Friday, May 7, 2021


2000 च्या आसपास चा काळ आठवून पहा..! कपडे घ्यायला गेलो तर तुमच्या तालुक्यातील एक किंवा दोनच अशी मोठी कापड दुकाने असायची आणि त्यातील एखाद्याच दुकानात दुसरा मजलाही भरलेला दिसायचा, बाकी सगळीकडे एकाच फ्लोरला सगळं मिळायचे. अगदी जिल्ह्याच्या ठिकाणीही दोन फ्लोरची मोठी कापड दुकाने थोडी जास्त पण अगदी मोजकीच, थोड्या फार फरकाने एखादं दोन ठिकाणी अपवाद असेल. दुकानाचे आकारमान मर्यादित, कपड्याचे सर्व प्रकार साधारणपणे एकाच ठिकाणी, आणि त्यामुळे दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 3 ते 5 च्या घरात; एखाददोन मागेपुढे. काळ झपाट्याने बदलला. मागच्या 15 ते 20 वर्षात त्या साधारणतः सर्वच दुकानाचे दोन ते तीन फ्लोर झाले, लेडीज, जेन्ट्स आणि चाईल्डच नाही तर फक्त जेन्ट्स या एकाच प्रकारामध्येही वेगवेगळे सेगमेंट झाले. अगदी छोट्यातल्या छोट्या कापड दुकानाला ही दुसरा फ्लोर सहज आलाय आणि मोठ्या दुकानांनी अगदी मॉलला ही भारी भरेल एवढा पसारा उभा केला. या सगळ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या एका दुकानात 25 ते 50 पासून 150 च्या घरात जाऊन पोहचली. 

जास्त मॅनपॉवर ही जशी प्रगतीचे लक्षण आहे, तसे ती आपल्यासोबत काही आव्हाने पण घेऊन येते. आता हे कपड्याचे दुकान फक्त कपड्याचे दुकान राहिले नाही, कारण तिथे आता 40 ते 50 लोकांचा स्टाफ काम करतो. या पूर्वी जिथे एका कापड विकणाऱ्या दुकानदाराला फक्त कस्टमर कडे लक्ष द्यावे लागत, तिथे त्याला आता ग्राहक असो नसो हे 50 आणि त्यापुढेही जाऊन पोहचलेल्या पर्मनंट कर्मचाऱ्यांच्या रोजच्या नियोजनाचे आव्हान आहे. या सर्वांचे योग्य नियोजन आणि त्यांच्या उर्जेला आवश्यक असणारी दिशा हाही आता या उद्योगात पूर्वीपासून काम करणाऱ्या व्यापारी व उद्योगीसाठी मुख्य विषय आहे.

या मोठ्या स्टाफ चे काय करायचे ? जुने होते तसे चालू द्यायचे की नवीन पद्धतीने या कर्मचाऱ्यांचे नियोजन करायचे.  बाहेरील कस्टमर जेवढा महत्वाचा होता तेवढाच आता हा आतला कस्टमर उद्योजकासाठी महत्वाचा आहे. बऱ्याच व्यापाऱ्यांना हे आव्हान म्हणून लक्षात जरी आलंय, तरी काहीजण वेळ काढताय, काही दुर्लक्ष करताय, काहींची चालढकल सुरुय, काही फक्त नाव मार्केट मध्ये असावे म्हणूनच अस्तित्वात आहे , टिकायचे असेल तर या आतल्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कास्टमरला तयार करावे लागेल..

हा बदल फक्त मान्य असणे पुरेसे नाही तर त्यासाठी तयारी करण्यास सगळ्यात पाहिले जे पुढे येतील ते त्या भागात मार्केटचे भविष्यातील फायदे घेतील..!

..........…..........


सचिन दाभाडे

Monday, April 26, 2021

हट्ट आणि संकल्प

हट्ट आणि संकल्प यामध्ये मूलभूत फरक म्हणजे; हट्टीपणामध्ये स्वतःला काही मिळवण्यासाठी दुसऱ्याने आपल्यासाठी प्रयत्न करावे, हे अपेक्षित असते, तर संकल्पाचा भाव हा कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःला त्या कामासाठी तयार करत असतो. वरवरून हट्टी व्यक्ती आणि संकल्पि व्यक्तीं दोघांनाही इच्छिलेले हवेच असते, पण काही कारणाने ते मिळणे बंद झाले तर संकल्पि व्यक्ती प्रयत्न करत राहतो, तर हट्टी प्रतिक्रियात्मक होऊन दोष देणे सुरू करतो व नकारात्मक ऊर्जेने भरत जातो. आपण हट्टी आहोत की संकल्पि हे वेळोवेळी तपासत राहिले पाहिजे.

इकोपॉइंट..!

आपलं शरीर बाहेरून येणाऱ्या इच्छा, ध्वनी, यांनी कार्यान्वित होते, की ते आतूनच निर्माण होणाऱ्या स्वतंत्र इच्छा, भाव यांचे निर्मिती केंद्र आहे. पर्वताच्या कड्यावर उभे राहून मोठ्याने ओरडला तर तोच ध्वनी पुन्हा परत आपल्या कानावर आदळतो. हा काही नवीन निर्माण झालेला ध्वनी नसतो. आपलं शरीर ही असेच इको पॉईंट बनलेला आहे का ?. इको पॉंइंट सारखेच आपण नेहमी कुणाच्यातरी इच्छा ध्येय आणि भावना यांना रिस्पॉन्स करत असतो. आपले शरीर हे याबाबतीत स्वतंत्र क्रिया करण्याऐवजी बाहेरून येणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करत असते व त्यालाच स्वतंत्र क्रिया समजत असते. हा गैरसमज लवकर दूर व्हायला हवा. 

रशियन मानसशास्त्रज्ञ पावलाव्ह, या प्रतिक्रिया देण्याच्या माणसाच्या सवयीवर स्टीम्युलस (स्वतंत्र क्रिया) आणि रिस्पॉन्स (प्रतिक्रिया) ही पद्धत विकसित करतांना म्हणतो मनुष्याचे आयुष्य हे आपल्या शरीराबाहेर तयार झालेले घटनेला (स्टीम्युलस) ला प्रतिक्रिया (रिस्पॉन्स) देण्यामध्ये खर्च होत असते. हे स्टीम्युलस म्हणजेच बाहेरील वातावरणात घडणाऱ्या मुख्य घटना असतात, ज्यात नैसर्गिक, मानवीय दोन्ही प्रकारचा समावेश होतो. प्रत्येक व्यक्ती याला आपल्या कृवतीप्रमाणे रिस्पॉन्स देत असतो. मानवाच्या या कुवतीवर त्याने भाष्य केले, यावरून मानवी वागणुकीची रीत एका नवीन अर्थाने जगासमोर आली.

पण त्याही पुढे जाऊन व्हिक्टर फ्रांकेल याने या बाहेरील प्रभावाला न जुमानता व्यक्ती आपल्या आतमध्ये निर्माण होणारा स्वतंत्र असा रिस्पॉन्स- (स्वतंत्र भाव) निर्माण करू शकतो जो या बाहेरील प्रभावातून मुक्त आहे. या स्वतंत्र भाव निर्माण करण्याच्या मनुष्याच्या शक्तीला फ्रांकेल त्याच्या Man's search for meaning मध्ये 'इंडिपेंडंट विल' असे म्हणतो. बाहेरील घटना किंवा क्रियांना रिस्पॉन्स देत असतांना घटनेच्या प्रभावात न येता स्वतःची एक स्वतंत्र विल प्रत्येक व्यक्तीला निर्माण करता येऊ शकते, जी कुठलाही प्रभावातून मुक्त असते. या विल (will) नुसार केलेली कृती मनुष्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात नाविन्यपूर्ण आणि सकारात्मक रिझल्ट देऊ शकते.

तुमचा आजचा विचार किंवा भाव हा पेपर मधील बातम्यांचा प्रभाव, टीव्हीवरील घटना, बातम्या व विभत्स्य व्हिडीओ, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप युट्युबद्वारे बघितलेल्या स्टिम्युलेट करणाऱ्या घटना व मेसेजेस यातून निर्माण झालाय की तो या पेक्षा स्वतंत्र आहे, वेगळा आहे, तुमचा आहे, की तो विचार तुम्ही या सगळ्या बाहेरील स्टीम्युलसला प्रतिक्रिया देण्यातुन निर्माण झालाय हे बघता आले पाहिजे. 
एक प्रयोग करून बघा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले किती विचार, घटना व भाव हे बाहेरून आलेले आहेत किंवा त्याला प्रतिक्रिया म्हणून आलेले आहेत व किती स्वतः मध्ये तयार झालेले आहेत. एका रकान्यात बाहेरून आलेले आणि दुसऱ्या रकान्यात आतून निर्माण झालेले (इंडिपेंडंट), असे दोन भागात वर्गीकरण करून लिहा. कुठले जास्त भरताय याचे रोज अवलोकन करून बघा. ही कृती प्रामाणिकपणे केली तर बरीच दृष्टी मिळेल.

हीच इंडिपेंडंट विल म्हणजे 'स्वतंत्र इच्छाशक्ती'  सर्जनशीलतेची खरी आधारशीला आहे. ही तीच सर्जनशीलता जी जद्दु कृष्णमूर्तींनां अभिप्रेत आहे, जीला ते आपल्या शिक्षणविषयक सगळ्या विचारात प्रामुख्याने मांडतात. शासनाने मुलांना लहानपणापासूनच सर्जनशील आणि कृतीयुक्त बनवण्यासाठी त्यांच्या या पद्धतीचा प्राथमिक शिक्षणात समावेश केला परंतु तेवढ्याश्या प्रमाणात ती आपल्या शिक्षण पद्धतीत आणखी रूढ होने बाकी आहे.


...............

सचीन दाभाडे

पुस्तकं, हेतू आणि स्मरणशक्ती

पुस्तक एकदा वाचल्यावर ते पूर्ण लक्षात राहते हे बऱ्याच व्यक्तीबद्दल किंवा अभ्यासकांबद्दल आपण ऐकतो किंवा ऐकलेले असते. हे दुसरं तिसरं काही नसून पुस्तक लिहित असतांना लेखकाने कुठला विचार आधारासाठी योजला आहे ते लक्षात येणे होय. कुठलेही पुस्तक तुम्ही हातात घ्या त्यामध्ये लेखकाचा काही हेतू असतो. थोडं वैज्ञानिक पद्धतीत सांगायचं झालंच तर 'गृहीतक' असते. हे गृहीतक किंवा विचार व्यक्त करण्यासाठी पुस्तकांमध्ये वेगवेगळी उदाहरणें, दृष्टांत, सिद्धांत सांगितलेली असतात. पुस्तकातील कथानक त्यातील पात्रे, मांडलेले विचार हे सगळे लेखकाच्या हेतू भोवती फिरत असतात. तो हेतू वाचन करत असतांना वाचकाला जसा जसा समजायला लागतो, तशी तशी पुस्तकातील मांडणी आपल्या स्मरणात अधिक पक्की होते. कधी कधी तर सुरवातीचे काही पाने वाचल्यावरच पुढे काय लिहले असेल याचा अंदाज येऊन जातो.

एकदा मुख्य विचार समजला की पुस्तकातील बाकी शब्दरचना त्या विचारासाठीच योजलेल्या आहेत हे ओघाने समजायला लागते, त्यामुळे पुस्तक वाचनाचा वेग आणि स्मरणक्षमता दोन्ही वाढतात. बऱ्याच वाचकांना शेवटपर्यंत पुस्तकातील मूळ विचार किंवा हेतू हे शेवटपर्यंत समजत नाही, त्यामुळे त्याला पुस्तकातील सगळे संदर्भ वेगवेगळ्या पातळीवर लक्षात ठेवावे लागतात जे समजायला व लक्षात ठेवायला अडचणीचे असते.

वेगवेगळ्या क्षेत्रातील चौफेर वाचनातून हेतू समजण्याची आपली क्षमता ही विस्तारत जात असते, अर्थात ही हळू हळू होणारी आणि सूक्ष्म प्रक्रिया आहे. तिला वाचनातून सतत बळ देत राहिलं पाहिजे, म्हणजे पुस्तकं वाचल्यावर लक्षात राहायला लागतात व त्यांचा आयुष्यात योग्य ठिकाणी उपयोग व्हायला लागतो.



........
सचिन दाभाडे



Friday, April 9, 2021

उरूस आणि सिनेमा..!




माझं दहावी पर्यंत शिक्षण होईपर्यंत आम्ही बहिरगाव येथे राहत होतो. कन्नड पासून 5 ते 7 किमी अंतरावर असलेले हे एक समृद्ध आणि सुजलाम सुफलाम गाव. आईच्या बहिरगाव येथील सर्विसमुळे आमचे प्राथमिक शिक्षण बहिरगावला झाले. दरवर्षी कन्नडला उरूस भरायचा. वर्षभर टीव्हीवर गाणे पाहत पाहत मनात असलेल्या हिरोची सिनेमे उरसात केंव्हा येतील आणि येईल की नाही ही धाकधूक असायची. आवडत्या हिरोच्या चारपाच सिनेमांपैकी एक दोन तरी उरसात आले पाहिजे म्हणजे तेंव्हा ते बघता येतील म्हणून वर्षभर पाण्यात देव ठेवून बसलेलो असायचो आम्ही मनातल्या मनात. एका ऊरसात गोविंदाच्या कुलि नंबर वन साठी असेच देव पाण्यात ठेवून बसलो होतो मी. उरूस सुरू झाला आणि रोज मिठात बुडावलेले सडके बोर खायला बहिरगाववरून कन्नडला जाणाऱ्या माझ्या एका मित्राने खबर दिली की उरसात कुलि नंबर वन लागलाय रे म्हणून. आणि मग काय सांगावे, केवढा आनंद तो..! केवळ अवर्णनीय.. ! ..म्हणजे आता येणाऱ्या कुठल्याही दिवशी मी गोविंदाला पाहणार होतो. आता फक्त कुठल्या संध्याकाळी कूच करायचे ठेवढेच ठरायचे बाकी होते.

कितवीला होतो ते आठवत नाही, पण मोठी सायकल चालवता यायची. दोन मित्रांच्या सायकलींवर आम्ही दोन आणखी पाठीमागे बसून बहिरगावरून कन्नडला एका छोट्याश्या पांदीने निघालो. जातांना 'जब दिल ना लगे दिलदार हमारी गली आजाना' या गाण्यात काळा गॉगल घालून त्याच्या पाठीमागे लाल कपड्यात डान्स करणाऱ्या शंभर एक लेडीज डान्सर समोरून एक खांदा खाली करून डान्स करत जाणारा गोविंदा थोड्यावेळासाठीसुद्धा मनातून बाजूला हटलेला नव्हता. ध्यानीं मनी काष्टी पाषाणी फक्त गोविंदा होता. एवढा जर देव मनात असता तर तोही प्रसन्न झाला असता. उरसात पोहचल्या पोहचक्या डोळे भिरभिरत पोस्टरवर लाल कपड्यात गोविंदाला शोधायला लागले. आम्ही संध्याकाळी सातच्या सुमारास उरसात पोहचलो आणि तडक कुलि नंबर वनच्या पोस्टर खाली जाऊन उभे राहिलो. तिकीट खिडकीवर गेल्यावर लक्षात आले की पिक्चर सुरू होऊन अर्धा तास झालेला. पण थोडा ही उशीर न करता आम्ही लगेच तिकिटांच्या लाईन मधून बाजूला झालो कारण एक मिनिटही जाणे आम्हाला कुणालाच गवारा नव्हते. दुसरा कुठला बघायची मानसिकता नव्हती म्हणून पुढचे दोन तास उरूस पालथा घातला. आणि शेवटी ती वेळ आली पिवळ्या रंगाचे पातळ कागदाचे 4 तिकीट हातात आले. साडे तीन रुपयाचे एक असे 4 तिकिटे काढली होती . वर्षभर फक्त गाणं पाहून पाहून खच्चून समाधानी झालेलो मी कंबर खोसून पूर्ण सिनेमात गोविंदाचा गोंधळ बघायला तयार झालो होतो. अगदी रोम रोमच तयार झाला होता म्हणा ना..!

उरसाचा हा सगळा रोमांच अनुभवण्यासाठी बहिरगाववरून तरुण मुलांच्या टोळ्या रात्री जेवणं करून आपापल्या परीने नियोजन करून निघायच्या. रात्री सायकल वर मित्रांसोबत अडीअडचणीच्या रस्त्याने येऊन रात्रीचे शो पहायचे आणि सकाळी सकाळी किंवा मध्यरात्री परत गावी पोहचायचे याला सुरवातीला बरीच वर्ष घरच्यांकडून मला परवानगी नव्हती. पण जसे जसे मोठे होत गेलो तसे फक्त एकच सिनेमा पाहून रात्री बारा वाजेपर्यंत परतू, असा वादा केल्यावर परवानगी मिळणे सुरू झाले. यानंतर उरसासाठी जिवलग मित्रांसोबत बऱ्याच साहसी सफरी केल्या. यामध्ये साहस हा शब्द फक्त मला लागू व्हायचा बाकी मित्र एका तासात बोर झालं म्हणूनही कन्नडला जाऊन यायची डेअरिंग स्वतःजवळ बाळगून असायचे.

सुरवातीच्या काळात उरसासाठी वडील मला आणि लहान भावाला बहिरगाववरून दुपारी सायकल वर घेऊन यायचे व 3 ते 6 चा शो साईबाबा मध्ये बघितला की 6 ते 8 उरसात आणि मग रात्री परत गावी असा तो प्रोग्राम असायचा. वडिलांसोबतच्या उरसातील सफरीत उरसातील टॉकीजवर सिनेमे बघण्याची मौज अनुभवता येत नव्हती म्हणून थोडे आणखी मोठे होण्याची मनापासून वाट बघत होतो. जसे थोडे मोठे झालो, आम्हाला एकटेच डायरेक्ट उरसातील टॉकीजवर सिनेमे बघायची परवानगी मिळायला लागली आणि तिथून पुढे ही धूम सुरू झाली. जिवलग मित्र पक्या दापके, बाळ्या जाधव, संदिप्या जाधव, आणि परत्या भकड्या यांच्यासोबत पिंजऱ्यातून सुटल्यासारखा मी कन्नडच्या उरसाच्या दिशेने भन्नाट वेगाने निघायचो. वेगात वीर दौडले आम्ही 4 ते 5.

मजा होती, तुफान असा आनंद होता, साधने कमी होती पण आनंदाला पारावार नव्हता ...! 

हे सगळं आठवण्याचा कारण हे की 5 वर्षाची माझ्या मुलीने वरूण धवनचा कुलि नंबर वन मागच्या आठवड्यात (चुकून) पहिला आणि तेंव्हापासून ती दिवसातून दोन तीन वेळा पाहतेय, बर तिला त्यातील प्रत्येक सीन, डायलॉग यांचं भयंकर आकर्षण निर्माण झालेलं आम्ही सगळेच बघतोय. अतिशय कुतूहल आणि कौतुकाने जेंव्हा ती त्यातील सर्व सीन पुन्हा पुन्हा बघतेय तेंव्हा माझ्या आई आणि बायको दोघींना याचे मोठे कौतुक आणि कोडे पडलेय की अचानक कार्टून पाहणारी मुलगी एकदम कुलि नंबर वन हा सिनेमा इतका कसा एन्जॉय करतेय ते..

आता त्यांना काय सांगू वळणाच्या पाण्याबद्दल..!


.............….................
सचिन दाभाडे


Thursday, October 8, 2020

बॉईलिंग फ्रॉग ते स्वयंनेतृत्व..!



आपल्या संस्थेला, कंपनीला, कुटुंबाला, सहकाऱ्याला, आपल्या टीमला आणि स्वतःला एखाद्या अनप्रोडक्टिव्ह(अनुत्पादक) प्रोजेक्टमधून किंवा शक्य नसलेल्या मार्गावरून योग्य वेळी बाहेर काढायला तुम्हाला न जमणे किंवा ही योग्य वेळ ओळखता न येणे, हे स्वतःचा आणि तुमच्यातील नेतृत्व करण्याच्या क्षमतेच्या ऱ्हासाचे द्योतक आहे. आपण चुकीच्या फॉरमॅट मध्ये काम करतोय आणि नकळत त्यात आपण ट्रॅप होत जातोय हे समजायला बऱ्याचदा वेळ निघून जातो आणि जेंव्हा कळते की जे काही आपण केले ते अनुपयुक्त होते तेंव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड सुरू होते. आपण आपल्या स्वतःला, टीमला, संस्थेला, कंपनीला वाचवण्याची धडपड सुरू करतो  पण असंख्य वेळेला ही धडपड व्यर्थ ठरते कारण त्यातून बाहेर पडण्यासाठी जे धैर्य, हिंमत, प्रेरणा लागणार असते ती सर्व धडपड सध्या तुम्ही असलेल्या सिस्टीममध्ये आणि त्यामध्ये सुरक्षित राहण्यासाठी झिजवलेली असते. अशा वेळेला असह्यपणे जे होईल ते स्वतःसोबत होऊ देण्याची वेळ स्वतःवर येऊ देणे हेच बऱ्याच जणांना आयुष्याची आणि आपल्यात असलेल्या गुणांची फलश्रुती वाटायला लागते. 

हे असे खरेच आपल्या सोबत होते का ? यावर बिहेवीरिष्ठांनी (माणसाच्या वागणुकीवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ) अनेक संशोधने केली, अनेक प्रयोग केले, त्यापैकी Heinzmann या शास्त्रज्ञाने बेडकावर केलेल्या प्रयोग भन्नाट आहे. बेडूक हा थंड पाण्यात राहणारा प्राणी आहे, त्याला जर एकदम उष्ण पाण्यात टाकले तर तो त्यातून उडी मरेल किंवा त्यापासून दूर पळेल. पण पाणी हळू हळू उष्ण केल्यास तो तसे करेल का? तर उत्तर असे, एका जिवंत बेडकाला छोट्या पात्रात टाकले. त्यात पात्र पूर्ण भरून पाणी टाकले. त्या पात्रात तो बेडूक छान पैकी तरंगू लागला, पात्र मोठे नसल्याने त्याला हवं तेंव्हा तो त्यातून बाहेर उडी मारू शकेल असे. थोड्या वेळाने ते पात्र गॅस वर ठेवले जाते. सुरुवातीला पाणी कोमट होते. या बदलासोबत बेडूक समायोजन करून घेतो आणि पत्रात तसेच फिरत राहतो. दुसऱ्या फेजमधे काही वेळाने पाणी गरम व्हायला सुरुवात होते या छोट्या बदलात जरी बेडूक गोंधळून जातो, तरीही तो स्वतःच्या शरीराचे तापमान नियोजित करून परिस्थितीशी जुळवून घेतो. आता तिसऱ्या फेज मध्ये पाणी अतिशय कडक होते, ज्यामध्ये बेडकाला राहणे अतिशय कठीण होऊन बसणे सुरू होते. यावेळी बेडूक स्वतःची संपूर्ण ऊर्जा त्या कडक पाण्यापासून स्वतःला कसे जिवंत ठेवता येईल यात घालणे सुरू ठेवतो. शेवटच्या स्टेज मध्ये पाणी उकळणे सुरू होते व त्यात त्याला हालचाल करणेही अशक्य होऊन बसते, परिणामी यात बेडूक मारून पाण्यावर तरंगायला लागतो.

या प्रयोगाच्या शेवटी या अभ्यासकांना असा प्रश्न पडला की तिसऱ्या स्टेजला जेंव्हा पाण्याचे भयंकर चटके बसत असतांना पात्राचा आकार खूप लहान असूनही बेडूक पात्राच्या बाहेर का पडला नाही? जे त्याच्यासाठी अतिशय सोपे होते. याचे उत्तर काही विश्लेषणाअंती त्यांच्या हातात आले ते असे होते; बेडूक तिसऱ्या स्टेजमध्ये येईपर्यंत त्याची सर्व ऊर्जा व इच्छाशक्ती त्या उष्णतेशी समायोजन करण्यात संपलेली असते. बेडकाला पात्रामधून  सुरवातीला बाहेर पडणे हे जरी सोपे वाटत असले तरी त्याला त्याची काही गरज वाटत नाही, हळू हळू तिसऱ्या स्टेज पर्यंत निर्माण होणाऱ्या अड्व्हर्स परिस्थितीशी जुळवून घेणे हेच बेडकांचे प्रमुख ध्येय बनले. जेंव्हा शेवटच्या स्टेज मध्ये पाणी उकळायला लागले तेंव्हा बाहेर पडण्यासाठी उडी मारण्याचे धैर्य, प्रेरणा, आणि ऊर्जा संपलेली असते.

यातून बाहेर आलेले निष्कर्ष आपल्यातील प्रत्येकासाठी महत्वपूर्ण असे आहेत. प्रत्येकामधील इच्छाशक्ती, ऊर्जा, प्रेरणा ही आपल्या क्षमतेशी संबंधित क्षेत्रात योग्य वेळी वापरल्या नाहीत तर त्याचा ऱ्हास होणे वेगाने सुरू राहते. आपल्यामध्ये निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, ऊर्जा आणि धैर्य असेपर्यंत तो निर्णय स्वतःशी संबंधित उद्दिष्टासाठी घेता आला पाहिजे. म्हणून स्वतःतील ऊर्जेचा ऱ्हास होण्याअगोदरच तुम्हाला निर्णय घ्यायचाय, कारण एकदा का पाणी उकळायला लागले, की मग ते तेवढे सोपे नाही..!

टीप- या प्रयोगावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेय आणि त्यातील निष्कर्षाची विविधता ही कालांतराने सिद्धही झालीय. आपण यातून आपल्याला हवी असणारी शिकवण नक्कीच घेऊ शकतो, नाही का ?

सचिन दाभाडे
8390130362
www.sachindabhade.com


Wednesday, October 7, 2020





स्वतःच्या घरापासून दूर कुठे फिरायला गेल्यावर आपल्याला तेथील दृश्य पाहून एकदम अचंबित व्हायला होत आणि थोड्या वेळाने एकदम फ्रेश झाल्यासारखे वाटते, म्हणून लोक फ्रेश होण्यासाठी बऱ्याच दूर दूर जाऊन येतात आणि गेलेही पाहिजे. पण हा अनुभव बऱ्याच जणांना त्यांच्या जवळपास  असलेल्या वातावरणातून येत नाही. याचे कारण काय असेल ?.  

बाहेर गेल्यावर जेंव्हा आपण आपल्या जागेपासून तुटतो आणि नवीन ठिकाणी नवीन गोष्ट पाहतो तेंव्हा पाहण्याची प्रक्रिया ही जास्त फोकस असलेली असते, आपण काहीतरी नवीन पाहतोय अशा भूमिका यामागील कारण असते किंवा तसे गृहीतक घेऊनच आपण घराबाहेर पडलेलो असतो असे म्हणूयात, त्यामुळे जसे तुमचे बाहेरील निसर्गावर लक्ष केंद्रित होते, तेथील झाडं, नद्या, ओढे, बाजरी ज्वारीची शेतं, टेकड्या, डोंगरे, पायवाटा यांना तुम्ही नवीन म्हणून "पाहायला" लागतात आणि ते पाहण्याची प्रक्रिया सुरू होताच, तुमचे तुमच्या आयुषयातील मनस्ताप, वैताग, गोंधळापासून आपसूकच डिस्कनेक्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे जितका जास्त वेळ ते आपण पाहतो, तितका जास्त वेळ आपण या सगळ्यांपासून डिस्कनेक्ट असतो. ज्याक्षणी तुम्ही डिस्कनेक्ट झाला तुमच्या मेंदूमध्ये कार्यरत असणाऱ्या या मोठ्या ओझ्यावरून तुमचें लक्ष हटते आणि ते ओझे त्या वेळेसाठी किंवा क्षणासाठी नामशेष होते आणि तुम्हाला हलक हलक वाटायला लागते आणि आपण ताजेपणाची, जिवंतपणाची अनुभूती करायला लागतो.

ही अनुभूती खूप दूर जाऊन वरील सगळं पाहण्यानेच येईल असे काही नाही. आपल्या आजूबाजूच्या झाडांकडे, घराच्या बाजूला असलेल्या शेताकडे आणि त्यापलीकडे उभ्या असणाऱ्या झाडाकडे त्याखाली असलेल्या झोपडीकडे शांत चित्ताने पहा, घराच्या गच्चीवर जाऊन सूर्योदय आणि सूर्यास्त शांततेने पहा, त्यातील रंग छटा कधीच रोज असतात तशा नसणार, काहीतरी बदललेले असेल, ते डोळ्याने टिपता आले तर नक्की ठरवून टिपा. निसर्ग सगळीकडे सारखाच आनंद देणारा, उल्हासीत करणारा आहे. अगदी वाळवंट सुद्धा निसर्ग आहे आणि तोही बघायला लोक जातात, त्यामुळे तो बघितल्याने आनंद होतो हे जेवढे सत्य, तेवढेच सत्य हे की; आपण वेगळं काही बघतो आहे हा भावच आपल्याला त्यावर फोकस करतो आणि आपण डोक्यात असणाऱ्या नेहमीच्या ओझ्यापासून डिस्कनेक्ट होतो, त्यामुळे त्रास देणाऱ्या, नकारात्मकता निर्माण करणाऱ्या, अस्वस्थ आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या भावनेपासून आपसूक होणारे हे डिस्कनेक्शन मन हलक करणारे, आनंद देणारे आहे. त्यासाठी फार वेगळा इफर्ट घ्यावा लागत नाही.

सचिन दाभाडे
8390130362
www.sachindabhade.com