Wednesday, February 12, 2025

पुस्तकं वाचनालये आणि आपण...

तरुण पिढी, गावाकडची मुलं, काही प्रमाणात शहरातली मुलं, ही पुस्तकं वाचत नाही, वचन संस्कृती लयाला चालली आहे. अशी एक सर्वसामान्य ओरड नेहमी बघायला मिळते; पण ज्या ठिकाणी पुस्तक वाचत नाही अशी ओरड होते, त्या भागातील वाचनालये आपण एकदा जाऊन बघितली पाहिजेत. जुन्या कथा, कादंबऱ्या, अनेक समकालीन रेफरन्स नसलेली पुस्तके आणि नवीन पिढीला अगदी गंधही नसलेली अशी अनेक विषय आणि त्यावरील पुस्तके आपल्याला या लायब्ररीमध्ये आढळतात. मागील पिढीला कदाचित या पुस्तकांनी प्रेरित केलेही असेल. त्याचे संदर्भ तेव्हा त्यांच्यासाठी नवीन असतीलही, परंतु कुठलेही पुस्तक नव्या पिढीला तेव्हाच आकर्षित करू शकतात जेव्हा ते त्यांची मानसिक, शैक्षणिक आणि समकालीन ज्ञान मिळवण्याच्या गरजा पूर्ण करतील. आजच्या पिढीला कुठलं ज्ञान आकर्षित करत आहे हे जर पाहिलं तर विज्ञान-तंत्रज्ञान आयटी, उद्योग, मॅनेजमेंट एवढाच नाही तर अध्यात्माचं एक नवीन स्वरूपात झालेल्या प्रगटीकरण, जगाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान देणारी शास्त्रे हे सर्व आजच्या पिढीला आकर्षित करत आहे, नव्हे त्याबद्दल ते वाचण्याचा प्रयत्नही करत आहे. असे नसते तर मोठ्या प्रमाणावर करोडोचा टर्नओव्हर करणाऱ्या ऑनलाईन पुस्तक विक्री कंपन्या या एवढ्या भरभराटीला आल्या नसत्या. या पिढीला जे हवं आहे ते देणारी पुस्तक आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री करताना दिसतात, ज्यामध्ये मॅनेजमेंट वर येणारी, विज्ञानाच्या परिभाषा नव्या पद्धतीने सांगणारी, मानसिक विकासावर आधारलेली, शैक्षणिक विकासाच्या वेगवेगळ्या थेअरी मांडणारी, उद्योग जगताच्या ज्ञानाविषयी भरभरून सांगणारी, नवीन राजकीय नेत्यांची आत्मकथन इत्यादी अनेक प्रकारची पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. नवीन पिढी जी वाचन करते ती या प्रकारचं वाचताना दिसते. 
परंतु पुस्तक वाचत नाही असं म्हणणाऱ्या, अशी ओरड असणाऱ्या भागातल्या लायब्ररींना जेव्हा जाऊन आपण भेटतो, तेव्हा त्या भागातल्या पुस्तकालयात काय आढळते, तर यापैकी काहीच नाही. मग ही पुस्तक नेमकं येऊन वाचणार तरी कोण. जर तुमची पुस्तकं येणाऱ्या जगातील भाषा बोलणाऱ्या मुलांच्या मानसिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक गरजा पूर्ण करणार नसतील तर ती काय कामाची असाही प्रश्न आहेच.. 

वाचनाचा छंद असणं आणि ज्ञानवृद्धीसाठी वाचन करणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. छंद असणाऱ्या लोकांना फक्त वाचायचं असतं त्यातून काय मिळणार याकडे त्यांचे लक्ष नसते. ही लोक रस्त्यावर पडलेला कागदाचा तुकडाही उचलून वाचतील. अशा लोकांना ही जुनाट वाचनालय पचतीलही, परंतु स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी वाचणाऱ्या येणाऱ्या पिढ्यांना, पुस्तकाचे वाचन हे त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी एक साधन असते, अशांसाठी ही वाचनालय कुचकामी ठरतात.

वाचनालय व्यवस्थित चालावे असे वाटते तर तर ती पुस्तकांच्या दुकानांसारखी प्रवाही असावीत. नवीन येणाऱ्या पुस्तकांचे प्रदर्शने लायब्ररींमध्ये भरावीत. सगळ्या प्रवाहातील पुस्तकांचे प्रतिनिधी असणारी पुस्तके लायब्ररीमध्ये प्रथमदर्शनी मांडली जावीत, त्यावर पैसे खर्च करावे. दर महिन्याला नवीन पुस्तके आली पाहिजेत. नवीन प्रकाशकांची पुस्तके यावीत, नवीन लेखकांची पुस्तके यावीत आणि पुढच्या महिन्यात कुणाची येणार आहे याचे बोर्ड झळकावेत.राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सर्वच. परंतु यासाठी सातत्याने खर्च येतो आणि तो करायची तयारी नसते. समष्टीच्या ज्ञानासाठी पैसे खर्च करणार तरी कसे. त्यामुळे निर्माण झालेले अनेक वाचनालय ही स्टॅगनंट असतात. त्यात पडणाऱ्या नाविन्यपूर्ण पुस्तकांची भर ही अगदी नसल्यातच जमा...! 

आणि पुस्तक वाचनाचच जर म्हटलं तर नवी पिढीच काय जुनी पिढी ही पुस्तकं वाचत होती असे ठोस पुरावे नाहीत. दुसरे असे की जुन्या पिढीकडे एवढा पैसा नसल्याने त्यांना पुस्तकं जी काही मिळायची ती लायब्ररीच्या आधारेच, म्हणून तेव्हा थोडे फार वाचन दिसायचे. आज पैसाही आहे आणि तो न खर्च करता ऑनलाइन पुस्तक मिळण्याची सुविधाही आहे त्यामुळे ही पिढी जे वाचते आहे ते वेगळ्या स्वरूपातील आहे. त्यामुळे या स्टॅगनंट झालेल्या वाचनालयांच्या स्वरूपाला बदलायला हवे तरच जनरेशन झेड आणि पुढील पिढ्या याकडे फिरकतील.

...........


सचिन दाभाडे
8390130362

Friday, January 31, 2025

मोटिवेशनल लेखक आणि समग्रतेची वाणवा


 शिव खेरा यांची दोन पुस्तकं... पहिलं पुस्तक कदाचित 1998 99 च्या काळामध्ये प्रकाशित झाला असेल 'जीत आपकी', कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात वाचलेली.. यू कॅन विन.. आणि त्यानंतर 25 ते 26 वर्षानंतर दुसरे पुस्तक आले ते म्हणाजे 'लिव्ह व्हाईल यू आर आलाईव्ह' . पहिल्या पुस्तकाची भाषा बघा त्याद्वारे दिल्या जाणारा संदेश बघा आणि दुसऱ्या पुस्तकाची भाषा आणि त्या दिल्या जाणारा संदेश दोन्हीही एकमेकांपासून अगदी भिन्न.. पहिल्या पुस्तकांमध्ये तुम्ही जिंकू शकता तुम्ही जिंकायलाच हवं आणि त्यासाठी तुम्ही काय काय केले पाहिजे याबद्दल जोर देऊन केलेली सगळी मांडणी. यश मिळवण्यासाठी एकच नाही तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या पाहिजेत आणि म्हणून जो जिंकतो तोच लीडर असतो हे सांगणार पहिले पुस्तक.


आणि; जर, योग्य वेळी थांबला नाहीत तर तुमचा अंत निश्चित आहे अशी आशयाची मांडणी करणारे दुसरे पुस्तक. टेक ब्रेक बिफोर यू ब्रेकडाऊन असे ठळकपणे सांगते. रिलॅक्स रहा. स्वतःला वेळ द्या, स्वतःला समजून घ्या, फक्त यशापाठीमागे न धावता कामाशी स्वतःलां बॅलन्स करा, अशीच एकंदरीत मांडणी. म्हणजे पळू नका, ब्रेक घ्या, ब्रेक डाऊनची भीती आणी त्याला अधोरेखित करणारे लिखाण.

आयुष्यात यश मिळवतांनी येणाऱ्या स्ट्रेसला बॅलन्स करताना त्याकडे लक्ष द्यावे असे सांगताना नुसते परफॉर्मन्सच्या मागे धावून जमणार नाही तर वर आयुष्य बॅलेन्स असले पाहिजे यावर यात फोकस केला गेलेला आहे.. 


लेखकाचा काळ कसा त्याच्यावर, त्याच्या अनुभवावर स्वार असतो तो कितीही तटस्थपणे लिहीत असला तरी त्याचं वय आणि त्याच्या अनुभवाची, जे खूप वैयक्तिक असतं, त्याची भाषा करत असते. आणि हेच त्याने काय लिहावं हे सांगतो. हे शिव खेरांच मानसिक आणि एकंदरीत अनुभवाचे स्थित्यंतर दाखवणार लिखाण अतिशय गमतीशीर आहे. यासोबतच हे बघताना हेही समजून घेण्यासारखे आहे की यश आणि यशाच्या संकल्पनेला सातत्याने, ती तुमच्या बाहेर आहे असे सांगणारे नरेटीव एका विशिष्ट वयानंतर यशाची समज आणि कल्पना ही आतून उदय पावते आणि ती बहिर्गत नाही तर अंतर्गत आहे असे सांगण्याकडे वळते. प्रश्न हा आहे की लेखक स्वतःच संपूर्ण आयुष्याची एकत्रित समज करून घेऊन हे स्थित्यंतर समजून घेऊन, यशाची एकात्मिक जाणीव का करून देत नसतील. किंवा तेवढं थांबून तसा अनुभवून मग लिहिण्यास त्यांच्याकडे वेळ नसावा.

थोड्या फार अनुभव अनुभवानंतर लगेच यश अपयशाच्या व्याख्या म्हणून त्याचे तत्वज्ञान उभा करून मोकळे होऊन जायचं याची एवढी गडबड का ?.

यात विशिष्ट वयाच्या टप्प्यावर जेवढं समजलं तेवढं परसेप्शन घेऊन त्याला यशाच्या व्याख्येत बसून बाजारात आणण्याचे प्रयत्न फक्त फुटकळ संकल्पना मांडण्या पुरतेच राहतात, पुढे चालून त्याचा रेलेवंस संपला की मग यशाची खरी व्याख्या सांगताना पुन्हा दुसरच काहीतरी लिहावं लागतं. अशी वेळ अनेक लेखकांवर आलेली मी पाहिलेली आहे. 


एखाद्या लेखकाने मांडलेली एक संकल्पना बदलायला किंवा त्यामध्ये बदल समाविष्ट करायला भविष्यातील विचारवंतांना फार काही करायची गरज पडत नाही, कारण मूळ लेखकच स्वतः वीस पंचवीस वर्षानंतर आपण मांडलेल्या संकल्पनेला पुन्हा बदलून मांडतो. 


मुद्दा आहे कुणाचे वाचावे. ज्या लेखकाला आयुष्याकडे समग्र बघण्याची दृष्टी प्राप्त झालेली आहे. आयुष्याच्या विविध अनुभवातून चिंतनातून आणि समग्र जाणीवेतून ज्याचं लिखाण काळाच्या कसोट्यांवर मान्यता पावलं आहे असं लिखाण वाचलं पाहिजे किंवा तस लिहिता यावं अशी अपेक्षा लेखककडून असायला हवी. नाहीतर आयुष्याने पुरवले आणि आयुष्य सुचवू इच्छिणारे हे असले शिफ्ट लेखकालाच बॅलेन्स करता येत नसतील आणि त्याची समग्र व्याख्या करून आपल्या लिखाणाला युनिक आणि समग्रपणे मांडता येत नसेल तर असलं काही लिहून तरुण कर्तुत्ववान आणि जगात सक्षमपणे काहीतरी करू इच्छिणाऱ्या आणि आयुष्याला समग्रपणे पाहू इच्छिणाऱ्या तरुणांचे नुकसान होते. ते तुमचं लिखाण वाचत बसतात आणि जे पटेन्शियली वाचायचं सोडून खूप काहीतरी वाचलं आहे अशा अविर्भावात जगत राहतात. त्यानंतर भविष्यात निर्माण होणाऱ्या  कॉन्ट्रोवर्सीजला  या लिखाणाचा आणि वाचनाचा काही उपयोग होत नाही मग त्या कॉन्ट्रोवर्सीज सोडवण्यासाठी हेच लेखक पुन्हा काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात. 


एकूणच काय तर आपल्या बुद्धीला एकत्वाची समग्रपणाची जाणीव देणारे लिखाण शोधावे आणि तेच वाचावे. असे लिखाण जे कालांतराने आपल्या अनुभवाच्या कसोटीवर खरे उतरत राहील आणि आयुष्यातल्या वेगवेगळ्या आंतरविरोधावर ते एक सम्यक उपाय म्हणून सातत्यपूर्ण मार्गदर्शन करत राहील. असे झाले तर मोजक्या पुस्तकातही आयुष्याला बॅलन्स करण्याचा आणि त्यानुसार सुंदर आयुष्य जगण्याचा समतोल उपाय सापडेल.


सचिन दाभाडे