी मुले या रूम मध्ये बंद होती त्यांच्यावर ते १० वर्षाच्याअंतराने सातत्यपूर्ण नजर ठेवण्यात आली. ज्यातून या मुलांच्या विकासाबाबत काही नोंदही केल्या गेल्या, ज्या प्रत्येक व्यक्तीच्या ऍडव्हर्स कंडिशनमध्ये व्यक्त होण्याच्या त्यातून मोठ्या उद्दिष्टासाठी स्वतःला होल्ड करण्याच्या काही महत्वपूर्ण बाबींकडे निर्देश करते.
        
ज्या मुलांनी मार्शमेलोची चव घेतली अशी मुले शालेय जीवनात महाविद्यालयीन जीवनात कौटुंबिक जीवनात गोंधळलेली, जे हवं त्याच्या पाठीमागे काही विचार करता पटकन पळणारी. आणी साधारण ध्येय निवडून धोका नसलेली आयुष्य जगतांना दिसून आली. या उलट ज्या मुलांनी दिलेल्या वेळेत स्वतःला होल्ड करून दोन मार्शमेलो मिळवले ती मुले मात्र शालेय जीवनात महाविद्यालयीन जीवनात जास्तीत ज्यास्त केंद्रित कौटुंबिक जीवनात संयमित, आणी  आपल्या कुवतीपेक्षाही मोठे ध्येय ठेवून, त्याचा पाठलाग करण्यासाठी नियोजन करतांना  दिसून आली. अर्थात मिशेलने या मुलांचे बऱ्याच पुढपर्यंत अबाझर्वेशन केलेय त्यातून अतिशय भन्नाट अशा नोंदी केल्याय. या सर्व प्रक्रियेला डिलेड ग्रॅटिफिकेशन (Delayed gratification) असे म्हणण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियेत आपल्या समाधानाला जेवढं लांबवता येईल तेवढे लांबवले जाते छोटे छोटे आनंद घेण्याचे टाळून लोक अधिकाधिक मोठा रिझल्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. अशा व्यक्ती आपल्याला हवं असण्याऱ्या गोष्टी मिळाल्या नाही तरी चिडत नाही. त्यांचे प्लॅन जर अनपेक्षितरित्या बदलले तर ती तक्रार करत नाही. कुठलीही मजा मस्ती करण्यापूर्वी ही लोक आपली ठरवलेली कामेच आधी करतांना दिसून येतात.

या संदर्भाने जेंव्हा आपण आजची परिस्थिती समजून घेतो, आपल्याला जेंव्हा एका जागेवर बसायला सांगितले जात असते, तेंव्हा आपणच ठरवलेल्या गोष्टीच्या विरोधात आपल्याला वर्तन करायचे असते. जे स्वतःच्या सहनशक्तींसमोरील सगळ्यात मोठे आव्हान असते. आपल्याला येणाऱ्या महिन्यात भेटायच्या  असलेल्या महत्वपूर्ण व्यक्ती, त्यांच्याशी करायच्या असलेल्या तडजोडी /करार, महत्वाचे कौटुंबिक समारोह, प्रतिष्ठा वाढवणारे काही महत्वाकांक्षी प्रकल्प, लोक-संस्था यांना  केलेल्या कॅमिटमेन्ट ती पाळायची आपली भावनिक आणि व्यावहारिक गरज हे सगळंच अनपेक्षित रित्या पुढे ढकलले जाणे हे कालौघात तयार झालेल्या महत्वाकांक्षी आणि हट्टी  स्वभावाला एकदम विरोध करणारे असते. त्यामुळे हे सगळं टाळून घरात शांत बसने म्हणजे  गॅस वर  बसल्यासारखाच फील आपल्यापैकी बऱ्याच जणांना येत असेल. काही तरी महत्वपूर्ण हातातून निघून जातंय, आता ते परत मिळणार नाही त्यामुळे काहीतरी हालचाल केलीच पाहिजे असे सतत वाटत असते. काही वेळेला तर उगाच बाहेर फिरून आलंच पाहिजे ही नुसती मानसिक गरज पूर्ण करण्यासाठी बाहेर पडतात. एक लक्षात घावे लागेल कि युद्धच जेंव्हा आपणं स्वतःमध्ये निर्माण केलेल्या गरजां आणि सवयीच्या  विरुद्ध असते तेंव्हा तुमच्या आतील नियमांची पुनर्बांधणीची गरज सर्वोच असते. अशा समयी संयमी लोक विजयाचे शिल्पकार बनून काळाला आकार देऊ शकतात.  बर्याच वेळेला आयुष्यात काही करणे आणि शांत बसून वेळेची वाट पाहणे किंवा वेळ जाऊ देणे हे तुम्हालाच नाही अखिल मानावजातीला संकटातून बाहेर खेचण्यासारखेच असते. पण ज्यांना मार्शमेलो लगेच खायचा असतो त्यांना ते काय गमवणार याची माहिती असते पण जाणीव नसते. अशांच्या आयुष्यातून काहीतरी महत्वपूर्ण असं निघून जाण्याची तयारी करत असते, हेच सत्य.  फक्त ते गेलेय हे कळायला काही दिवस, महिने,  किंवा वर्ष लागतात एवढेच.

नेहमीच्या जगण्यात आपल्या ध्येयामुळे तयार झालेल्या सवयीविरुद्ध आता आपल्याला स्वतःलाच लढायचे आहे. अनेक वर्षांपासून समाधान मिळवण्यासाठी आपण स्वतःमध्ये निर्माण केलेल्या विविध गरजा आणि त्यातून नकळत निर्माण झालेल्या सवयीना अशा परिस्थितीमध्ये थांबवायचे आहे, बऱ्याच जणांना त्या थांबवणे  शक्य होतांना  दिसणार नाही; कारण मग समाधान मिळणे बंद होईल.. ! आणि त्या छोट्या छोट्या समाधानासाठी आपण निसर्गाने दिलेली ही नवीन ऑफर नाकारण्याचीही  शक्यता आहे. ही नवीन ऑफर म्हणजे "एका ठिकाणीच थांबा आणि आतपर्यंत घेत आलेले सर्व फायदे घेणे काही काळासाठी थांबवून नवीन एक्सटेंडेड (वाढीव) आयुष्याचा लाभ घ्या. अन्यथा जसे आहे तसे जगणे चालू ठेवा, नेहमीच्या समाधानासाठी थांबू नका, आणि निसर्गाकडून मिळणारे वाढीव आयुष्य नाकारा.     

आपल्यासमोर निसर्गाने असा पेच उभा केलाय की त्याद्वारे आपल्याला आपल्या आयुष्यात हव्या असणाऱ्या सर्व घटना अनिश्चित काळासाठी अचानक एक अटीवर पुढे ढकलण्यासाठी बाध्य केलेय. आता नेहमीप्रमाणे तुम्ही तुमचे आयुष्य, कृती, घटना चालू ठेवा, तुमच्या सवयीनुसार सगळ्या गोष्टी करा किंवा काही विशिष्ट कालपर्यंत स्वतःला होल्ड करा, स्वतःला थांबवा आणि वाढीव आयुष्याचा, आणि त्याद्वारे येणाऱ्या मोठ्या उद्दिष्ट पाठीमागे धावण्याचा अनुभव घ्या,भविष्यातील वाढीव आनंदासाठी स्वतःला तयार करा.    

तुम्हीच ठरवा मार्शमेलो आता खाता कि थांबून पाहता ...! 

...................................
  
सचिन दाभाडे
मॅनजमेन्ट कॉर्पोरेट कोच