Monday, April 26, 2021
हट्ट आणि संकल्प
हट्ट आणि संकल्प यामध्ये मूलभूत फरक म्हणजे; हट्टीपणामध्ये स्वतःला काही मिळवण्यासाठी दुसऱ्याने आपल्यासाठी प्रयत्न करावे, हे अपेक्षित असते, तर संकल्पाचा भाव हा कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःला त्या कामासाठी तयार करत असतो. वरवरून हट्टी व्यक्ती आणि संकल्पि व्यक्तीं दोघांनाही इच्छिलेले हवेच असते, पण काही कारणाने ते मिळणे बंद झाले तर संकल्पि व्यक्ती प्रयत्न करत राहतो, तर हट्टी प्रतिक्रियात्मक होऊन दोष देणे सुरू करतो व नकारात्मक ऊर्जेने भरत जातो. आपण हट्टी आहोत की संकल्पि हे वेळोवेळी तपासत राहिले पाहिजे.
इकोपॉइंट..!
आपलं शरीर बाहेरून येणाऱ्या इच्छा, ध्वनी, यांनी कार्यान्वित होते, की ते आतूनच निर्माण होणाऱ्या स्वतंत्र इच्छा, भाव यांचे निर्मिती केंद्र आहे. पर्वताच्या कड्यावर उभे राहून मोठ्याने ओरडला तर तोच ध्वनी पुन्हा परत आपल्या कानावर आदळतो. हा काही नवीन निर्माण झालेला ध्वनी नसतो. आपलं शरीर ही असेच इको पॉईंट बनलेला आहे का ?. इको पॉंइंट सारखेच आपण नेहमी कुणाच्यातरी इच्छा ध्येय आणि भावना यांना रिस्पॉन्स करत असतो. आपले शरीर हे याबाबतीत स्वतंत्र क्रिया करण्याऐवजी बाहेरून येणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करत असते व त्यालाच स्वतंत्र क्रिया समजत असते. हा गैरसमज लवकर दूर व्हायला हवा.
रशियन मानसशास्त्रज्ञ पावलाव्ह, या प्रतिक्रिया देण्याच्या माणसाच्या सवयीवर स्टीम्युलस (स्वतंत्र क्रिया) आणि रिस्पॉन्स (प्रतिक्रिया) ही पद्धत विकसित करतांना म्हणतो मनुष्याचे आयुष्य हे आपल्या शरीराबाहेर तयार झालेले घटनेला (स्टीम्युलस) ला प्रतिक्रिया (रिस्पॉन्स) देण्यामध्ये खर्च होत असते. हे स्टीम्युलस म्हणजेच बाहेरील वातावरणात घडणाऱ्या मुख्य घटना असतात, ज्यात नैसर्गिक, मानवीय दोन्ही प्रकारचा समावेश होतो. प्रत्येक व्यक्ती याला आपल्या कृवतीप्रमाणे रिस्पॉन्स देत असतो. मानवाच्या या कुवतीवर त्याने भाष्य केले, यावरून मानवी वागणुकीची रीत एका नवीन अर्थाने जगासमोर आली.
पण त्याही पुढे जाऊन व्हिक्टर फ्रांकेल याने या बाहेरील प्रभावाला न जुमानता व्यक्ती आपल्या आतमध्ये निर्माण होणारा स्वतंत्र असा रिस्पॉन्स- (स्वतंत्र भाव) निर्माण करू शकतो जो या बाहेरील प्रभावातून मुक्त आहे. या स्वतंत्र भाव निर्माण करण्याच्या मनुष्याच्या शक्तीला फ्रांकेल त्याच्या Man's search for meaning मध्ये 'इंडिपेंडंट विल' असे म्हणतो. बाहेरील घटना किंवा क्रियांना रिस्पॉन्स देत असतांना घटनेच्या प्रभावात न येता स्वतःची एक स्वतंत्र विल प्रत्येक व्यक्तीला निर्माण करता येऊ शकते, जी कुठलाही प्रभावातून मुक्त असते. या विल (will) नुसार केलेली कृती मनुष्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात नाविन्यपूर्ण आणि सकारात्मक रिझल्ट देऊ शकते.
तुमचा आजचा विचार किंवा भाव हा पेपर मधील बातम्यांचा प्रभाव, टीव्हीवरील घटना, बातम्या व विभत्स्य व्हिडीओ, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप युट्युबद्वारे बघितलेल्या स्टिम्युलेट करणाऱ्या घटना व मेसेजेस यातून निर्माण झालाय की तो या पेक्षा स्वतंत्र आहे, वेगळा आहे, तुमचा आहे, की तो विचार तुम्ही या सगळ्या बाहेरील स्टीम्युलसला प्रतिक्रिया देण्यातुन निर्माण झालाय हे बघता आले पाहिजे.
एक प्रयोग करून बघा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले किती विचार, घटना व भाव हे बाहेरून आलेले आहेत किंवा त्याला प्रतिक्रिया म्हणून आलेले आहेत व किती स्वतः मध्ये तयार झालेले आहेत. एका रकान्यात बाहेरून आलेले आणि दुसऱ्या रकान्यात आतून निर्माण झालेले (इंडिपेंडंट), असे दोन भागात वर्गीकरण करून लिहा. कुठले जास्त भरताय याचे रोज अवलोकन करून बघा. ही कृती प्रामाणिकपणे केली तर बरीच दृष्टी मिळेल.
हीच इंडिपेंडंट विल म्हणजे 'स्वतंत्र इच्छाशक्ती' सर्जनशीलतेची खरी आधारशीला आहे. ही तीच सर्जनशीलता जी जद्दु कृष्णमूर्तींनां अभिप्रेत आहे, जीला ते आपल्या शिक्षणविषयक सगळ्या विचारात प्रामुख्याने मांडतात. शासनाने मुलांना लहानपणापासूनच सर्जनशील आणि कृतीयुक्त बनवण्यासाठी त्यांच्या या पद्धतीचा प्राथमिक शिक्षणात समावेश केला परंतु तेवढ्याश्या प्रमाणात ती आपल्या शिक्षण पद्धतीत आणखी रूढ होने बाकी आहे.
...............
सचीन दाभाडे
पुस्तकं, हेतू आणि स्मरणशक्ती
पुस्तक एकदा वाचल्यावर ते पूर्ण लक्षात राहते हे बऱ्याच व्यक्तीबद्दल किंवा अभ्यासकांबद्दल आपण ऐकतो किंवा ऐकलेले असते. हे दुसरं तिसरं काही नसून पुस्तक लिहित असतांना लेखकाने कुठला विचार आधारासाठी योजला आहे ते लक्षात येणे होय. कुठलेही पुस्तक तुम्ही हातात घ्या त्यामध्ये लेखकाचा काही हेतू असतो. थोडं वैज्ञानिक पद्धतीत सांगायचं झालंच तर 'गृहीतक' असते. हे गृहीतक किंवा विचार व्यक्त करण्यासाठी पुस्तकांमध्ये वेगवेगळी उदाहरणें, दृष्टांत, सिद्धांत सांगितलेली असतात. पुस्तकातील कथानक त्यातील पात्रे, मांडलेले विचार हे सगळे लेखकाच्या हेतू भोवती फिरत असतात. तो हेतू वाचन करत असतांना वाचकाला जसा जसा समजायला लागतो, तशी तशी पुस्तकातील मांडणी आपल्या स्मरणात अधिक पक्की होते. कधी कधी तर सुरवातीचे काही पाने वाचल्यावरच पुढे काय लिहले असेल याचा अंदाज येऊन जातो.
एकदा मुख्य विचार समजला की पुस्तकातील बाकी शब्दरचना त्या विचारासाठीच योजलेल्या आहेत हे ओघाने समजायला लागते, त्यामुळे पुस्तक वाचनाचा वेग आणि स्मरणक्षमता दोन्ही वाढतात. बऱ्याच वाचकांना शेवटपर्यंत पुस्तकातील मूळ विचार किंवा हेतू हे शेवटपर्यंत समजत नाही, त्यामुळे त्याला पुस्तकातील सगळे संदर्भ वेगवेगळ्या पातळीवर लक्षात ठेवावे लागतात जे समजायला व लक्षात ठेवायला अडचणीचे असते.
वेगवेगळ्या क्षेत्रातील चौफेर वाचनातून हेतू समजण्याची आपली क्षमता ही विस्तारत जात असते, अर्थात ही हळू हळू होणारी आणि सूक्ष्म प्रक्रिया आहे. तिला वाचनातून सतत बळ देत राहिलं पाहिजे, म्हणजे पुस्तकं वाचल्यावर लक्षात राहायला लागतात व त्यांचा आयुष्यात योग्य ठिकाणी उपयोग व्हायला लागतो.
........
सचिन दाभाडे
Friday, April 9, 2021
उरूस आणि सिनेमा..!
माझं दहावी पर्यंत शिक्षण होईपर्यंत आम्ही बहिरगाव येथे राहत होतो. कन्नड पासून 5 ते 7 किमी अंतरावर असलेले हे एक समृद्ध आणि सुजलाम सुफलाम गाव. आईच्या बहिरगाव येथील सर्विसमुळे आमचे प्राथमिक शिक्षण बहिरगावला झाले. दरवर्षी कन्नडला उरूस भरायचा. वर्षभर टीव्हीवर गाणे पाहत पाहत मनात असलेल्या हिरोची सिनेमे उरसात केंव्हा येतील आणि येईल की नाही ही धाकधूक असायची. आवडत्या हिरोच्या चारपाच सिनेमांपैकी एक दोन तरी उरसात आले पाहिजे म्हणजे तेंव्हा ते बघता येतील म्हणून वर्षभर पाण्यात देव ठेवून बसलेलो असायचो आम्ही मनातल्या मनात. एका ऊरसात गोविंदाच्या कुलि नंबर वन साठी असेच देव पाण्यात ठेवून बसलो होतो मी. उरूस सुरू झाला आणि रोज मिठात बुडावलेले सडके बोर खायला बहिरगाववरून कन्नडला जाणाऱ्या माझ्या एका मित्राने खबर दिली की उरसात कुलि नंबर वन लागलाय रे म्हणून. आणि मग काय सांगावे, केवढा आनंद तो..! केवळ अवर्णनीय.. ! ..म्हणजे आता येणाऱ्या कुठल्याही दिवशी मी गोविंदाला पाहणार होतो. आता फक्त कुठल्या संध्याकाळी कूच करायचे ठेवढेच ठरायचे बाकी होते.
कितवीला होतो ते आठवत नाही, पण मोठी सायकल चालवता यायची. दोन मित्रांच्या सायकलींवर आम्ही दोन आणखी पाठीमागे बसून बहिरगावरून कन्नडला एका छोट्याश्या पांदीने निघालो. जातांना 'जब दिल ना लगे दिलदार हमारी गली आजाना' या गाण्यात काळा गॉगल घालून त्याच्या पाठीमागे लाल कपड्यात डान्स करणाऱ्या शंभर एक लेडीज डान्सर समोरून एक खांदा खाली करून डान्स करत जाणारा गोविंदा थोड्यावेळासाठीसुद्धा मनातून बाजूला हटलेला नव्हता. ध्यानीं मनी काष्टी पाषाणी फक्त गोविंदा होता. एवढा जर देव मनात असता तर तोही प्रसन्न झाला असता. उरसात पोहचल्या पोहचक्या डोळे भिरभिरत पोस्टरवर लाल कपड्यात गोविंदाला शोधायला लागले. आम्ही संध्याकाळी सातच्या सुमारास उरसात पोहचलो आणि तडक कुलि नंबर वनच्या पोस्टर खाली जाऊन उभे राहिलो. तिकीट खिडकीवर गेल्यावर लक्षात आले की पिक्चर सुरू होऊन अर्धा तास झालेला. पण थोडा ही उशीर न करता आम्ही लगेच तिकिटांच्या लाईन मधून बाजूला झालो कारण एक मिनिटही जाणे आम्हाला कुणालाच गवारा नव्हते. दुसरा कुठला बघायची मानसिकता नव्हती म्हणून पुढचे दोन तास उरूस पालथा घातला. आणि शेवटी ती वेळ आली पिवळ्या रंगाचे पातळ कागदाचे 4 तिकीट हातात आले. साडे तीन रुपयाचे एक असे 4 तिकिटे काढली होती . वर्षभर फक्त गाणं पाहून पाहून खच्चून समाधानी झालेलो मी कंबर खोसून पूर्ण सिनेमात गोविंदाचा गोंधळ बघायला तयार झालो होतो. अगदी रोम रोमच तयार झाला होता म्हणा ना..!
उरसाचा हा सगळा रोमांच अनुभवण्यासाठी बहिरगाववरून तरुण मुलांच्या टोळ्या रात्री जेवणं करून आपापल्या परीने नियोजन करून निघायच्या. रात्री सायकल वर मित्रांसोबत अडीअडचणीच्या रस्त्याने येऊन रात्रीचे शो पहायचे आणि सकाळी सकाळी किंवा मध्यरात्री परत गावी पोहचायचे याला सुरवातीला बरीच वर्ष घरच्यांकडून मला परवानगी नव्हती. पण जसे जसे मोठे होत गेलो तसे फक्त एकच सिनेमा पाहून रात्री बारा वाजेपर्यंत परतू, असा वादा केल्यावर परवानगी मिळणे सुरू झाले. यानंतर उरसासाठी जिवलग मित्रांसोबत बऱ्याच साहसी सफरी केल्या. यामध्ये साहस हा शब्द फक्त मला लागू व्हायचा बाकी मित्र एका तासात बोर झालं म्हणूनही कन्नडला जाऊन यायची डेअरिंग स्वतःजवळ बाळगून असायचे.
सुरवातीच्या काळात उरसासाठी वडील मला आणि लहान भावाला बहिरगाववरून दुपारी सायकल वर घेऊन यायचे व 3 ते 6 चा शो साईबाबा मध्ये बघितला की 6 ते 8 उरसात आणि मग रात्री परत गावी असा तो प्रोग्राम असायचा. वडिलांसोबतच्या उरसातील सफरीत उरसातील टॉकीजवर सिनेमे बघण्याची मौज अनुभवता येत नव्हती म्हणून थोडे आणखी मोठे होण्याची मनापासून वाट बघत होतो. जसे थोडे मोठे झालो, आम्हाला एकटेच डायरेक्ट उरसातील टॉकीजवर सिनेमे बघायची परवानगी मिळायला लागली आणि तिथून पुढे ही धूम सुरू झाली. जिवलग मित्र पक्या दापके, बाळ्या जाधव, संदिप्या जाधव, आणि परत्या भकड्या यांच्यासोबत पिंजऱ्यातून सुटल्यासारखा मी कन्नडच्या उरसाच्या दिशेने भन्नाट वेगाने निघायचो. वेगात वीर दौडले आम्ही 4 ते 5.
मजा होती, तुफान असा आनंद होता, साधने कमी होती पण आनंदाला पारावार नव्हता ...!
हे सगळं आठवण्याचा कारण हे की 5 वर्षाची माझ्या मुलीने वरूण धवनचा कुलि नंबर वन मागच्या आठवड्यात (चुकून) पहिला आणि तेंव्हापासून ती दिवसातून दोन तीन वेळा पाहतेय, बर तिला त्यातील प्रत्येक सीन, डायलॉग यांचं भयंकर आकर्षण निर्माण झालेलं आम्ही सगळेच बघतोय. अतिशय कुतूहल आणि कौतुकाने जेंव्हा ती त्यातील सर्व सीन पुन्हा पुन्हा बघतेय तेंव्हा माझ्या आई आणि बायको दोघींना याचे मोठे कौतुक आणि कोडे पडलेय की अचानक कार्टून पाहणारी मुलगी एकदम कुलि नंबर वन हा सिनेमा इतका कसा एन्जॉय करतेय ते..
आता त्यांना काय सांगू वळणाच्या पाण्याबद्दल..!
.............….................
सचिन दाभाडे
Thursday, October 8, 2020
बॉईलिंग फ्रॉग ते स्वयंनेतृत्व..!
हे असे खरेच आपल्या सोबत होते का ? यावर बिहेवीरिष्ठांनी (माणसाच्या वागणुकीवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ) अनेक संशोधने केली, अनेक प्रयोग केले, त्यापैकी Heinzmann या शास्त्रज्ञाने बेडकावर केलेल्या प्रयोग भन्नाट आहे. बेडूक हा थंड पाण्यात राहणारा प्राणी आहे, त्याला जर एकदम उष्ण पाण्यात टाकले तर तो त्यातून उडी मरेल किंवा त्यापासून दूर पळेल. पण पाणी हळू हळू उष्ण केल्यास तो तसे करेल का? तर उत्तर असे, एका जिवंत बेडकाला छोट्या पात्रात टाकले. त्यात पात्र पूर्ण भरून पाणी टाकले. त्या पात्रात तो बेडूक छान पैकी तरंगू लागला, पात्र मोठे नसल्याने त्याला हवं तेंव्हा तो त्यातून बाहेर उडी मारू शकेल असे. थोड्या वेळाने ते पात्र गॅस वर ठेवले जाते. सुरुवातीला पाणी कोमट होते. या बदलासोबत बेडूक समायोजन करून घेतो आणि पत्रात तसेच फिरत राहतो. दुसऱ्या फेजमधे काही वेळाने पाणी गरम व्हायला सुरुवात होते या छोट्या बदलात जरी बेडूक गोंधळून जातो, तरीही तो स्वतःच्या शरीराचे तापमान नियोजित करून परिस्थितीशी जुळवून घेतो. आता तिसऱ्या फेज मध्ये पाणी अतिशय कडक होते, ज्यामध्ये बेडकाला राहणे अतिशय कठीण होऊन बसणे सुरू होते. यावेळी बेडूक स्वतःची संपूर्ण ऊर्जा त्या कडक पाण्यापासून स्वतःला कसे जिवंत ठेवता येईल यात घालणे सुरू ठेवतो. शेवटच्या स्टेज मध्ये पाणी उकळणे सुरू होते व त्यात त्याला हालचाल करणेही अशक्य होऊन बसते, परिणामी यात बेडूक मारून पाण्यावर तरंगायला लागतो.
या प्रयोगाच्या शेवटी या अभ्यासकांना असा प्रश्न पडला की तिसऱ्या स्टेजला जेंव्हा पाण्याचे भयंकर चटके बसत असतांना पात्राचा आकार खूप लहान असूनही बेडूक पात्राच्या बाहेर का पडला नाही? जे त्याच्यासाठी अतिशय सोपे होते. याचे उत्तर काही विश्लेषणाअंती त्यांच्या हातात आले ते असे होते; बेडूक तिसऱ्या स्टेजमध्ये येईपर्यंत त्याची सर्व ऊर्जा व इच्छाशक्ती त्या उष्णतेशी समायोजन करण्यात संपलेली असते. बेडकाला पात्रामधून सुरवातीला बाहेर पडणे हे जरी सोपे वाटत असले तरी त्याला त्याची काही गरज वाटत नाही, हळू हळू तिसऱ्या स्टेज पर्यंत निर्माण होणाऱ्या अड्व्हर्स परिस्थितीशी जुळवून घेणे हेच बेडकांचे प्रमुख ध्येय बनले. जेंव्हा शेवटच्या स्टेज मध्ये पाणी उकळायला लागले तेंव्हा बाहेर पडण्यासाठी उडी मारण्याचे धैर्य, प्रेरणा, आणि ऊर्जा संपलेली असते.
यातून बाहेर आलेले निष्कर्ष आपल्यातील प्रत्येकासाठी महत्वपूर्ण असे आहेत. प्रत्येकामधील इच्छाशक्ती, ऊर्जा, प्रेरणा ही आपल्या क्षमतेशी संबंधित क्षेत्रात योग्य वेळी वापरल्या नाहीत तर त्याचा ऱ्हास होणे वेगाने सुरू राहते. आपल्यामध्ये निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, ऊर्जा आणि धैर्य असेपर्यंत तो निर्णय स्वतःशी संबंधित उद्दिष्टासाठी घेता आला पाहिजे. म्हणून स्वतःतील ऊर्जेचा ऱ्हास होण्याअगोदरच तुम्हाला निर्णय घ्यायचाय, कारण एकदा का पाणी उकळायला लागले, की मग ते तेवढे सोपे नाही..!
टीप- या प्रयोगावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेय आणि त्यातील निष्कर्षाची विविधता ही कालांतराने सिद्धही झालीय. आपण यातून आपल्याला हवी असणारी शिकवण नक्कीच घेऊ शकतो, नाही का ?
सचिन दाभाडे
8390130362
www.sachindabhade.com
Wednesday, October 7, 2020
स्वतःच्या घरापासून दूर कुठे फिरायला गेल्यावर आपल्याला तेथील दृश्य पाहून एकदम अचंबित व्हायला होत आणि थोड्या वेळाने एकदम फ्रेश झाल्यासारखे वाटते, म्हणून लोक फ्रेश होण्यासाठी बऱ्याच दूर दूर जाऊन येतात आणि गेलेही पाहिजे. पण हा अनुभव बऱ्याच जणांना त्यांच्या जवळपास असलेल्या वातावरणातून येत नाही. याचे कारण काय असेल ?.
ही अनुभूती खूप दूर जाऊन वरील सगळं पाहण्यानेच येईल असे काही नाही. आपल्या आजूबाजूच्या झाडांकडे, घराच्या बाजूला असलेल्या शेताकडे आणि त्यापलीकडे उभ्या असणाऱ्या झाडाकडे त्याखाली असलेल्या झोपडीकडे शांत चित्ताने पहा, घराच्या गच्चीवर जाऊन सूर्योदय आणि सूर्यास्त शांततेने पहा, त्यातील रंग छटा कधीच रोज असतात तशा नसणार, काहीतरी बदललेले असेल, ते डोळ्याने टिपता आले तर नक्की ठरवून टिपा. निसर्ग सगळीकडे सारखाच आनंद देणारा, उल्हासीत करणारा आहे. अगदी वाळवंट सुद्धा निसर्ग आहे आणि तोही बघायला लोक जातात, त्यामुळे तो बघितल्याने आनंद होतो हे जेवढे सत्य, तेवढेच सत्य हे की; आपण वेगळं काही बघतो आहे हा भावच आपल्याला त्यावर फोकस करतो आणि आपण डोक्यात असणाऱ्या नेहमीच्या ओझ्यापासून डिस्कनेक्ट होतो, त्यामुळे त्रास देणाऱ्या, नकारात्मकता निर्माण करणाऱ्या, अस्वस्थ आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या भावनेपासून आपसूक होणारे हे डिस्कनेक्शन मन हलक करणारे, आनंद देणारे आहे. त्यासाठी फार वेगळा इफर्ट घ्यावा लागत नाही.
सचिन दाभाडे
8390130362
www.sachindabhade.com
Tuesday, June 16, 2020
"दुसरी स्क्रिप्ट"
अक्षय कुमार सुनील शेट्टी हे माझे लहानपणीचे सगळ्यात आवडते हिरो कारण ते अफलातून फाईट करायचे. ते फाईट करायला लागल्यावर कितीही गुंड आले तरी मला त्यांच्या सुरक्षिततेबद्दल कधीच चिंता वाटायची नाही. ते निपटून घेतील असाच फील असायचा त्यांना पडद्यावर पाहतांना. जसा जसा मोठा होत गेलो तसे तसे अक्षय कुमारचे मारधाडीचे चित्रपट तेव्हढेसे अवडेना झाले. त्याच्या पेक्षा अजय देवगणला पाहणं बरं वाटायला लागलं. एक काळ असा आला की त्याचे सिनेमे साधारणतः फ्लॉपच्या कॅटेगिरीत जाणे सुरू झाले होते. मला माहीत होते की हे का होत असेल. त्याला आता सतत फाईट करत पाहणेही प्रेक्षकांना नकोसे झाले असेल. काय वेळ असेल ती जेंव्हा त्याला एक हिरो म्हणून हे अनुभव येत असतील. काही वर्षाने एक मित्रा मला भेटला, तो नुकताच एक सिनेमा पाहून येत होता. मी विचारले काय झाले हसायला. तो हसता हसता म्हणाला, अरे भयंकर भन्नाट सिनेमा पाहून आलोय. माझं प्रश्नचिन्ह तसेच, तो म्हणाला; मी सारख तीन तास पोट धरून हसतोय. एक नवीन सिनेमा आहे "हेरा फेरी" म्हणून, तो बघून येतोय,इतकी तुफान कॉमेडी आहे की बस. मी विचारले कोण आहे हिरो. तो म्हणाला अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी. मला एकदम धक्का बसला..! सुरवातीला विश्वास बसेना अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी, हे कसं शक्य आहे. या दोघांचा आणि कॉमेडीचा काय संबंध. बर केली जरी असेल तरी पोट धरून हसायला लावेल अशी कशी शक्य आहे ?. तो म्हणाला विश्वास नसेल तर आजच बघून घे. अर्थात मी लगेच विश्वास ठेवणार नव्हतोच. 15 दिवस बऱ्याच जणांकडून जेंव्हा हीच प्रतिक्रिया ऐकली तेंव्हा औरंगाबादच्या आंबा अप्सरामध्ये मी शेवटी हेरा फेरी पाहायला गेलोच.
बाहेर आलो तेंव्हा हिंदी चित्रपट सृष्टीतील एक वेगळ्या धाटणीच्या विनोदी सिनेमांचा सुत्रपात करणारा अश्या नव्या प्रकारचा कलाकृतीचा अविभाज्य भाग होऊनच बाहेर आलो. एक भन्नाट कॉमेडी, अफलातून ऍक्टिगं, कुठेही विनोदाचे प्याचप नाही, तर अक्खा सिनेमाचं असा काहीं बांधला होता की विसंगती आणि कॅरेक्टर्सची बेमालूम जुगलबंदी यांनी तुम्ही सतत हसत राहता. जेंव्हा हसत नसला तेंव्हा पुन्हा लगेच हसावे लागणार म्हणून तुमचे तोंड उघडेच राहील अशी संवादाची पेरणी. एकूण काय तर विनोद सिनेमाचा माईल स्टोन.. मैलाचा दगड आणि त्यात आश्चर्य म्हणजे हिरो कोण तर मारधाडीचे माझ्या मनातील आयकॉन अक्षय आणि सुनील. पण आता ते तसे राहिले नव्हते, त्यांना पाहिलं की आता माझ्या मनात हास्याची लकेर उमठायची. वातावरण बदललं होत.
मला लोक ऍक्शन स्टार समजतात म्हणून मी कॉमेडी कारण कसं शक्य आहे असे अक्षय म्हणाला असता तर आता तो आपल्याला पडद्यावर कदाचित दिसला नसता. माझ्या चाहत्यांच्या मनातील माझ्या इमेजला धक्का लागू नये म्हणून तो सतत ऍक्शन मुव्ही करत राहिला असता कदाचित अक्षय काळाच्या गर्तेत केंव्हाच गायब झाला असता. पण त्याने एवढ्या वर्षेपासून निर्माण केलेल्या स्वतःच्या ऍक्शन हिरोच्या प्रतिमेला स्वतःच असा काही सुरुंग लावला की हा ऍक्शन हिरो की कॉमेडी हिरो हा प्रश्नच लोकांना पडू नये. प्रेक्षकांना तो दोन्ही ही रुपात आवडू लागला.
खऱ्या हिरोला माहीत असते, तो एक सामान्य माणूसच आहे. त्याने केलेलं सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नाविन्यपूर्ण कृतीच त्याला प्रेक्षकांच्या मनाचे सम्राटपद बहाल करीत असते. तो मोठ्या सामर्थ्याने त्या प्रतिमा घडवतोही आणि भविष्याचा अंदाज घेऊन त्या प्रतिमेला स्वतः सुरुंग लावायलाही घाबरत नाही. कारण त्याला एक गोष्ट माहीत असते, हे जर त्याने बनवलय, तर ते मोडून दुसरेही तोच बनवू शकतो. आणि हाच भाव त्याला हिरो बनावत असतो, सुपरहीरो बनवत असतो...!
तुमच्या आयुष्याचा एखादा सिनेमा आपटला की गलितगात्र होण्याची गरज नाही. तुमची हिरो प्रतिमा नष्ट होईल याची भीती पण बाळगण्याचे कारण नाही. दुसरी स्क्रिप्ट लिहायला हातात घ्या.
हो दुसरी स्क्रिप्ट...!
...............
सचिन दाभाडे
Subscribe to:
Posts (Atom)