Thursday, October 8, 2020

बॉईलिंग फ्रॉग ते स्वयंनेतृत्व..!



आपल्या संस्थेला, कंपनीला, कुटुंबाला, सहकाऱ्याला, आपल्या टीमला आणि स्वतःला एखाद्या अनप्रोडक्टिव्ह(अनुत्पादक) प्रोजेक्टमधून किंवा शक्य नसलेल्या मार्गावरून योग्य वेळी बाहेर काढायला तुम्हाला न जमणे किंवा ही योग्य वेळ ओळखता न येणे, हे स्वतःचा आणि तुमच्यातील नेतृत्व करण्याच्या क्षमतेच्या ऱ्हासाचे द्योतक आहे. आपण चुकीच्या फॉरमॅट मध्ये काम करतोय आणि नकळत त्यात आपण ट्रॅप होत जातोय हे समजायला बऱ्याचदा वेळ निघून जातो आणि जेंव्हा कळते की जे काही आपण केले ते अनुपयुक्त होते तेंव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड सुरू होते. आपण आपल्या स्वतःला, टीमला, संस्थेला, कंपनीला वाचवण्याची धडपड सुरू करतो  पण असंख्य वेळेला ही धडपड व्यर्थ ठरते कारण त्यातून बाहेर पडण्यासाठी जे धैर्य, हिंमत, प्रेरणा लागणार असते ती सर्व धडपड सध्या तुम्ही असलेल्या सिस्टीममध्ये आणि त्यामध्ये सुरक्षित राहण्यासाठी झिजवलेली असते. अशा वेळेला असह्यपणे जे होईल ते स्वतःसोबत होऊ देण्याची वेळ स्वतःवर येऊ देणे हेच बऱ्याच जणांना आयुष्याची आणि आपल्यात असलेल्या गुणांची फलश्रुती वाटायला लागते. 

हे असे खरेच आपल्या सोबत होते का ? यावर बिहेवीरिष्ठांनी (माणसाच्या वागणुकीवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ) अनेक संशोधने केली, अनेक प्रयोग केले, त्यापैकी Heinzmann या शास्त्रज्ञाने बेडकावर केलेल्या प्रयोग भन्नाट आहे. बेडूक हा थंड पाण्यात राहणारा प्राणी आहे, त्याला जर एकदम उष्ण पाण्यात टाकले तर तो त्यातून उडी मरेल किंवा त्यापासून दूर पळेल. पण पाणी हळू हळू उष्ण केल्यास तो तसे करेल का? तर उत्तर असे, एका जिवंत बेडकाला छोट्या पात्रात टाकले. त्यात पात्र पूर्ण भरून पाणी टाकले. त्या पात्रात तो बेडूक छान पैकी तरंगू लागला, पात्र मोठे नसल्याने त्याला हवं तेंव्हा तो त्यातून बाहेर उडी मारू शकेल असे. थोड्या वेळाने ते पात्र गॅस वर ठेवले जाते. सुरुवातीला पाणी कोमट होते. या बदलासोबत बेडूक समायोजन करून घेतो आणि पत्रात तसेच फिरत राहतो. दुसऱ्या फेजमधे काही वेळाने पाणी गरम व्हायला सुरुवात होते या छोट्या बदलात जरी बेडूक गोंधळून जातो, तरीही तो स्वतःच्या शरीराचे तापमान नियोजित करून परिस्थितीशी जुळवून घेतो. आता तिसऱ्या फेज मध्ये पाणी अतिशय कडक होते, ज्यामध्ये बेडकाला राहणे अतिशय कठीण होऊन बसणे सुरू होते. यावेळी बेडूक स्वतःची संपूर्ण ऊर्जा त्या कडक पाण्यापासून स्वतःला कसे जिवंत ठेवता येईल यात घालणे सुरू ठेवतो. शेवटच्या स्टेज मध्ये पाणी उकळणे सुरू होते व त्यात त्याला हालचाल करणेही अशक्य होऊन बसते, परिणामी यात बेडूक मारून पाण्यावर तरंगायला लागतो.

या प्रयोगाच्या शेवटी या अभ्यासकांना असा प्रश्न पडला की तिसऱ्या स्टेजला जेंव्हा पाण्याचे भयंकर चटके बसत असतांना पात्राचा आकार खूप लहान असूनही बेडूक पात्राच्या बाहेर का पडला नाही? जे त्याच्यासाठी अतिशय सोपे होते. याचे उत्तर काही विश्लेषणाअंती त्यांच्या हातात आले ते असे होते; बेडूक तिसऱ्या स्टेजमध्ये येईपर्यंत त्याची सर्व ऊर्जा व इच्छाशक्ती त्या उष्णतेशी समायोजन करण्यात संपलेली असते. बेडकाला पात्रामधून  सुरवातीला बाहेर पडणे हे जरी सोपे वाटत असले तरी त्याला त्याची काही गरज वाटत नाही, हळू हळू तिसऱ्या स्टेज पर्यंत निर्माण होणाऱ्या अड्व्हर्स परिस्थितीशी जुळवून घेणे हेच बेडकांचे प्रमुख ध्येय बनले. जेंव्हा शेवटच्या स्टेज मध्ये पाणी उकळायला लागले तेंव्हा बाहेर पडण्यासाठी उडी मारण्याचे धैर्य, प्रेरणा, आणि ऊर्जा संपलेली असते.

यातून बाहेर आलेले निष्कर्ष आपल्यातील प्रत्येकासाठी महत्वपूर्ण असे आहेत. प्रत्येकामधील इच्छाशक्ती, ऊर्जा, प्रेरणा ही आपल्या क्षमतेशी संबंधित क्षेत्रात योग्य वेळी वापरल्या नाहीत तर त्याचा ऱ्हास होणे वेगाने सुरू राहते. आपल्यामध्ये निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, ऊर्जा आणि धैर्य असेपर्यंत तो निर्णय स्वतःशी संबंधित उद्दिष्टासाठी घेता आला पाहिजे. म्हणून स्वतःतील ऊर्जेचा ऱ्हास होण्याअगोदरच तुम्हाला निर्णय घ्यायचाय, कारण एकदा का पाणी उकळायला लागले, की मग ते तेवढे सोपे नाही..!

टीप- या प्रयोगावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेय आणि त्यातील निष्कर्षाची विविधता ही कालांतराने सिद्धही झालीय. आपण यातून आपल्याला हवी असणारी शिकवण नक्कीच घेऊ शकतो, नाही का ?

सचिन दाभाडे
8390130362
www.sachindabhade.com


Wednesday, October 7, 2020





स्वतःच्या घरापासून दूर कुठे फिरायला गेल्यावर आपल्याला तेथील दृश्य पाहून एकदम अचंबित व्हायला होत आणि थोड्या वेळाने एकदम फ्रेश झाल्यासारखे वाटते, म्हणून लोक फ्रेश होण्यासाठी बऱ्याच दूर दूर जाऊन येतात आणि गेलेही पाहिजे. पण हा अनुभव बऱ्याच जणांना त्यांच्या जवळपास  असलेल्या वातावरणातून येत नाही. याचे कारण काय असेल ?.  

बाहेर गेल्यावर जेंव्हा आपण आपल्या जागेपासून तुटतो आणि नवीन ठिकाणी नवीन गोष्ट पाहतो तेंव्हा पाहण्याची प्रक्रिया ही जास्त फोकस असलेली असते, आपण काहीतरी नवीन पाहतोय अशा भूमिका यामागील कारण असते किंवा तसे गृहीतक घेऊनच आपण घराबाहेर पडलेलो असतो असे म्हणूयात, त्यामुळे जसे तुमचे बाहेरील निसर्गावर लक्ष केंद्रित होते, तेथील झाडं, नद्या, ओढे, बाजरी ज्वारीची शेतं, टेकड्या, डोंगरे, पायवाटा यांना तुम्ही नवीन म्हणून "पाहायला" लागतात आणि ते पाहण्याची प्रक्रिया सुरू होताच, तुमचे तुमच्या आयुषयातील मनस्ताप, वैताग, गोंधळापासून आपसूकच डिस्कनेक्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे जितका जास्त वेळ ते आपण पाहतो, तितका जास्त वेळ आपण या सगळ्यांपासून डिस्कनेक्ट असतो. ज्याक्षणी तुम्ही डिस्कनेक्ट झाला तुमच्या मेंदूमध्ये कार्यरत असणाऱ्या या मोठ्या ओझ्यावरून तुमचें लक्ष हटते आणि ते ओझे त्या वेळेसाठी किंवा क्षणासाठी नामशेष होते आणि तुम्हाला हलक हलक वाटायला लागते आणि आपण ताजेपणाची, जिवंतपणाची अनुभूती करायला लागतो.

ही अनुभूती खूप दूर जाऊन वरील सगळं पाहण्यानेच येईल असे काही नाही. आपल्या आजूबाजूच्या झाडांकडे, घराच्या बाजूला असलेल्या शेताकडे आणि त्यापलीकडे उभ्या असणाऱ्या झाडाकडे त्याखाली असलेल्या झोपडीकडे शांत चित्ताने पहा, घराच्या गच्चीवर जाऊन सूर्योदय आणि सूर्यास्त शांततेने पहा, त्यातील रंग छटा कधीच रोज असतात तशा नसणार, काहीतरी बदललेले असेल, ते डोळ्याने टिपता आले तर नक्की ठरवून टिपा. निसर्ग सगळीकडे सारखाच आनंद देणारा, उल्हासीत करणारा आहे. अगदी वाळवंट सुद्धा निसर्ग आहे आणि तोही बघायला लोक जातात, त्यामुळे तो बघितल्याने आनंद होतो हे जेवढे सत्य, तेवढेच सत्य हे की; आपण वेगळं काही बघतो आहे हा भावच आपल्याला त्यावर फोकस करतो आणि आपण डोक्यात असणाऱ्या नेहमीच्या ओझ्यापासून डिस्कनेक्ट होतो, त्यामुळे त्रास देणाऱ्या, नकारात्मकता निर्माण करणाऱ्या, अस्वस्थ आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या भावनेपासून आपसूक होणारे हे डिस्कनेक्शन मन हलक करणारे, आनंद देणारे आहे. त्यासाठी फार वेगळा इफर्ट घ्यावा लागत नाही.

सचिन दाभाडे
8390130362
www.sachindabhade.com

Tuesday, June 16, 2020

"दुसरी स्क्रिप्ट"



अक्षय कुमार सुनील शेट्टी हे माझे लहानपणीचे सगळ्यात आवडते हिरो कारण ते अफलातून फाईट करायचे. ते फाईट करायला लागल्यावर कितीही गुंड आले तरी मला त्यांच्या सुरक्षिततेबद्दल कधीच चिंता वाटायची नाही. ते निपटून घेतील असाच फील असायचा त्यांना पडद्यावर पाहतांना. जसा जसा मोठा होत गेलो तसे तसे अक्षय कुमारचे मारधाडीचे चित्रपट तेव्हढेसे अवडेना झाले. त्याच्या पेक्षा अजय देवगणला पाहणं बरं वाटायला लागलं. एक काळ असा आला की त्याचे सिनेमे साधारणतः फ्लॉपच्या कॅटेगिरीत जाणे सुरू झाले होते. मला माहीत होते की हे का होत असेल. त्याला आता सतत फाईट करत पाहणेही प्रेक्षकांना नकोसे झाले असेल. काय वेळ असेल ती जेंव्हा त्याला एक हिरो म्हणून हे अनुभव येत असतील. काही वर्षाने एक मित्रा मला भेटला, तो नुकताच एक सिनेमा पाहून येत होता. मी विचारले काय झाले हसायला. तो हसता हसता म्हणाला, अरे भयंकर भन्नाट सिनेमा पाहून आलोय. माझं प्रश्नचिन्ह तसेच, तो म्हणाला; मी सारख तीन तास पोट धरून हसतोय. एक नवीन सिनेमा आहे "हेरा फेरी" म्हणून, तो बघून येतोय,इतकी तुफान कॉमेडी आहे की बस. मी विचारले कोण आहे हिरो. तो म्हणाला अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी. मला एकदम धक्का बसला..! सुरवातीला विश्वास बसेना अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी, हे कसं शक्य आहे. या दोघांचा आणि कॉमेडीचा काय संबंध. बर केली जरी असेल तरी पोट धरून हसायला लावेल अशी कशी शक्य आहे ?. तो म्हणाला विश्वास नसेल तर आजच बघून घे. अर्थात मी लगेच विश्वास ठेवणार नव्हतोच. 15 दिवस बऱ्याच जणांकडून जेंव्हा हीच प्रतिक्रिया ऐकली तेंव्हा औरंगाबादच्या आंबा अप्सरामध्ये मी शेवटी हेरा फेरी पाहायला गेलोच.

बाहेर आलो तेंव्हा हिंदी चित्रपट सृष्टीतील एक वेगळ्या धाटणीच्या विनोदी सिनेमांचा सुत्रपात करणारा अश्या नव्या प्रकारचा कलाकृतीचा अविभाज्य भाग होऊनच बाहेर आलो. एक भन्नाट कॉमेडी, अफलातून ऍक्टिगं, कुठेही विनोदाचे प्याचप नाही, तर अक्खा सिनेमाचं असा काहीं बांधला होता की विसंगती आणि कॅरेक्टर्सची बेमालूम जुगलबंदी यांनी तुम्ही सतत हसत राहता. जेंव्हा हसत नसला तेंव्हा पुन्हा लगेच हसावे लागणार म्हणून तुमचे तोंड उघडेच राहील अशी संवादाची पेरणी. एकूण काय तर विनोद सिनेमाचा माईल स्टोन.. मैलाचा दगड आणि त्यात आश्चर्य म्हणजे हिरो कोण तर मारधाडीचे माझ्या मनातील आयकॉन अक्षय आणि सुनील. पण आता ते तसे राहिले नव्हते, त्यांना पाहिलं की आता माझ्या मनात हास्याची लकेर उमठायची. वातावरण बदललं होत.

मला लोक ऍक्शन स्टार समजतात म्हणून मी कॉमेडी कारण कसं शक्य आहे असे अक्षय म्हणाला असता तर आता तो आपल्याला पडद्यावर कदाचित दिसला नसता. माझ्या चाहत्यांच्या मनातील माझ्या इमेजला धक्का लागू नये म्हणून तो सतत ऍक्शन मुव्ही करत राहिला असता कदाचित अक्षय काळाच्या गर्तेत केंव्हाच गायब झाला असता. पण त्याने एवढ्या वर्षेपासून निर्माण केलेल्या स्वतःच्या ऍक्शन हिरोच्या प्रतिमेला स्वतःच असा काही सुरुंग लावला की हा ऍक्शन हिरो की कॉमेडी हिरो हा प्रश्नच लोकांना पडू नये. प्रेक्षकांना तो दोन्ही ही रुपात आवडू लागला.

खऱ्या हिरोला माहीत असते, तो एक सामान्य माणूसच आहे. त्याने केलेलं सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नाविन्यपूर्ण कृतीच त्याला प्रेक्षकांच्या मनाचे सम्राटपद बहाल करीत असते. तो मोठ्या सामर्थ्याने त्या प्रतिमा घडवतोही आणि भविष्याचा अंदाज घेऊन त्या प्रतिमेला स्वतः सुरुंग लावायलाही घाबरत नाही. कारण त्याला एक गोष्ट माहीत असते, हे जर त्याने बनवलय, तर ते मोडून दुसरेही तोच बनवू शकतो. आणि हाच भाव त्याला हिरो बनावत असतो, सुपरहीरो बनवत असतो...!

तुमच्या आयुष्याचा एखादा सिनेमा आपटला की गलितगात्र होण्याची गरज नाही. तुमची हिरो प्रतिमा नष्ट होईल याची भीती पण बाळगण्याचे कारण नाही. दुसरी स्क्रिप्ट लिहायला हातात घ्या.

हो दुसरी स्क्रिप्ट...!

...............

सचिन दाभाडे

Sunday, April 19, 2020


प्राचीन काळात राज्याच्या सैन्यासाठी काम करणाऱ्या लोहाराकडे दोन प्रकारचे साहित्य बनवण्याचे काम असायचे. पाहिले म्हणजे तलवारी आणि भाले बनवणे आणि दुसरे म्हणजे हातकड्या आणि साखळदंड बनवणे. पहिल्या प्रकारचे, म्हणजे तलवारी व भले बनवण्याचे काम, तेंव्हाच जास्त जोरात असायचे जेंव्हा, राज्य हे युध्दाच्या व विस्तारीकरण्याच्या धोरणात असायचे. राज्याच्या विस्तारासाठी होणारे युध्ये ही अश्या हत्यारे निर्मितीसाठी मुख्य प्रेरणा असायची.

आणि हातकड्या व साखळदंड या सारख्या दुसऱ्या प्रकारच्या साहित्य निर्मितीचे काम लोहार तेंव्हाच करायचा जेंव्हा राज्य आपल्या विस्तारीकरणाच्या क्षमतेच्या अत्युच्य टोकावर आहे व राज्याला आता फक्त जे मिळवलं आहे किंवा ताब्यात आहे, ते व्यवस्थित टिकवायचे आहे. अशा अवस्थेत त्यावेळेला शासन करण्यासाठी राज्याला तलवारीची नाही तर हातकड्या आणि साखळदंडाची जास्त गरज भासे. रोमन साम्राज्यातील बऱ्याच घटना उदाहरणादाखल घेता येतील. जेव्हा रोमन साम्राज्य आपल्या यश आणि वाढीच्या सर्वोच्च स्थानावर होते, त्यावेळी लोखंडापासून हत्यारे बनवणाऱ्या कारागिरवर अधिकाऱ्यांची प्रचंड करडी नजर असे आणि त्यांना अतिशय स्पष्टपणे लढण्यासाठी लागणारी हत्यारे बनवायला बंदी होती. कुणीही लोहार आपल्या मनाप्रमाणे तलवारी भाले शासनाच्या अधिकृत मागणीशिवाय बनवू शकत नसे.

लोहाराच्या वर्कशॉपमधील या दोन प्रकारच्या साहित्याच्या उत्पादनावरून त्या त्या साम्राज्याच्या परिस्थितीतीची जाणीव येऊ शकते. पहिल्या प्रकारचे उत्पादन हे हिंमत, ऊर्जा, प्रेरणा या गोष्टींना दर्शवतेय, तर दुसऱ्याप्रकारचे उत्पादन हे अडवणूक, दबाव, नियम, बंधन या गोष्टीला दर्शवतेय.

एखाद्या संस्था, समाज किंवा व्यक्तीमध्ये कुठल्या प्रकारच्या प्रेरणा काम करताय. पहिल्या प्रकारच्या की दुसऱ्या प्रकारच्या ?
यापैकी ज्यामध्ये अडवणूक, दबाव, नियम व बंधन या संबंधीच्या भावना वेगाने काम करताय असे आढळले, तर त्या संस्थेचे, समाजाचे किंवा व्यक्तीचे विविध अर्थाने विस्तारण्याचे प्रयोजन संपले आहे असे समजायला काही हरकत नाही. याउलट हिंमत, ऊर्जा, प्रेरणा या भावना कुठल्याही संस्थेत, समाजात, किंवा व्यक्तीमध्ये वेगाने काम करताय असे लक्षात आले, तर वाढ होण्यासाठीची सर्वात सुपीक जागा ती आहे असे मानून चला.

तुम्ही जिथे आहात तिथे यापैकी काय होते..?

............................
सचिन दाभाडे

Wednesday, April 15, 2020

युव्हल नोआ हरारीचे सेपियन्स - मानवी उत्क्रांतीची उत्कंठापूर्वक पुनर्रचना


स्वतःला काय हवंय  हे स्वतःलाच ठाऊक नसलेल्या असमाधानी देवापेक्षा अधिक धोकादायक काय असू शकते ? या प्रश्नाने युव्हाल नोआ हरारीचे सेपियन्स हे साधारणतः ४०० पानांचे पुस्तक वाचकाच्या डोक्यात व्यक्ती म्हणून आत्मपरीक्षणाचे सत्र सुरु करूनच थांबते. आपल्या इच्छा आकांशांची दिशा कोणती असावी अशी आपली इच्छा आहे ? या प्रश्नाने जर तुम्हाला धास्ती भरली नसेल तर तुम्ही २१व्या शतकात येणाऱ्या मूळ प्रश्नाला आणखी हात घातलाच नाही असेच म्हणावे लागेल. युव्हाल नोआ हरारी चे सेपियन्स म्हणजे, माणूस कोण आहे आणि कुठून आलाय याचा मानववंशशास्त्रीय अभ्यासाच्या आधाराने सुरु झालेला नाविन्यपूर्ण प्रवास, जो भौतिकशाश्त्र, रसायनशाश्त्रच्या मार्गे इतिहासाच्या विश्लेषण पद्धतीपर्यंत येऊन थांबताना दिसतो. हे पुस्तक हातात घेताना रुक्ष अश्या प्राचीन अष्मयुगीन कालखंडातील न समाजणाऱ्या संकल्पनातून जावे लागेल असे वाटत असतांनाच हरारी आपल्या रंजक शैलीने आपला गैरसमज दूर करतात. अर्थात वाचकाला पुस्तक हातात घेण्याअगोदर एक महत्वाची सूचना करेल, की सुरवात झाल्यावर अतिशय समजदारीने क्लिष्ट वाटणाऱ्या काही संकल्पना तुम्हाला आपल्याशा कराव्या लागतील. पहिल्या एकदोन प्रकरणात त्यांच्याशी एकदा गट्टी जमली की मग पुढचा प्रवास सोपा होतो आणि हरारी यांचे समग्र आकलन समजायला लागल्यावर चकित होण्याची मालिकाच सुरु होते. हरारी यांच्या नजरेतील उत्क्रांतीची ही गंमत समजून घेण्यासारखी आहे ज्यातून आपल्या म्हणजेच आपले पूर्वज सेपियन्स मानव यांचा भूतकाळापासून उत्क्रांत होत आलेल्या वर्तनाचा आणि त्याद्वारे आजचा मानव निर्माण करीत असलेल्या भविष्याचा धक्कादायक खुलासा आपल्यासमोर रंजक पद्धतीने समोर येईल.  

हरारी ३ स्टेप मध्ये मानवाची उत्क्रांती झाल्याचे दाखवतात १ बोधात्मक क्रांती, २ कृषी क्रांती,३ वैज्ञानिक क्रांती.  भूतकाळात मानव उत्क्रांत होत असताना फक्त सेपियन्स हीच मानवाची जात विकसित झाली आणि तिच्या द्वारेच आजचा माणूस निर्माण झाला पण हे होत असतांना  होमो इरेक्टस, होमो नियांडरथल,या इतर मानवी आणि वैषिठ्यपुर्ण जमाती नामशेष झाल्या. हरारी मानववंशशाश्त्राचे दाखले देत मानवी उत्क्रांतीची मुख्य नस दाबतात पण तीही कौशल्य आणि ज्ञान यांच्या बेमालूम मिश्रणातून. १२ हजार वर्षांपूर्वी कृषी क्रांती झाली यापूर्वी मानव कसा होता त्याच्या श्रद्धा, नातेसंबंधाची चौकट या आणि आणखी अनेक गोष्टीबद्दल कुठलाही परिपूर्ण असा पुरावा नसल्याने मानववंशशास्त्राकडून हा भाग मोठ्या प्रमाणावर गृहीतावरच  उभा आहे. बऱ्याच मांडण्याबद्दल शाश्त्रज्ञांमध्ये वाद आहे.. हररी म्हणतात २५ लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानवाची जात अस्तित्वात आल्यापासून ते ७० हजार वर्षेपर्यंत होमो कुळातील सर्व मानवी जाती एकमेकांशी व निसर्गाशी जगण्याचा संघर्ष करत अस्तित्व  टिकवून  होत्या पण ७० हजार वर्षांपूर्वी सेपियन्स यांनी स्वतःमध्ये असे काही विकसित केले ज्यामुळे त्यांनी यासृष्टीवर आपला ताबा मिळवण्यात  इरेक्टस आणि  नियांडरथल या आपल्या प्रतिस्पर्ध्याला मागे सोडले व ती होती सेपियन्स मानवाला मिळालेली सर्वोच्च देणगी,  कल्पना करू शकण्याची त्याची अद्भुत शक्ती. या कल्पनेतूनच सेपियन्सनि पुराणकथा निर्मिल्या या कल्पित कथांमुळे ७० हजार वर्षांपासून सेपियन्स यांनी अनेक अवास्तव सत्ये, मिथ्स उभी केली ज्याच्या आधारावर त्याने कुटुंबाला, समाजाला, देशाला 'विश्वास'  ठेवायला भाग पाडले. हा कथा निर्मितीचा उद्योग आजपर्यंत सुरूय आणि तीच आपली खरी ओळख आहे असे ते म्हणतात यासाठीच सेपियन्स ने भाषेचा शोध कसा लावला हे हरारी  सांगतात.

समाजशास्त्राच्या नियमानुसार एक मानव साधारणतः १५० च्या आसपास व्यक्तीसोबत आपले नातेसंबंध निर्माण करू शकतो व ते टिकावू शकतो, पण त्या पुढे जायचे म्हणजे शक्य नाही. ही अडचण मानवी समाजनिर्मितीच्या कामातील मोठा अडथळा होती. पण यावर एक उपाय सेपियन्स यांना  सापडला तो म्हणजे समान पुराणकथा निर्मिती. यासाठी त्यांनी भाषेचा शोध लावला. सेपियन्स त्या कथा आधारे एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांसोबत सहकार्य करू लागले. आणि या सहकार्याच्या जोरावर त्याने बाकी प्रजातीचा संहार केला. आजही ज्या जगात आपण जगतो त्यामध्ये आपला धर्म, सांस्कृतिक कल्पना, कॉर्पोरेट कंपन्या, कायदे, समानतेची कल्पना, राष्ट्रवाद अगदी आपण कंपन्यांना करून देत असलेली वेगळी ओळख. या एकप्रकारच्या पुराणकथाच आहेत, ज्या आपल्याला आपले पूर्वज सेपियनस यांच्या कडून  मिळालेल्या आहेत. त्या कल्पना शक्तीच्या देणगीचा आपण प्रचंड विकास केला आहे.

हरारी असंख्य उदाहरणे देत जातात. आदिवासि लोक आणी त्यांच्या कल्पित कथां यापासून ते ख्रिश्चन धर्मातील विचार या सर्व काल्पनिक गृहीतकांच्या आधारे मोठा समूह एक येतो. एकसारखा विचार व कृती ही करतो.   यावरच हजारो वर्षपूर्वीचा आदिवासी आणि आताचा ख्रिश्चन व्यक्ती यांचा समूह एकत्र बांधलेला असतो. तेच वेगळ्या प्रकारे आजच्या आधुनिक सेपियन्सच्या  कोर्पोरेट  कंपन्या आणि वकील करताना दिसतात. तेही कायद्याचे ज्ञान उभे करून राज्याच्या कल्पनेआधारे कंपनी नावाची कथा उभी करून त्यावर सामान्य लोकांनाच विश्वास निर्माण करतात व या विश्वासातून हजारो लोक एका ध्येयसाठीच त्वेषाने काम करायला लागतात. ७० हजार वर्षांपूर्वीचा आपला पूर्वज ही अशाच प्रकारे वास्तवावर (म्हणजे झाडे दगड प्राणी यावर) न बोलता कल्पनेवर बोलायला लागला. ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्याची कलपना करायला लागला.त्या द्वारे कल्पित कथा उभ्या करायला लागला.ज्यातून सेपियन्स एकत्र आला. कथेतून त्याने चिन्ह व्यवस्था निर्माण केली आणि त्याच्याशी बाकीच्या सेपियन्सची भावना जोडली. आजही समाज बांधणीच्या ध्येयासाठी अशाच कथा उभ्या केल्या जातात. धर्म बांधणीच्या ध्येयासाठी अश्याच पुराणकथा उभ्या केल्या जातात, राष्ट्र ही तर २००  वर्षा पूर्वी निर्माण  झालेली अगदी अलीकडची कथा. काळाच्या ओघात कथांचे सादरीकरण विलक्षण क्लिष्ट झाले. त्याच्या अनेक उपपत्ती ही त्यामुळे निर्माण झाल्याय. या सर्व प्रक्रियेला हरारी  मानवी उत्क्रांतीतील बोधात्मक क्रांती असे म्हणतात व हीच मांडणी सेपियन्स या पुस्तकाचा आत्मा आहे. 

हरारीचे विशलेषण पुढे पुढे म्हणजेच, इसवी सनानंतरच्या  काळातील दाखले देतांना  आणखी सर्वव्यापी होत जाते आणि वाचक म्हणून आपले डोके गरगरते. ते म्हणतात क्रांती झाल्यापासूम सेपियन्स अश्या दुहेरी वास्तवात जगत आहे. एका बाजूला झाड, सिंह यासारखे वास्तव, तर दुसऱ्या बाजूला देव, राष्ट्र, यांच्यासरखं कल्पित वास्तव जसा जसा काळ लोटला तसे हे कल्पित वास्तव मूळ वास्तवापेक्षा जास्त  बलवान झालंय, अशी मांडणी ते विविध अभ्यास आणि संकल्पनांच्या आधारे करतात. मानवी विकासात साधारणतः  वर्तन बदल तेंव्हाच घडले जेंव्हा जुनकीय बदल घडले, पण बोधात्मक क्रांती हा असा प्रकार होता जी  झाल्यानंतर  वर्तन बदल फार झपाट्याने घडले, पण हे घडत असतांना  सेपियन्समध्ये मात्र जुनकीय बदल घडले नाहीत. याचा अर्थ हा होता कि सुरुवातीचे सेपियन्स आणि आजचे, आपण यामध्ये जुनकीय असा फार फरक नाही. आपण जेंव्हा एकटे असतो तेंव्हा आपली असणारी भावनिक आणि मानसिक वागणूक ही आपले मूळ  सेपियन्स किंवा मोठ्या प्रमाणावर चिंपांझीशी मिळती जुळती आहे हे सिद्ध होते. फक्त आजचे सेपियन्स म्हणजेच आपण जेंव्हा समूहात एकत्र येतो तेंव्हा आपल्या वर्तनात बदल होतो आणि आपण आपल्याशी संबंधित समाजात सांगितलेल्या विविध पुराणकथेप्रमाणे वर्तन करायला लागतो. हेच वर्तन आपल्याला बाकी सगळ्या प्राण्यापासून वेगळे करते आणि अन्नसाखळीच्या सर्वोच्य पदावर मानवाला नेवून बसवते.अनेक कुटुंबांना आणी गटांना एकत्र  बांधून ठेवणारा पुराकथांची कला  हीच  चिंपांझी आणि आपण यामधला फरक आहे.  याच कथांनी आपल्याला नवनिर्मितीचा स्वामी बनवलं आहे.

अनेक नोंदीमधून सेपियन्स हे परिस्थितिकीला क्रमाक्रमाने ठार करणाऱ्या मारेकऱ्यासारखे दिसतात आपले पूर्वज निसर्गाशी सुखसंवाद करुन राहत होते. या  पर्यावरणप्रेमींच्या   म्हणण्यावर   विश्वास  ठेवू नका असे ते एके ठिकाणी म्हणतात, कारण औद्योगिक  क्रांतीच्या कितीतरी पूर्वी सेपियन्सनी बहुसंख्य वनस्पती आणि प्राणी यांच्या प्रजाती नष्ट केल्या आहेत. जीवविज्ञानच्या इतिवृत्तात सर्वात संहारक प्राणी म्हणून आपली नोंद झाली आहे. हे गृहीतक ते ऑस्ट्रेलिया आणि इतर बेटावरील सेपियन्स चे आगमन होऊन  प्राणी जाती सेपियन्सने नष्ट करून तेथील अन्न  साखळी ४५ हजार वर्षांपूर्वी नष्ट केली व त्या खंडातील अन्नसाखळीतील तो सर्वोच्च पदावर गेला असे मांडताना  करतात. सेपियन्सचा  हा प्रवास अजूनही थांबलेला नाही. माणसे एका छत्राखाली एका विचाराखाली एका व्यवस्थेखाली आणण्याचा त्याचा प्रयत्न आणखी सुरु आहे. या सर्व प्रक्रिया अस्थित्वात याव्या म्हणून या उत्क्रांतीच्या प्रकियेत सेपियन्सनी  पैशाची संकल्पना कशा प्रक्रियेतून निर्माण केली ज्यामुळे महाकाय साम्रज्य उभारणीसाठी पार्श्वभूमी उभी केली गेली, याची मांडणी वाचायला खूप उद्बोधक आहे . यासंदर्भाने मागील ३ हजार वर्षांमध्ये साम्राज्ये बळकट होण्यासाठी धर्माचा आधार आणि त्याअनुषंगाने येणाऱ्या कथेचा पाया कसा उभा राहिला या सर्वांचं विश्लेषण मोठया अभ्यासपूर्ण आणि मनोरंजक शैलीने हरारी करतात व तीच या लेखनाची जमेची बाजू आहे.

मानवाने उत्क्रांत होत असतांना  सगळ्यांना एकत्र मात्र केलेय, पण वैयत्तिक सुख समाधानाची उद्दिष्ठे किती प्राप्त केलीय याबद्दल गंभीर प्रश्न वाचकांसमोर ठेवून हरारी आपली लेखणी थांबवतात. सामाजिक शाश्त्राच्या अभ्यासकांना हा हायपोथेसिस तसा अगदीच नवा नाही पण हरारी ज्या सूक्ष्मपणे आणि वैज्ञानिकपणे आपले म्हणणे मानवाच्या उत्क्रांतीच्या सुरवातीच्या टप्यापासून जोडत जोडत आणतात आणि त्याचा शेवट औद्योगिक क्रांतीच्या अत्युच्य म्हणता येईल अशा इंटेलिजंट डिझाईन म्हणजे बौद्धिक संकल्पन या टप्प्यापर्यंत घेवून येतात जिथे सेपियन्स हे जीवविज्ञानच्या घालून दिलेल्या मर्यादा मोडायला ही सिद्ध झालाय असे दिसते हे त्यांचे म्हणणे एक वेगळा विचार देते. माणसाचे (सेपियन्सचे) हे देवत्व त्याला तारेल कि मारेल हे आता बघायचे आहे. 

 

…………………………………..

सचिन दाभाडे

Friday, April 10, 2020

'फ्राईड'


'माझ्यावर पुस्तक कृपया लिहू नकोस तर माझ्यामुळे पुस्तक लिही'. नेटफ्लिक्स वरील 'फ्राईड' या सिग्मड फ्राईड च्या जीवनावर आधारित सुरवातीच्या कालखंडातील प्लॉट असलेली या सिरीजमधील हे फ्राईडच्या पेशंटच्या तोंडून आलेले वाक्य पूर्ण सिरीज कशी समजून घ्यायचीय याचा दृष्टिकोनच देऊन जाते. पूर्ण सिरीजमध्ये ही केस सोडवताना शेवटी त्यामध्ये भावनिकरित्या गुंतलेला फ्राईड त्याच्या पेशंटला म्हणतो, तुझा फोटो सरकारने पेपरमध्ये छापून तुला अटक करण्याचे सांगितलंय, तर आता तू काय करशील, तेंव्हा पेशंट म्हणते, की आता मला लोक ओळखतील त्यामुळे मी आता खरी फ्री झालीय, आता कुठलाही नकारात्मक विचार मला ड्राईव्ह करू शकणार नाही कारण तो विचार आता माझी शक्ती झालाय, कारण तो विचार नकारात्मक आहे हे मी ओळखलंय आणि हे झालय तुझ्यामुळेच. मी एक केस म्हणून तुझ्या आयुष्यासाठी आता संपली पाहिजे त्यामुळे तू दुसऱ्या केससाठी तयार रहा.



सगळ्या भागांपैकी शेवट मला खूपच आवडला आणि अनेक अर्थाने प्रेरणा देणारा वाटला. घरी येत असतांना फ्राईडच्या डोक्यात असलेला विचार स्पष्ट होत जातात. जे काँशिअस आणि सबकाँशिअस विचारांचे सुंदर असे स्पष्टीकरण आहे. माणसाच्या सबकाँशिअस मेंदूमध्ये त्यांच्या न बोलल्या गेल्याला अव्यक्त अश्या अनेक इच्छा, आकांशा, विचार असतात आणि त्या तुम्हाला तुमच्या नकळत आकार देत असतात. अंधाऱ्या खोलीत तुम्हाला काही दिसत नाही म्हणजे तिथे काहीच नाही असे होत नाही फक्त त्या तुम्हाला अंधारात दिसत नाही एवढेच. तसेच तुमच्या उघड्या डोळ्यांनी प्रकाशात दिसत असलेला भाग हा तुमचा काँशिअस भाग आहे. तर अंधारात न दिसणारा हा अनकाँशिअस भाग. हाच न दिसणारा भाग मोठया प्रमाणावर तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असतो. तुमच्या अनेक कृतीवर प्रभाव पाडत असतो. जर या अंधाऱ्या भागाला आपल्याला बघता आले किंवा ओळखता आले, तर आपल्याला आपल्यातील कमकुवत बाबींचे स्पष्टीकरणे मिळतील.

मानसशास्त्राचा इतिहास हा तसा फार जुना असा नाही साधारणतः 200 वर्षाची शास्त्रीय पार्श्वभूमी असलेली ही विद्याशाखा फ्राईड ने 360 डिग्री मध्ये बदलवली आहे. भानामती, जादूटोणा, भुताचा प्रभाव यासारख्या सागळ्या अज्ञानी कल्पनांच्या चौकटीत मानसिक रोग्यांचे निदान व उपचार अडकलेले असतांना एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी मध्य युरोपात त्यांच्यावर होणारे उपचारही अतिशय क्रूर अशा स्वरूपाचेच होते आणि अश्याच कालखंडाचे बरचसं चित्रण या सिरीजमध्ये आपल्याला दिसते.

सिगमंड फ्राईड ने सुरवातीला हिप्नॉसिसच्या वापराकडून (फ्राईड करिअरच्या सुरवातीला हिप्नॉसिसच्या प्रभावात आला होता पण नंतर त्याला या अभ्यासात शास्त्रीयता वाटली नाही) सबकाँशिअस माईंडच्या विश्लेषणाकडे वळवलेला मोर्चा हा मानसशास्त्रीय अभ्यासाच्या इतिहासात क्रांतिकारक ठरणार होता आणि त्यातून अभ्यासकांची एक मोठी परंपरा उभी राहिली. फ्राईडच्या हिप्नॉसिसच्या अभ्यासाच्या मध्यावर कुठेतरी एका घटनेवर आधारलेली ही कथा संपते. ज्यात फ्राईडच्या वैयक्तिक आयुष्याचे काही तथ्ये ही दाखवण्यात आलीय. या क्रांतिकारक मानसशास्त्रज्ञाच्या सुरुवातीच्या आयुष्यातील भागावर आधारित असलेली ही वेब सिरीज बघावी अशीच आहे.


.....................
सचिन दाभाडे

Wednesday, April 1, 2020

'यु टर्न'


हल्ले अटॅक लोकांचे मृत्यू हा माहितीचा भाग म्हणून घ्यावा की संवेदनेचा भाग म्हणून घ्यावा यावर वेगवेगळी मते असू शकतात. पण याही उपर गेल्या महिन्याभरापासून आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या च घरात एकदुसऱ्याला बाहेर न पडण्याचा आणि त्याचे भयानक दुष्परिणाम आपापल्या पद्धतीने सांगताय एकमेकांना सांगण्याचे प्रमाण वाढलंय हे लक्षात येण्यासारखं आहे. माणस एकमेकांच्या संपर्कात आली तर जिवाला धोका आहे, बाहेर जाण्यास बंदी आहे, सगळी ऑफिसेस संस्था बंद आहे, देश थांबलाय...!

हे सगळं स्वप्नं नसून खरचं घडतंय. दुपारी समजा झोपलेलो असलो आणि जाग जेंव्हा येते तेंव्हा असे वाटतंय की हा स्वप्नाचाच भाग होता पण खरं म्हणजे झोपेमुळेच तर या वास्तवातून ब्रेक मिळाला होता हे थोड्या वेळात समजते. पृथ्वीच्या पाठीवर एवढी भयंकर युद्धे झालीय अगदी मागच्याच शतकात दोन भयंकर जीवघेणी महायुद्ध झालीय. या महायुध्दात हजारो माणसे मेलीत, पण त्याबद्दल वाचतांना किंवा माहिती घेतांना याचा वास्तवाशी संबंध असल्याचा फील आला नाही.कुठेतरी दुसऱ्या जगाशी संबंधित किंवा एखादा हॉलीवूडचा मुव्ही बघतांना जे नावीन्य किंवा थ्रिल याव असच काहीतरी या घटना घडतांना रिस्पॉन्स गेला असेल.

काही प्रश्नांची उत्तरे लिहायचीय किंवा, यावर्षात काय झालं, याचं ज्ञान मला आहे यापलीकडे या घटनांत काही असेल अस वाटलंच नाही किंवा वाटण्याचे कारणही नसेल कदाचित. तेलावरून अनेक युद्धे, इराण इराक युद्ध, गल्फ वॉर, कुवेत वॉर, नायगर डेल्ट मध्ये सध्या चालू असलेले झगडे या आणि अशांच्या बातम्या लहानपनापासून पेपर मध्ये वाचायला मिळायच्या. या युद्धात माणसं मरायच्या खबरा यायच्या. रशिया अमेरिकेच्या शीत युद्धाच्या परिणामामुळे तिसऱ्या जगातील राष्ट्रे कशी बळी पडताय, वेगवेगळ्या दबाव तंत्रामुळे युद्धाची भयंकर साधने निर्माण केली जाताय याच्या बातम्या नेहमी कुठल्यानं कुठल्या माध्यमातून येताच राहिल्याय.

चीन पाकिस्थानशी युध्दाच्या बाता तर चहाच्या घोटासोबत कित्येक वेळा मित्रांसोबत मारल्याचे आठवतेय त्यात किती माणसांची कुर्बानी देऊन आपण परिणामाचा अंदाजही मनातल्या मनात तयार केलाय नियोजन. पण एवढं सगळं भयंकर घडत असतांना किंवा त्यावर विचार करत असताना मला भीती अशी कधी वाटलीच नाही किंवा वाटायचं कारण नव्हते कारण ती माहिती होती. एक विचार असा ही होता, एवढी लोकसंख्या वाढलीय, तर संसाधन अपुरे पडायला लागल्यावर माणसे काय करतील. एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या कशा प्रकारच्या असतील याचाही वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून झालेला होता.

जग हे तिसऱ्या महायुद्धापर्यंत येऊन थांबलय. ते पाण्यासाठी होईल आणि या युद्धात अणुबॉम्बचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊन सर्व पृथ्वी नष्ट होईल हे मी माझ्या मित्रांना चटणीसोबत पापड लावून खातांना अगदी कन्फर्म सांगितलंय आणि ते सांगताना मला भीती किंवा अस्वस्थतेचे भाव होते असे काही आठवत नाही.

माणसे मरतात, त्यांना कोण मारतो, कशासाठी मारतो हा भीतीचा विषय नसून ज्ञान मिळविण्याचा भाग आहे. तोच पुढेपुढे विकसित होत गेला. आर्थिक जग, विकास, जागतिकीकरण, खाजगीकरण, बेकारी, बँका, विविध राज्ये व त्याचे मुद्दे याबाबद्दलचे ज्ञान वाढत होते. मध्येच फटीकनेस आला की पर्यावरण आणि त्याची गरज यावरही थोडा वेळात वेळ काढून विचार केलाय.

जर भविष्यात जग लढलेच तर कुठल्या साधनांच्या आधारे लढेल, यावर अधिक अपडेट होण्याचा माझा प्रयत्न मला व्यापारातून देश एकमेकांनाची गोची करून वेगवेगळ्या मार्गे गळचेपी करतील इथपासून, बायोवॉरही भविष्यात कधीतरी होणारी घटना आहेच, ते होऊ शकते आणि हे सांगताना जर्मनी, अमेरिका, चीन, रशिया, स्पेन सारखे राष्ट्रे कशी बायोकेमिकल वेपन्स करण्यात गुंतली आहे, याबद्द्ल सांगून मी अपडेट आहे याची जाणीव होऊन प्रेरित झाल्याचं मला नक्की आठवतंय.

म्हणजे भीती अशी कधी वाटलीच नाही. अधिक माहिती, अधिक डेटा, सगळ्यांच माहितीच वेळोवेळी स्मरण, योग्य वेळी त्याचं परफेक्ट सादरीकरण. सगळं कसं अगदी सराईतपणे.

मागचे 20 दिवसही तसे काही वेगळे नाहीत.पूर्ण घरात आहे. फक्त काही महत्वाचे बदल आहेत.  नकारात्मक बातम्यापासून दूर राहता यावे म्हणून मी माहिती मिळवणे बंद केलेय. आणि हो भीती वाटायला लागलीय.

.........................
सचिन दाभाडे

Tuesday, March 31, 2020

हे युद्ध आहे विरुद्ध..!



आपल्याला  घरात थांबण्याचे एवढे टेंशन का येतेय माहितीय का ?, म्हणजे नेमके काय आहे जे तुम्हाला सतत बाहेर जाण्यास बाध्य करतंय.  शासनाने  एवढे कडक आदेश देऊनही आपल्यापैकी बरीच जनता घरात थांबायला अगदी झुगारूनच देतेय. याच कारण शोधतांना एक महत्वपूर्ण बाबीचा आधार घेऊया, म्हणजे हा घोळ लक्षात यायला मदत होईल.स्टॅंडफोर्ड युनिव्हर्सिटीमधील विद्वान मानसशास्त्रज्ञ वॉल्टर मिशेल ने १९७२ च्या सुमारास एक महत्वपूर्ण संशोधन केले. त्याच्या संशोधनाचा आधार होता की माणसे गोंधळाच्या क्षणात एवढी अगतिक का होतात. कुठली लोक आहेत जी गोंधळात ही  स्वतःला थांबवून असतात पूर्वीपासून दिलेल्या धोरणानुसारच काम करत असतात. वॉल्टर मिशेलने या गोष्टीचे उत्तर शोधण्यासाठी व्यतीच्या विकास प्रकियेच्या खूप मागपर्यंत जाण्याचे ठरवले.मागपर्यंत म्हणजे कुठपर्यंत. अगदी जेंव्हा ते लहान बालक असतात ना, तिथपर्यंत. त्याने काही लहान मुलांवर संशोधन केले. एका खोलीमध्ये काही लहान मुलांना बसायला लावले या मुलांना त्याने एक छोटा मार्शमेलो (ही एक प्रकारची मिठाई आहे) दिला आणि सांगितले, तुम्ही हा मार्शमेलो खाऊ शकता पण, हो; आणखी एक महत्वाची बाब तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आणखी १५ min थांबला आणि हा मार्शमेलो खाल्ला नाही तर मी तुम्हाला दोन मोठे मार्शमेलो देईल. आणि तो त्या खोलीबाहेर निघून गेला. या खोलीमध्ये कॅमेरे लावलेली असल्यामुळे आतमध्ये चालणाऱ्या मुलांच्या हरकती बारकाईने नोद केल्या जात होत्या.

१५ मिनिटानंतर जेंव्हा तो रूम मध्ये परत आला तेंव्हा त्याला असे आढळून आले की बऱ्याच मुलांनी त्या मार्शमेलोला अर्धे खाल्ले होते, काहींनी त्याला पूर्ण खाऊन टाकले होते, तर काही मुलांनी त्याला चाटून चाटून पार ओले करून टाकले होते पण खाल्ले नव्हते (म्हणजे या मुलांना वाटत होते कि जीभ लावणे म्हणजे खाणे नाही). फक्त काही अशी मोजकीच मुले होती जी १५ मिनिट त्याकडे सतत बघत होती, पण त्यांनी त्याला खाल्ले नाही आणि हात ही लावला नाही. नियमाप्रमाणे ज्यांनी त्याला खालले नाही अशा सर्वाना दोन मोठे मार्शमेलो दिल्या गेले. हे तीनही मार्शमेलो त्यांनी एका शांत ठिकाणी बसून खाल्ले. वॉल्टर मिशेलने या मार्शमेलो प्रयोगावरून वरून काही महत्वाचे निष्कर्ष काढले जे आपल्या  प्रत्येकासाठी आयुष्यातील निर्णायकी  घटनांतील महत्वाच्या क्षणांचे विश्लेषण करायला उपयुक्त ठरेल . जी मुले या रूम मध्ये बंद होती त्यांच्यावर ते १० वर्षाच्याअंतराने सातत्यपूर्ण नजर ठेवण्यात आली. ज्यातून या मुलांच्या विकासाबाबत काही नोंदही केल्या गेल्या, ज्या प्रत्येक व्यक्तीच्या ऍडव्हर्स कंडिशनमध्ये व्यक्त होण्याच्या त्यातून मोठ्या उद्दिष्टासाठी स्वतःला होल्ड करण्याच्या काही महत्वपूर्ण बाबींकडे निर्देश करते.
        
ज्या मुलांनी मार्शमेलोची चव घेतली अशी मुले शालेय जीवनात महाविद्यालयीन जीवनात कौटुंबिक जीवनात गोंधळलेली, जे हवं त्याच्या पाठीमागे काही विचार करता पटकन पळणारी. आणी साधारण ध्येय निवडून धोका नसलेली आयुष्य जगतांना दिसून आली. या उलट ज्या मुलांनी दिलेल्या वेळेत स्वतःला होल्ड करून दोन मार्शमेलो मिळवले ती मुले मात्र शालेय जीवनात महाविद्यालयीन जीवनात जास्तीत ज्यास्त केंद्रित कौटुंबिक जीवनात संयमित, आणी  आपल्या कुवतीपेक्षाही मोठे ध्येय ठेवून, त्याचा पाठलाग करण्यासाठी नियोजन करतांना  दिसून आली. अर्थात मिशेलने या मुलांचे बऱ्याच पुढपर्यंत अबाझर्वेशन केलेय त्यातून अतिशय भन्नाट अशा नोंदी केल्याय. या सर्व प्रक्रियेला डिलेड ग्रॅटिफिकेशन (Delayed gratification) असे म्हणण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियेत आपल्या समाधानाला जेवढं लांबवता येईल तेवढे लांबवले जाते छोटे छोटे आनंद घेण्याचे टाळून लोक अधिकाधिक मोठा रिझल्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. अशा व्यक्ती आपल्याला हवं असण्याऱ्या गोष्टी मिळाल्या नाही तरी चिडत नाही. त्यांचे प्लॅन जर अनपेक्षितरित्या बदलले तर ती तक्रार करत नाही. कुठलीही मजा मस्ती करण्यापूर्वी ही लोक आपली ठरवलेली कामेच आधी करतांना दिसून येतात.

या संदर्भाने जेंव्हा आपण आजची परिस्थिती समजून घेतो, आपल्याला जेंव्हा एका जागेवर बसायला सांगितले जात असते, तेंव्हा आपणच ठरवलेल्या गोष्टीच्या विरोधात आपल्याला वर्तन करायचे असते. जे स्वतःच्या सहनशक्तींसमोरील सगळ्यात मोठे आव्हान असते. आपल्याला येणाऱ्या महिन्यात भेटायच्या  असलेल्या महत्वपूर्ण व्यक्ती, त्यांच्याशी करायच्या असलेल्या तडजोडी /करार, महत्वाचे कौटुंबिक समारोह, प्रतिष्ठा वाढवणारे काही महत्वाकांक्षी प्रकल्प, लोक-संस्था यांना  केलेल्या कॅमिटमेन्ट ती पाळायची आपली भावनिक आणि व्यावहारिक गरज हे सगळंच अनपेक्षित रित्या पुढे ढकलले जाणे हे कालौघात तयार झालेल्या महत्वाकांक्षी आणि हट्टी  स्वभावाला एकदम विरोध करणारे असते. त्यामुळे हे सगळं टाळून घरात शांत बसने म्हणजे  गॅस वर  बसल्यासारखाच फील आपल्यापैकी बऱ्याच जणांना येत असेल. काही तरी महत्वपूर्ण हातातून निघून जातंय, आता ते परत मिळणार नाही त्यामुळे काहीतरी हालचाल केलीच पाहिजे असे सतत वाटत असते. काही वेळेला तर उगाच बाहेर फिरून आलंच पाहिजे ही नुसती मानसिक गरज पूर्ण करण्यासाठी बाहेर पडतात. एक लक्षात घावे लागेल कि युद्धच जेंव्हा आपणं स्वतःमध्ये निर्माण केलेल्या गरजां आणि सवयीच्या  विरुद्ध असते तेंव्हा तुमच्या आतील नियमांची पुनर्बांधणीची गरज सर्वोच असते. अशा समयी संयमी लोक विजयाचे शिल्पकार बनून काळाला आकार देऊ शकतात.  बर्याच वेळेला आयुष्यात काही करणे आणि शांत बसून वेळेची वाट पाहणे किंवा वेळ जाऊ देणे हे तुम्हालाच नाही अखिल मानावजातीला संकटातून बाहेर खेचण्यासारखेच असते. पण ज्यांना मार्शमेलो लगेच खायचा असतो त्यांना ते काय गमवणार याची माहिती असते पण जाणीव नसते. अशांच्या आयुष्यातून काहीतरी महत्वपूर्ण असं निघून जाण्याची तयारी करत असते, हेच सत्य.  फक्त ते गेलेय हे कळायला काही दिवस, महिने,  किंवा वर्ष लागतात एवढेच.

नेहमीच्या जगण्यात आपल्या ध्येयामुळे तयार झालेल्या सवयीविरुद्ध आता आपल्याला स्वतःलाच लढायचे आहे. अनेक वर्षांपासून समाधान मिळवण्यासाठी आपण स्वतःमध्ये निर्माण केलेल्या विविध गरजा आणि त्यातून नकळत निर्माण झालेल्या सवयीना अशा परिस्थितीमध्ये थांबवायचे आहे, बऱ्याच जणांना त्या थांबवणे  शक्य होतांना  दिसणार नाही; कारण मग समाधान मिळणे बंद होईल.. ! आणि त्या छोट्या छोट्या समाधानासाठी आपण निसर्गाने दिलेली ही नवीन ऑफर नाकारण्याचीही  शक्यता आहे. ही नवीन ऑफर म्हणजे "एका ठिकाणीच थांबा आणि आतपर्यंत घेत आलेले सर्व फायदे घेणे काही काळासाठी थांबवून नवीन एक्सटेंडेड (वाढीव) आयुष्याचा लाभ घ्या. अन्यथा जसे आहे तसे जगणे चालू ठेवा, नेहमीच्या समाधानासाठी थांबू नका, आणि निसर्गाकडून मिळणारे वाढीव आयुष्य नाकारा.     

आपल्यासमोर निसर्गाने असा पेच उभा केलाय की त्याद्वारे आपल्याला आपल्या आयुष्यात हव्या असणाऱ्या सर्व घटना अनिश्चित काळासाठी अचानक एक अटीवर पुढे ढकलण्यासाठी बाध्य केलेय. आता नेहमीप्रमाणे तुम्ही तुमचे आयुष्य, कृती, घटना चालू ठेवा, तुमच्या सवयीनुसार सगळ्या गोष्टी करा किंवा काही विशिष्ट कालपर्यंत स्वतःला होल्ड करा, स्वतःला थांबवा आणि वाढीव आयुष्याचा, आणि त्याद्वारे येणाऱ्या मोठ्या उद्दिष्ट पाठीमागे धावण्याचा अनुभव घ्या,भविष्यातील वाढीव आनंदासाठी स्वतःला तयार करा.    

तुम्हीच ठरवा मार्शमेलो आता खाता कि थांबून पाहता ...! 

...................................
  
सचिन दाभाडे
मॅनजमेन्ट कॉर्पोरेट कोच