Wednesday, July 4, 2018

चित्रपट समाजाचा आरसा, शिक्षक नव्हे..!

मागे काही वर्षांपूर्वी एक मूवी बघितला 'वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट' हा मूवी जॉर्डन बेलफोर्ट या अतिशय मोठ्या पण वाया गेलेल्या आणि भ्रष्ट व्यावसायिकांवर बनवण्यात आला होता. लिओनार्दो दि कॅपरिओ याने जॉर्डन बेलफोर्ट ची भूमिका सिनेमात साकारलीय. प्रश्न आसा होता की अश्या व्यक्तीवर सिनेमा का बनवला ?. तो आपल्या व्यवसायात लोकांना फसवून चोऱ्या करून करोडो रुपयांची संपत्ती कमावतो, लोकांना कसे फसवायचे याचे सूत्र तो अख्या सिनेमाभर भरभरून सांगतो. याच्या आयुष्यात कुठलीच गोष्ट निषिद्ध नाही, अनगीणत स्त्रिया, जगातली सगळी व्यसने, लोकांना फसवून पैसे कमावण्याची प्रेरणा असलेल्या या व्यतिमत्वाचे रूप एवढे बिभत्स असूनही त्याच्यावर बायोपिक बनावण्यामागे दिग्दर्शकाला नेमके काय साध्य करायचे होते. हा व्यक्ती त्याच्या सर्व कुकर्मासाठी 4 ते 5 वर्ष जेल मध्येही जाऊन आला आणि नंतर बाहेर येऊन लोकांना आता तो व्यवसाय कसा करायचा याची ट्रेनिंग करतोय (युट्यूब वर त्याचे ट्रेनिंग विडिओ उपलब्ध आहेत) अर्थात यानेच सिनेमाचा शेवट आहे

पूर्ण सिनेमाभर पैसे, भ्रष्टाचार, फसवणूक, व्यभिचार, पराकोटीचा नशा, आणि आयुष्यभर केलेल्या गुन्ह्यासाठी शेवटी जेल असा एकूण प्लॉट. तिकडे हा मूवी आला लोकांनी पहिला आणि त्याचे खूप कौतुक ही झाले तिथल्या समीक्षकांनी या बायोपिकला कलेच्या परिघातच बघितले. आपल्याकडे संजूवर काही sms पाहिले तेंव्हा या चित्रपटाची प्रकर्षानं आठवण झाली. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे तो शिक्षक नाही हे विसरल्यामुळेच जे काम प्रत्येकाच्या पातळीवर प्रत्येकाला स्वतःला करायचे आहे ते सिनेमासारख्या माध्यमांकडून आपण अपेक्षित करू लागतो. चित्रपट तुम्हाला प्रेरित करतो पण तो तुम्हाला कुठे नेऊ शकत नाही. आपले समाजीक चरित्रच आपल्याला घेऊन जात असते पण ते काय आहे यावर विचारमंथन करण्याची कुणाला गरज वाटत नाही. आणि मग सगळी बाब चित्रपटावरच येऊन थांबते व्यवस्था बिघडवण्यासाठी जणू सिनेमाच आता राहिलाय आशा अविर्भावात त्याच्यावर आगपाखड केली जाते. असले चित्रपट हे आपले मेटफिजिकल कर्तृत्व दाखवायला आपल्याला सहज शक्य करून देते आणि मग बरेच जण त्यावर तुटून पडतात. आणि असे काही थांबवण्यात जर यश मिळालेच तर मग समाज बिघडवण्याचा एक मोठा धोका टाळल्याचा आनंद आपल्याला होणार असतो. किंवा समाजात एक चुकीचा समज पसरवू न देण्यात आपण यश मिळवले याचे समाधान आपल्याला मिळणार असते.

दिग्दर्शक हा आपल्या सामाजिक चारित्र्याच्या काही विरोधाभासी  हिंट्स त्याच्या कलेच्या माध्यमातून देऊ शकतो. म्हणजे जे आहे त्याच्या काही प्रमाणात तो दाखवतो तेही बऱ्याच वेळा प्रतिकात्मक, पण याउलट त्याने जे दाखवले त्यावरून मूळ समाजमनात काही फरक पडेल किंवा नुकसान होईल म्हणून त्याच्या कलेच्या नैतिकतेवर आपण प्रश्नचिन्ह उभे करतोय याची जाणीवही आपल्याला नसते. गिरीश कुलकर्णीचा 'देऊळ' सिनेमा असाच एक अप्रतिम सिनेमा, आपल्या सामाजिक चारित्र्याच्या विरोधाभासावर बऱ्याचश्या हिंट्स देणारी एक छान कलाकृती म्हणून आपण ती अनुभवलीय, तो सिनेमा आपल्याला आवडला आपण सगळ्यांनी तो जाऊन पहिला. संजू पाहताना मात्र आपण मुख्य पात्राची नैतिकता मोजायला घेतली, संजू बद्दल विरोधी sms सुरू झाले, असेच काही ठिकाणी दाखवलेले आपले शहाणपण लगेच भंपक झाले, कारण आपल्या सामाजिक व्यक्तिमत्वाला यातील विरोधाभास कसा पचवायचा हा प्रश्न होता आणि तो नेहमीच असतो आणि ते समजले नाही की लगेच विरोध सुरू. देऊळ, सैराट, PK, OMG या चित्रपटावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या अशाच गोंधळात असलेल्या समूहाचे प्रतीक आहे. सध्या देशभक्ती च्या मॉडेलची चलती असल्याने काही मुद्यावरून संजूला विरोध करणे क्रमप्राप्त होते.

सचिन दाभाडे.

No comments:

Post a Comment