Thursday, October 8, 2020

बॉईलिंग फ्रॉग ते स्वयंनेतृत्व..!



आपल्या संस्थेला, कंपनीला, कुटुंबाला, सहकाऱ्याला, आपल्या टीमला आणि स्वतःला एखाद्या अनप्रोडक्टिव्ह(अनुत्पादक) प्रोजेक्टमधून किंवा शक्य नसलेल्या मार्गावरून योग्य वेळी बाहेर काढायला तुम्हाला न जमणे किंवा ही योग्य वेळ ओळखता न येणे, हे स्वतःचा आणि तुमच्यातील नेतृत्व करण्याच्या क्षमतेच्या ऱ्हासाचे द्योतक आहे. आपण चुकीच्या फॉरमॅट मध्ये काम करतोय आणि नकळत त्यात आपण ट्रॅप होत जातोय हे समजायला बऱ्याचदा वेळ निघून जातो आणि जेंव्हा कळते की जे काही आपण केले ते अनुपयुक्त होते तेंव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड सुरू होते. आपण आपल्या स्वतःला, टीमला, संस्थेला, कंपनीला वाचवण्याची धडपड सुरू करतो  पण असंख्य वेळेला ही धडपड व्यर्थ ठरते कारण त्यातून बाहेर पडण्यासाठी जे धैर्य, हिंमत, प्रेरणा लागणार असते ती सर्व धडपड सध्या तुम्ही असलेल्या सिस्टीममध्ये आणि त्यामध्ये सुरक्षित राहण्यासाठी झिजवलेली असते. अशा वेळेला असह्यपणे जे होईल ते स्वतःसोबत होऊ देण्याची वेळ स्वतःवर येऊ देणे हेच बऱ्याच जणांना आयुष्याची आणि आपल्यात असलेल्या गुणांची फलश्रुती वाटायला लागते. 

हे असे खरेच आपल्या सोबत होते का ? यावर बिहेवीरिष्ठांनी (माणसाच्या वागणुकीवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ) अनेक संशोधने केली, अनेक प्रयोग केले, त्यापैकी Heinzmann या शास्त्रज्ञाने बेडकावर केलेल्या प्रयोग भन्नाट आहे. बेडूक हा थंड पाण्यात राहणारा प्राणी आहे, त्याला जर एकदम उष्ण पाण्यात टाकले तर तो त्यातून उडी मरेल किंवा त्यापासून दूर पळेल. पण पाणी हळू हळू उष्ण केल्यास तो तसे करेल का? तर उत्तर असे, एका जिवंत बेडकाला छोट्या पात्रात टाकले. त्यात पात्र पूर्ण भरून पाणी टाकले. त्या पात्रात तो बेडूक छान पैकी तरंगू लागला, पात्र मोठे नसल्याने त्याला हवं तेंव्हा तो त्यातून बाहेर उडी मारू शकेल असे. थोड्या वेळाने ते पात्र गॅस वर ठेवले जाते. सुरुवातीला पाणी कोमट होते. या बदलासोबत बेडूक समायोजन करून घेतो आणि पत्रात तसेच फिरत राहतो. दुसऱ्या फेजमधे काही वेळाने पाणी गरम व्हायला सुरुवात होते या छोट्या बदलात जरी बेडूक गोंधळून जातो, तरीही तो स्वतःच्या शरीराचे तापमान नियोजित करून परिस्थितीशी जुळवून घेतो. आता तिसऱ्या फेज मध्ये पाणी अतिशय कडक होते, ज्यामध्ये बेडकाला राहणे अतिशय कठीण होऊन बसणे सुरू होते. यावेळी बेडूक स्वतःची संपूर्ण ऊर्जा त्या कडक पाण्यापासून स्वतःला कसे जिवंत ठेवता येईल यात घालणे सुरू ठेवतो. शेवटच्या स्टेज मध्ये पाणी उकळणे सुरू होते व त्यात त्याला हालचाल करणेही अशक्य होऊन बसते, परिणामी यात बेडूक मारून पाण्यावर तरंगायला लागतो.

या प्रयोगाच्या शेवटी या अभ्यासकांना असा प्रश्न पडला की तिसऱ्या स्टेजला जेंव्हा पाण्याचे भयंकर चटके बसत असतांना पात्राचा आकार खूप लहान असूनही बेडूक पात्राच्या बाहेर का पडला नाही? जे त्याच्यासाठी अतिशय सोपे होते. याचे उत्तर काही विश्लेषणाअंती त्यांच्या हातात आले ते असे होते; बेडूक तिसऱ्या स्टेजमध्ये येईपर्यंत त्याची सर्व ऊर्जा व इच्छाशक्ती त्या उष्णतेशी समायोजन करण्यात संपलेली असते. बेडकाला पात्रामधून  सुरवातीला बाहेर पडणे हे जरी सोपे वाटत असले तरी त्याला त्याची काही गरज वाटत नाही, हळू हळू तिसऱ्या स्टेज पर्यंत निर्माण होणाऱ्या अड्व्हर्स परिस्थितीशी जुळवून घेणे हेच बेडकांचे प्रमुख ध्येय बनले. जेंव्हा शेवटच्या स्टेज मध्ये पाणी उकळायला लागले तेंव्हा बाहेर पडण्यासाठी उडी मारण्याचे धैर्य, प्रेरणा, आणि ऊर्जा संपलेली असते.

यातून बाहेर आलेले निष्कर्ष आपल्यातील प्रत्येकासाठी महत्वपूर्ण असे आहेत. प्रत्येकामधील इच्छाशक्ती, ऊर्जा, प्रेरणा ही आपल्या क्षमतेशी संबंधित क्षेत्रात योग्य वेळी वापरल्या नाहीत तर त्याचा ऱ्हास होणे वेगाने सुरू राहते. आपल्यामध्ये निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, ऊर्जा आणि धैर्य असेपर्यंत तो निर्णय स्वतःशी संबंधित उद्दिष्टासाठी घेता आला पाहिजे. म्हणून स्वतःतील ऊर्जेचा ऱ्हास होण्याअगोदरच तुम्हाला निर्णय घ्यायचाय, कारण एकदा का पाणी उकळायला लागले, की मग ते तेवढे सोपे नाही..!

टीप- या प्रयोगावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेय आणि त्यातील निष्कर्षाची विविधता ही कालांतराने सिद्धही झालीय. आपण यातून आपल्याला हवी असणारी शिकवण नक्कीच घेऊ शकतो, नाही का ?

सचिन दाभाडे
8390130362
www.sachindabhade.com


Wednesday, October 7, 2020





स्वतःच्या घरापासून दूर कुठे फिरायला गेल्यावर आपल्याला तेथील दृश्य पाहून एकदम अचंबित व्हायला होत आणि थोड्या वेळाने एकदम फ्रेश झाल्यासारखे वाटते, म्हणून लोक फ्रेश होण्यासाठी बऱ्याच दूर दूर जाऊन येतात आणि गेलेही पाहिजे. पण हा अनुभव बऱ्याच जणांना त्यांच्या जवळपास  असलेल्या वातावरणातून येत नाही. याचे कारण काय असेल ?.  

बाहेर गेल्यावर जेंव्हा आपण आपल्या जागेपासून तुटतो आणि नवीन ठिकाणी नवीन गोष्ट पाहतो तेंव्हा पाहण्याची प्रक्रिया ही जास्त फोकस असलेली असते, आपण काहीतरी नवीन पाहतोय अशा भूमिका यामागील कारण असते किंवा तसे गृहीतक घेऊनच आपण घराबाहेर पडलेलो असतो असे म्हणूयात, त्यामुळे जसे तुमचे बाहेरील निसर्गावर लक्ष केंद्रित होते, तेथील झाडं, नद्या, ओढे, बाजरी ज्वारीची शेतं, टेकड्या, डोंगरे, पायवाटा यांना तुम्ही नवीन म्हणून "पाहायला" लागतात आणि ते पाहण्याची प्रक्रिया सुरू होताच, तुमचे तुमच्या आयुषयातील मनस्ताप, वैताग, गोंधळापासून आपसूकच डिस्कनेक्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे जितका जास्त वेळ ते आपण पाहतो, तितका जास्त वेळ आपण या सगळ्यांपासून डिस्कनेक्ट असतो. ज्याक्षणी तुम्ही डिस्कनेक्ट झाला तुमच्या मेंदूमध्ये कार्यरत असणाऱ्या या मोठ्या ओझ्यावरून तुमचें लक्ष हटते आणि ते ओझे त्या वेळेसाठी किंवा क्षणासाठी नामशेष होते आणि तुम्हाला हलक हलक वाटायला लागते आणि आपण ताजेपणाची, जिवंतपणाची अनुभूती करायला लागतो.

ही अनुभूती खूप दूर जाऊन वरील सगळं पाहण्यानेच येईल असे काही नाही. आपल्या आजूबाजूच्या झाडांकडे, घराच्या बाजूला असलेल्या शेताकडे आणि त्यापलीकडे उभ्या असणाऱ्या झाडाकडे त्याखाली असलेल्या झोपडीकडे शांत चित्ताने पहा, घराच्या गच्चीवर जाऊन सूर्योदय आणि सूर्यास्त शांततेने पहा, त्यातील रंग छटा कधीच रोज असतात तशा नसणार, काहीतरी बदललेले असेल, ते डोळ्याने टिपता आले तर नक्की ठरवून टिपा. निसर्ग सगळीकडे सारखाच आनंद देणारा, उल्हासीत करणारा आहे. अगदी वाळवंट सुद्धा निसर्ग आहे आणि तोही बघायला लोक जातात, त्यामुळे तो बघितल्याने आनंद होतो हे जेवढे सत्य, तेवढेच सत्य हे की; आपण वेगळं काही बघतो आहे हा भावच आपल्याला त्यावर फोकस करतो आणि आपण डोक्यात असणाऱ्या नेहमीच्या ओझ्यापासून डिस्कनेक्ट होतो, त्यामुळे त्रास देणाऱ्या, नकारात्मकता निर्माण करणाऱ्या, अस्वस्थ आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या भावनेपासून आपसूक होणारे हे डिस्कनेक्शन मन हलक करणारे, आनंद देणारे आहे. त्यासाठी फार वेगळा इफर्ट घ्यावा लागत नाही.

सचिन दाभाडे
8390130362
www.sachindabhade.com