Thursday, September 22, 2016


मृत्यूच्या दाराशी जाऊन आलेल्या स्टीव्हजॉब्स ने प्रत्येक दिवस शेवटचा मानून जगायला सांगितले, त्याने स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसमोर सांगितलेला ध्येयवाद संघर्षातून, अडीअडचणींवर मात करत पुढे जाणाऱ्यांच्या अंगात प्रेरणा निर्माण करणारा होता. मृत्यूचा स्पर्श आणि त्यानंतर आलेली जाणीव ही पृथ्वीवरील आपल्या मर्यादित वास्तव्याची जाणीव करून देते, त्यामुळे एकही दिवस व्यर्थ जाता कामा नये हा संवाद जणू त्याने जगातल्या सर्व तरूणांशीच केला.
कठीण संघर्षातून IPS झालेले विश्वास नांगरे पाटलांचे "मन मे हे विश्वास " हे प्रेरणादायी पुस्तक प्रकशित झालाय. सहज चाळताना शेवटच्या पानावरील ओळीवर दृष्टी आणि मन दोन्ही स्थिरावले. "जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश. काळ बदलतो, वेळ बदलते, पात्र बदलतात तशी भूमिकाही.. ! बस ! मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची , पंखात बळ निर्माण करण्याची, लाथ मारिन तिथे पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते". त्यांचा हा प्रत्येक शब्द म्हणजे जणू काही कडाडणारी वीज...! अस्वस्थ करणारी, मनावर काटा आणणारी, डोळ्यामध्ये लाल रंगाचे धुमारे फुलवणारी. स्वतःसोबत संघर्ष करण्याचे आव्हान देणारी ऊर्जाच त्यांनी हे लिहून निर्माण केलीय.
स्टीव्ह जॉब्स ने सांगितल्याप्रमाणे ध्येयवादाने पछाडण्यासाठी मृत्यू दिसण्याची गरज आहे का ? किंवा मग आयुष्य संपणार आहे याची जाणीव ठेवूनच कामाला लागण्यासाठीची ऊर्जा गोळा करता येणार आहे का ? कधीतरी शांत बसून स्वतःला स्वतःमध्ये शोधणे, हे ही जमलेच पाहिजे. जैन, बुद्धिझम हे मृत्यूच्या भीतीने नाही तर भीती आणि आसक्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रकियेतून निर्माण झालेल्या जीवन धारा आहेत. अनंत काळापासून मनुष्याच्या अंतरंगातील प्रेरणास्रोत शोधण्याची मूलतत्त्वे शोधणारे ज्ञान आमच्या आजूबाजूला आहे, पण ते मिळण्यासाठी एकच अट... ! ती म्हणजे फक्त डोळे आतून उघडणे जमले पाहिजे. जसे अंडे हे आतून फोडल्या जाते तेंव्हा जीवन आकारास येते आणि बाहेरून फोडण्याचा प्रयत्न झाला तर आयुष्याचा शेवट ... !
त्यामुळे आयुष्यात काहीतरी करायचे ठरवले असेल तर तुम्ही याच प्रक्रियेत आहात हे समजून घ्या. प्रत्येक दिवस प्लॅन करा, दिवसाची ध्येय ठरवा, रात्री झोपण्यापूर्वी ठरवलेले किती साध्य झालेय याचे पुनरावलोकन करा, राहिलेल्या गोष्टी उद्यासाठीचे उर्वरित (Pending) काम आहे हे लक्षात घेवूनच झोपा. सकाळी कामाची यादी वाढलेली असेल, पण ती पूर्ण करण्याची जिद्द आणि उर्जाही सोबत असेल याची खात्री बाळगा.
लक्षात ठेवा अपयश हि यशाची नुसती पायरीच नाही तर यशाचा मूलाधार आहे, अपयशाची वारंवारिता तुमच्यामधील सामर्थ्याला जगाच्या प्रत्ययाला आणते, अशुद्ध लोखंडामधील माती वितळून दूर करते, अपयशाच्या प्रचंड उष्णतेनंतरही जेव्हा काही शिल्लक राहते तेच यश आणि त्याशिवाय मिळालेले सर्व काही माती. म्हणून अपयश आल्यावर स्वतःसोबत बसा, अपयशासोबत बोला, तेच तुम्हाला पुढची दिशा दाखवेल. अगदी बिनचूक ...!

एवढं सगळं होऊनही नाही जमलं तर .... मला कॉल करा

सचिन दाभाडे
8390130362
ASK Training Solution

No comments:

Post a Comment